Thursday, June 25, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 10 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १०


Dnyaneshwari Adhyay 2 Part 10 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १० 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २२६ ते २५०
सुखीं संतोषा न यावें । दुःखी विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ॥ २२६ ॥
२२६) सुखाच्या वेळीं संतोष मानूं नये. दुःखाच्या वेळीं खिन्नता धरुं नये आणि लाभ व हानि मनांत धरुं नये.
एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥
२२७) या युद्धामध्यें जय मिळेल किंवा अजिबात देहच नाहींसा होईल, या पुढच्या गोष्टी अगोदरच चिंतीत बसूं नये.
आपणयां उचित । स्वधर्मातेंचि रहाटतां ।
जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
२२८) आपल्याला योग्य असें जें स्वधर्माचें आचरण, तेंच करीत असतांना, जो प्रसंग येईल, तो मुकाट्यानें सहन करावा. 
ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणोनि आतां झुंझावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
२२९) अशी मनाची तयारी होईल, तर मग सहजच पाप घडणार नाहीं; म्हणून तूं आतां खुशाल लढावें.
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ ।
आतां बुद्धियोगु निश्र्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
२३०) येथपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग थोडक्यांत सांगितला. आतां निष्काम कर्ममार्ग निश्चित सांगतों. तो तूं ऐक.
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था ।
कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पावे ॥ २३१ ॥
२३१) अर्जुना, निष्काम कर्मयोगांतील बुद्धि ज्याला साधली, त्याला कर्मबंधन मुळींच बाधत नाहीं.
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेंसीं उरिजे । अचुंबिता ॥ २३२ ॥
२३२) ज्याप्रमाणें वज्रासारखे चिलखत अंगांत घातलें असतां शस्त्रांची वृष्टि सहन करतां येतें, इतकेंच नव्हें तर ( त्या शस्त्रांचा अंगाला ) स्पर्शहि न होतां विजयी होऊन राहातां येतें;  
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
२३३) त्याप्रमाणें ज्या कर्मयोगांत पूर्वीपासूनच चालत आलेलें कर्म शुद्धपणानें चालूं राहिलेलें दिसून येतें, त्या कर्मयोगांत इहलोकांतील भोगांचा नाश तर होत नाहींच आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे.
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरिक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
२३४) कर्माच्या आधारानें वागावें, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवूं नये; ज्याप्रमाणें मंत्र जाणणार्‍याला भुताची बाधा होत नाहीं;
तियापरी जे सुबुद्धि । आपुल्याला निरवधि ।
हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
२३५) त्याप्रमाणें अनासक्तपणें कर्म करण्याची बुद्धि एकदां पूर्णपणें आपलीशी झाली, म्हणजे हा उपाधींत असूनहि उपाधि त्याला बाधा करुं शकत नाहीं.
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
२३६) ज्या बुद्धींत पुण्यपापादि कर्मफलांचा प्रवेश होत नाहीं, जी सूक्ष्म व अति निश्चल झालेली असते व जिला तीन गुणांचा विटाळ नसतो;
अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेपही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
२३७) अर्जुना, ती बुद्धि पुण्याईच्या योगानें जर थोडीशी हृदयांत प्रकट होईल, तर संसाराचें सर्व भय नाहीसें होईल.
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी ।
तैसी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
२३८) ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याप्रमाणें ह्या सद्बुद्धीला लहान म्हणतां येत नाहीं. 
पार्था बहुतीं परीं । हे अपेक्षिजे विचारशूरीं ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
२३९) अर्जुना, विचार करण्यांत पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारें इच्छा करतात; कारण एकंदर सृष्टींत ही सद्बुद्धि दुर्लभ आहे.
आणिसारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
२४०) ज्याप्रमाणें इतर वस्तु हव्या तितक्या मिळतात; पण परीस तसा मिळत नाहीं, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो.
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
त्याचप्रमाणें परमात्मा हाच जिचें अंतिम ध्येय आहे ती सदबुद्धि दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणें समुद्रावांचून निखालस अन्य गति नाहीं,
तैसी ईश्र्वरावांचूनि कांहीं । जिये आणकि लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
२४२) त्याप्रमाणें जिला ईश्वरावांचून अन्य आश्रयस्थान नाहीं; तीच जगांत फक्त एक सद्बुद्धि आहे. पाहा.
येरी जे दुर्मति । जे बहुधा असे विकरती ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
२४३) हीहून अन्य जी बुद्धि ती दुर्बुद्धि होय. ती अनेक प्रकारें विकास पावते. अधिकारी असतात, तेच तिच्या ठिकाणीं नेहमीं रममाण होतात.   
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
२४४) म्हणून पार्था, त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात, ( पण ) त्यांना आत्मसुखाचें मुळींच दर्शन होत नाहीं.
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरुनियां ॥ २४५ ॥
२४५) ते वेदवचनांचीं प्रमाणें देऊन बोलतात. केवळ कर्ममार्गाचें श्रेष्ठत्व सिद्ध करतात. पण कर्मफळाचा लोभ धरतात.
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
२४६) ते म्हणतात, मृत्युलोकीं जन्मावें, यज्ञादि कर्मे करावीं आणि मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. 
एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
२४७) यावांचून या लोकीं दुसरें मुळींच सुख नाहीं, असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादतात; अर्जुना, पाहा.
देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
२४८) पाह, केवळ सुखोपभोगाकडे नजर देऊन व फलाशेनें व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्में आचरितात.
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें ।
निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
२४९) अनेक प्रकारच्या कर्मानुष्ठानानें, विधींत यत्किंचितहि चूक होऊं न देतां व अगदी दक्षतेनें ते धर्माचरण करतात.  
परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥

२५०) पण ते एकच वाईट गोष्ट करतात, ती हीच कीं, 

स्वर्गाची इच्छा ते 

मनांत बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा, 

त्याला विसरतात. 


Custom Search

1 comment:

Anonymous said...

Hi sir i want to know my astrological report