Monday, July 12, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ९

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 9 
Ovya 206 to 235 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ९ 
ओव्या २०६ ते २३५

जयांचे वाचेपुढां भोजे । नाम नाचत असे माझें ।

जें जन्मसहस्रीं वोळगिजे । एक वेळ मुखासि यावया ॥ २०६ ॥

२०६)  जें माझें नाम एक वेळ मुखांत यावयास हजारों जन्म सेवा करावी लागते, तें माझें नाम ज्यांच्या वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत असतें; 

तो मी वैकुंठीं नसे । एक वेळ भानुबिंबीही न दिसें ।

वरी योगियांचींही मानसें । उमरडोनी जाय ॥ २०७ ॥

२०७) तो मी एक वेळ वैकुंठांत नसतों; एक वेळ सूर्यबिंबांतहि असत नाही; याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदयेंदेंखील उल्लंघन करुन जातो;

परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।

जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥ २०८ ॥

२०८) परंतु अशा रीतीनें मी जरी हरवलों असलों तरी पण माझें भक्त जेथें माझा नामघोष चांगला करतात, त्यांजपाशीं अर्जुना, मला शोधावा, ( मी तेथें सांपडवयाचाच. )

कैसे माझां गुणीं धाले । देशकाळाते विसरले ।

कीर्तनसुखें झाले । आपणपांचि ॥ २०९ ॥

२०९) ते महात्मे माझे गुण गाण्यांत असे तृप्त झालें आहेत कीं, त्या योगानें त्यास आपण कोठें आहोंत व आपला काल भजनांत किती गेला, याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखानें आपल्या ठिकाणींच आपलें स्वरुप होऊन राहिले आहेत.

कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।

माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥

२१०) ते महात्मे कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद यां नामांचेंच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीनें पुष्कळ आत्मचर्चा करतात.   

हें बहु असो यापरी । कीर्तित माते अवधारीं ।

एक विचरती चराचरीं । पांडुकुमरा ॥ २११ ॥

२११) आतां हें फार वर्णन करणें राहूं दे. अर्जुना, ऐक याप्रमाणें माझे किती एक भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्यें संचार करीत असतात.

मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना ।

पंचप्राणा मना । पाढाऊ घेऊनी ॥ २१२ ॥

२१२) अर्जुना, मग किती एक जे आहेत, त्यांनीं सहजच मोठ्या तत्परतेनें पांच प्राण व मन हें वाटाडे बरोबर घेऊन,   

बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।

वरी प्राणायामांचीं मांडिलीं । याहातीं ॥ २१३ ॥

२१३) बाहेरच्या बाजूला यमनियमांचें कांटेरी कुंपणाच्या आंत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरुपी चालूं असलेल्या तोफा ठेविल्या.

तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडें । मनपवनाचेनि सुरवाडें ।

सतरावियेचे पाणियाडें । बळियाविलें ॥ २१४ ॥

२१४) तेथें कुंडलिनीच्या प्रकाशानें व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीनें सतरावी जी जीवनकला हेंच कोणी एक तळें, ( त्यांनी ) बळकवलें,

तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली ।

इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥ २१५ ॥

२१५) त्या वेळीं प्रत्यहाराने मोठा पराक्रम केला. ( तो असा कीं, ) त्यामुळें विकारांची भाषा संपली; ( व त्यानें ) इंद्रियांना हृदयाच्या आंत बांधून आणलें .

तंव धारणावारु दाटिले । महाभूतांतें एकवटिलें ।

मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ २१६ ॥

२१६) तों इतक्यांत धारणारुपी घोड्यांनी गर्दी केली, ( व त्यांच्या बळानें ) योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केलें व नंतर त्यांनी संकल्पांचें चतुरंग सैन्य ( मन, बुद्धि, चित्त, अहंकार ) ठार केलें.

तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत ।

दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥

२१७) त्यानंतर, ‘ जय झाला रे झाला ‘ म्हणून ध्यानाची नौबद वाजू लागली व स्वरुपऐक्याचें एक छत्र ( एकसत्ता ) चमकत असलेलें दिसलें,

पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा ।

पट्टाभिषेकु देखां । समरसें जाहला ॥ २१८ ॥

२१८) नंतर समाधिरुपी लक्ष्मीचें जें आत्मानुभवरुपी संपूर्ण राज्यसुख, त्यांना समरसतेनें त्यांस राज्यभिषेक झाला. पाहा. 

ऐसें हें गहन । अरजुना माझें भजन ।

आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ २१९ ॥

२१९) अर्जुना, याप्रमाणें हे माझें ( अष्टांगयोगद्वारां होणारें ) भजन फार कठीण आहे; आतां किती एक मला दुसर्‍या प्रकारानें ( नमनरुप भक्तीनें ) भजतात. तो प्रकार सांगतों; ऐक.  

तरी दोन्हीं पाचववेरी । जैसा एक तंतू अंबरीं ।

तैसा मेवांचूनी चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥

२२०) तर वस्त्रामध्यें ज्याप्रमाणें एका पदरापासून दुसर्‍या पदरापर्यंत एक सूतच असतें, त्याप्रमाणें सजीव व निर्जीव पदार्थांत माझ्यावाचून दुसर्‍यास ते ओळखत नाहींत.

आदि ब्रह्मा करुनी । शेवटीं मशक धरुनी ।

माजी समस्त हें जाणोनी । स्वरुप माझें ॥ २२१ ॥

२२१) ब्रह्मदेवापासून आरंभ करुन, अखेर चिलटापर्यंत, मध्यें जे काहीं आहे ते सर्व माझें स्वरुप आहे, हे जाणून, 

मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती ।

देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥ २२२ ॥

२२२) मग मोठा, लहान याचा विचार न करतां, किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करतां, जो पदार्थ दृष्टीपुढे येईल, त्यास मीच ( परमात्मा ) समजून ते सरळ लोटांगण घालतात.    

आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे ।

एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥

२२३) त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे, हें कांहीं न जाणतां वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेंच त्यांना आवडते.

जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें ।

तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥

२२४) उमचावरुन पडलेलें पाणी जसें सखल जागेकडेआपोआप जाऊं लागतें, त्याचप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणिमात्रांस नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. 

कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा ।

तैसें जीवमात्रां अशेखां । खालवती ते ॥ २२५ ॥

२२५) अथवा पाहा की, फळभारानें लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणें सर्व प्राणीमात्रांपुढें ते नम्रपणाने लवतात;

अखंड अगर्वता होऊनि असती । तयांतें विनयो हेचि संपत्ती ।

जे जयजयमंत्रे अर्पिती । माझांचि ठायीं ॥ २२६ ॥

२२६) ते नेहमीं निरभिमान होऊन राहिलेले असतात; व नम्रपणा ही त्यांची संपत्ति असते. ती संपत्ति ते ‘ जय जय ‘ मंत्रानें माझ्याच ठिकाणी अर्पण करतात.

नमितां मानाभिमान गळाले । म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले ।

ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २२७ ॥

२२७) नमस्कार करीत असतांना मान व अभिमान हे नाहीसे झाले, म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणें माझ्या स्वरुपांत मिसळून ते माझी निरंतर उपसना करतात.

अर्जुना हे गुरुची भक्ती । सांगितली तुहप्रती ।

आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥ २२८ ॥

२२८) अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ति सांगितली. आतां ज्ञानरुप यज्ञानें जें माझी आराधना करतात. त्या भक्तांचा प्रकार ऐक.

परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी ।

जै मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २२९ ॥

२२९) परंतु ( ही ) भजन करण्याची रीति, अर्जुना, तुला माहीत आहेच. कारण आम्ही या गोष्टी मागें ( अध्याय ४ था श्लोक ३३-४२ ) तुला सांगितल्या आहेत.

तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें ।

तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ॥ २३० ॥

२३०) तेव्हां अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहें व देवाच्या प्रसादाचें कार्य आहे. म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर, ‘ पुरें, आतां नको, ‘ असें म्हणवेल काय ;    

या बोला अनंते । लागटा देखिलें तयातें ।

कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥ २३१ ॥

२३१) अर्जुनाच्या वरील बोलण्यारुन, तो हें जाणण्याविषयीं उत्सुख आहे असें पाहून, लागलीच अंतःकरणांत संतोष झाल्यामुळे, श्रीकृष्ण डोलावयास लागले.   

म्हणे भलें केलें पार्था । एर्‍हवीं हा अनवसरु सर्वथा ।

परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥ २३२ ॥

२३२) श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगलें केलेंस, नाहीं तर ( मागें एकवार सांगितलें असल्यामुळें ) हा मुळींच बोलण्याचा प्रसंग नव्हता; परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते.   

तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं ।

जग निवविजे हा तयांचा ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥

२३३) तेव्हां अर्जुन म्हणाला, असें काय म्हणता ? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एर्‍हवी उगवत नाही काय ? महाराज जगाला शांत करावें, हा त्याच्या ( चंद्राच्या ) ठिकाणी स्वभावच आहे.  

येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे ।

तेविं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥

२३४) आतां हे चकोर आहेत, ते केवळ आपलीच शांतता व्हावी, या इच्छेनें चंद्राकडे चोच करतात; त्याप्रमाणें आमची विनंती ती किती थोडी आहे ! पण देवा, आपण कृपासिंधु आहांत.

जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी ।

वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥ २३५ ॥ 

२३५) महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावानें संपूर्ण जगाची पीडा घावितो. वास्तविक पाहिलें तर, त्या पावसाच्या दृष्टीच्या मानानें चातकांची तहान ती केवढी ?  

  


Custom Search

No comments: