Tuesday, July 19, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 21 Doha 44 to 46 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग २१ दोहा ४४ ते ४६


ShriRamCharitManas 
Aranyakand Part 21 
Doha 44 to 46
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग २१ 
दोहा ४४ ते ४६

दोहा—अवगुन मूल सूलप्रद प्रमदा सब दुख खानि ।

ताते कीन्ह निवारन मुनि मैं यह जियँ जानि ॥ ४४ ॥

तरुण स्त्री ही अवगुणांचे मूळ, पीडा देणारी आणि सर्व दुःखाची खाण आहे. म्हणून हे मुनी, मनात असा विचार करुन तुम्हांला विवाह करण्यापासून मी रोखले होते.’ ॥ ४४ ॥

सुनि रघुपति के बचन सुहाए । मुनि तन पुलक नयन भरि आए ॥

कहहु कवन प्रभु कै असि रीती । सेवक पर ममता अरु प्रीती ॥

श्रीरघुनाथांचे हे सुंदर बोलणे ऐकून मुनींचे शरीर रोमांचित झाले आणि नेत्र प्रेमाश्रूंनी भरले. ते मनात म्हणू लागले, कोणत्या प्रभूची अशी रीत आहे की, ज्यांचे सेवकावर इतके ममत्व व प्रेम असेल ? ॥ १ ॥

जे न भजहिं अस प्रभु भ्रम त्यागी । ग्यान रंक नर मंद अभागी ॥

पुनि सादर बोले मुनि नारद । सुनहु राम बिग्यान बिसारद ॥

जे मानस भ्रम सोडून अशा प्रभूंना भजत नाहीत, ते ज्ञानाने कंगाल, दुर्बुद्धीचे आणि दुर्दैवी होत. मग नारद मुनी आदराने म्हणाले, ‘ हे सर्वज्ञ श्रीराम, ऐका. ॥ २ ॥

संतन्ह के लच्छन रघुबीरा । कहहु नाथ भव भंजन भीरा ॥

सुनु मुनि संतन्ह के गुन कहऊँ । जिन्ह ते मैं उन्ह कें बस रहऊँ ॥

हे रघुवीर, हे भव-भयाचा नाश करणारे माझे नाथ, आता कृपा करुन संतांची लक्षणें सांगा. ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे मुनी ऐक, मी ज्यामुळे त्यांना वश असतो, ते संतांचे गुण तुला सांगतो. ॥ ३ ॥

षट बिकार जित अनघ अकामा । अचल अकिंचन सुचि सुखधामा ॥

अमित बोध अनीह मितभोगी । सत्यसार कबि कोबिद जोगी ॥

ते संत हे काम-क्रोधादी सहा विकारांना जिंकतात, ते पापरहित, कामनारहित, निश्र्चल, सर्वत्यागी, आतून-बाहेरुन पवित्र सुखाचे धाम, असीम ज्ञानवान, इच्छारहित, मिताहारी, सत्यनिष्ठ, कवी, विद्वान, योगी, ॥ ४ ॥

सावधान मानद मदहीना । धीर धर्म गति परम प्रबीना ॥

सावध, दुसर्‍यांना मान देणारे, अभिमानरहित, धैर्यवान, धर्माचे ज्ञान आणि आचरण यांमध्ये अत्यंत निपुण, ॥ ५ ॥   

दोहा---गुनागार संसार दुख रहित बिगत संदेह ।

तजि मम चरन सरोज प्रिय तिन्ह कहुँ देह न गेह ॥ ४५ ॥

गुणांचे माहेर, सांसारिक दुःखांनी रहित आणि संशयापासून पूर्णतः मुक्त असतात. माझे चरणकमल सोडून त्यांना घर, किंबहुना देहसुद्धा प्रिय नसतो. ॥ ४५ ॥

निज गुन श्रवन सुनत सकुचाहीं । पर गुन सुनत अधिक हरषाहीं ॥

सम सीतल नहिं त्यागहिं नीती । सरल सुभाउ सबहि सन प्रीती ॥

आपल्या कानांनी आपले गुण ऐकताना ते ओशाळतात, दुसर्‍यांचे गुण ऐकताना त्यांना फार आनंद वाटतो. सम व शीतल असतात, न्याय कधीही सोडत नाहीत. सरळ स्वभावाचे असतात आणि सर्वांशी प्रेम बाळगतात. ॥ १ ॥

जप तप ब्रत दम संजम नेमा । गुरु गोबिंद बिप्र पद प्रेमा ॥

श्रद्धा छमा मयत्री दाया । मुदित मम पद प्रीति अमाया ॥

ते जप, तप, व्रत, दम, संयम आणि नियम यांमध्ये मग्न असतात. गुरु, गोविंद व ब्राह्मणांच्या चरणी त्यांचे प्रेम असते. तसेच त्यांच्या ठिकाणी श्रद्धा, क्षमा, मैत्री, दया, प्रसन्नता व माझ्या चरणी निष्कपट प्रेम असते. ॥ २ ॥

बिरति बिबेक बिनय बिग्याना । बोध जथारथ बेद पुराना ॥

दंभ मान मद करहिं न काऊ । भूलि न देहिं कुमारग पाऊ ॥

तसेच वैराग्य, विवेक, विनय, परमात्म्याच्या तत्त्वाचे ज्ञान आणि वेद-पुराणांचे यथार्थ ज्ञान त्यांना असते. ते कधीही दंभ, अभिमान व मद बाळगत नाहीत. आणि चुकूनही वाईट मार्गावर त्यांचे पाऊल पडत नाही. ॥ ३ ॥

गावहिं सुनहिं सदा मम लीला । हेतु रहित परहित रत सीला ॥

मुनि सुनु साधुन्ह के गुन जेते । कहि न सकहिं सारद श्रुति तेते ॥

नेहमी ते माझ्या लीला गातात व ऐकतात आणि अकारण दुसर्‍यांच्या कल्याणात तत्पर असतात. हे मुनी, ऐक. संतांच्या अंगी इतके गुण असतात की, त्यांचे वर्णन सरस्वती किंवा वेदही करु शकत नाहीत. ॥ ४ ॥

छंद—कहि सक न सारद सेष नारद सुनत पद पंकज गहे ।

अस दीनबंधु कृपाल अपने भगत गुन निज मुख कहे ॥

सिरु नाइ बारहिं बार चरनन्हि ब्रह्मपुर नारद गए ।

ते धन्य तुलसीदास आस बिहाइ जे हरि रँग रँए ॥

शेष व शारदाही संतांचे गुण वर्णन करु शकत नाहीत.’ हे ऐकताच नारदांनी श्रीरामांचे चरण कमल धरले. दीनबंधू कृपाळू रामांनी अशा प्रकारे आपल्या मुखाने आपल्या भक्तांचे गुण सांगितले. तेव्हा नारद वारंवार नमस्कार करुन ब्रह्मलोकी गेले. तुलसीदास म्हणतात की, सर्व आशा सोडून जे श्रीहरिचरणी रंगतात, ते धन्य होत.

दोहा---रावनारि जसु पावन गावहिं सुनहिं जे लोग ।

राम भगति दृढ़ पावहिं बिनु बिराग जप जोग ॥ ४६ ( क ) ॥

जे लोक श्रीराम यांचे पवित्र यश गातील व ऐकतील, ते वैराग्य, जप आणि योग यांच्या विनासुद्धा दृढ भक्ती प्राप्त करतील. ॥ ४६ ( क ) ॥

दीप सिखा सम जुबति तन मन जनि होसि पतंग ।

भजहि राम तजि काम मद करहि सदा सतसंग ॥ ४६ ( ख ) ॥

युवतीचे शरीर हे दिव्याच्या ज्योतीसारखे आहे. हे मना, तू त्यावर झेपावणारा पतंग बनू नकोस. काम आणि मद सोडून श्रीरामांचे भजन व सदा सत्संग कर. ॥ ४६ ( ख ) ॥

मासपारायण, बाविसावा विश्राम

इति श्रीमद्रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने तृतीयः सोपानः समाप्तः ।

कलियुगाच्या संपूर्ण पापांचा विध्वंस करणार्‍या श्रीरामचरितमानसाचा हा तिसरा सोपान समाप्त झाला.

अरण्यकाण्ड समाप्त   

   


Custom Search

No comments: