Wednesday, August 21, 2019

Kahani MangalaGouraichi कहाणी मंगळागौरीची

Kahani MangalaGouraichi कहाणी मंगळागौरीची
This is the story of Goddess MangalaGouri.
कहाणी मंगळागौरीची
 आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी.निपुत्रिका च्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई, ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली.बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही, असा शाप दिला.तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला.बुवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस.निळी वस्त्र परिधान कर, रानात जा. जिथं घोडा अडेल, तिथं खण. देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.असं बोलून बोवा चालता झाला.तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडित आचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्त आहे.मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदारं आहे गुरढोरं आहेत, धन द्रव्य आहे. पोटी पुत्र नाही.म्हणून दुःखी आहे.देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही.मी प्रसन्न झाले आहे. तर तुला देते.अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे.त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देविन सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा,तिथं एक गणपति आहे, त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे.गणपतीच्या दोंदावर पाय दे. एक फळ घे.घरी जाऊन बायकोला खाऊ घाल.म्हणजे तुझा कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. 
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला,झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला.तो आपला मोटेत आंबा एकच आहे. असं चार-पाच वेळा झालं.गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे.फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली.दिवसा मासानं गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी मुलगा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली.दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली.काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं.मामाभाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं,तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकिंचं भांडण लागलं.एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड आहे ! काय रांड आहे ! तेव्हा ती मुलगी म्हणाली. माझी आई मंगळागौरीचे व्रत करिते आमच्या कुळावंशामध्ये कोणीही रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. 
.हे भाषण मामानी ऐकलं.त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचा लगीन करावं. म्हणजे हा दीर्घायुषी होईल..  
परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होत. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा परागंदा झाला. मुलीचे आई-बापांना काळजी पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करुन वेळ साजरी करु. म्हणून धर्मशाळा पाहू लागले. तर मामाभाचे दृष्टीस पडले.मामापासून भाच्याला नेलं. गोरज मुहूर्तावर लग्न लावल. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघ झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येिल, त्याला पिण्याकरता दूध ठेव.एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यात शिरेल. आंगच्या चोळीनं कर्याचा तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. 
तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळान तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला.लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली.पहाटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. 
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलें. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडवांत आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडेल? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवूं लागले. 
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्यांच युद्ध झालं. यमदूत पळून गेले. ममगळागौर तिथेच अदृश्य झाली. तसा भाचा जागा झाला. आपल्या मामास सांगू लागला. मला असं असं स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठिक झालं. तुझ्यावरच संकट टळलं. उद्या आपण घरी जाऊ.

परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करुं लागले. दासींनी येऊन सांगितलें, इथं अन्नछत्र आहे. तिथं जेवायला जा. ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितले. यांना पालखी पाठविली. आदरातिथ्यांन घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍यास ओळखलं. नवर्‍यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवांच ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं मला मंगळागौरीच व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासरमाहेरची घरचीदारची सर्व माणसे एकत्र आली. आणि त्या व्रताचे उद्यापन केले. मंगळागौर त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा, ही धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.                       

Custom Search

No comments: