Wednesday, August 21, 2019

Kahani Sundaychi कहाणी आदित्यराणूबाईची


Kahani Sundaychi कहाणी आदित्यराणूबाईची
This is the story of Sunday. 
कहाणी आदित्यराणूबाईची 
 ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुले, दूर्वा आणावयास रानात जात असे रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उलशील मातशील घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदित्य वारी मौनाने उठावे. वस्तरासहित स्नान करावे.अग्रोदक पाणी आणावे. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ कराव.सहा सुतांचा तांतू करावा. त्यास सहा गाठी द्याव्या. पान फूल वाहावं. पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सहा मास चाळावी, सहा मास पाळावी. माघी रथसप्तमी संपूर्ण कराव. संपूर्णास काय करावे? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, नसेल तर दोन रुपये दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राम्हणास बोलावू धाडलं. ब्राम्हण जातेवेळी भिवु लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. बारा वर्षानी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकिन बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक ! तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला व प्रधानाच्या घरी आला. मुलीं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गूळ खा पाणी प्या. गूळ खात नाही पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे. ती तू अगोदर ऐक ! तुझी कहाणी नको ऐकू, तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतली, तीन बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावाने ती ऐकली.. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं आपल्या मुलींचा समाचार कसा आहे? जिन कहाणी ऐकली नाही, ती दारिद्र्याने पिडली,दुःखानं व्यापली.. राजा मुलखावर निघून गेला जिना कहाणी ऐकली होती, ती, भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकास सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे. ते तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये ! पहिल्या आदित्य वारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा; तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटक पांघरला आहे.तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदारान घेऊन आल्या.न्हावू माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला. होन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा ! वाटेने आपला जाऊ लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला, आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलंं ? दैवे दिल कर्माने नेले, कर्माचे फळ पुढे उभे राहीलं.मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसर्‍या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगंअग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं. पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिली.बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा ! म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्माने काढून घेतले.पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हावू माखूं घातला.पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातला. नारळ पोखरून होना-मोहरानी भरून दिला. कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं.घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडून विहिरीत पडला.घरी गेला आईनं विचारलं, काय रे बाबा मावशीने काय दिलं? आई ग मावशीने दिलं पण दैवान ते सर्व बुडालं.चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला.तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हावू माखू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं.त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली.सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं,काय रे बाबा मावशीनं काय दिलं?आई ग मावशी न दिलं पण दैवान ते सर्व नेलं. पाचवे आदित्यवारी ती तळ्याच्या पाळी उभी राहिली.दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातली. पाटाव नेसायला दिलं.प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली.काय वसा करतेस तो मला सांग. बहिण म्हणाली अगं अगं चांडाळणी, पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजा बोलावूं धाडलं. मावशी मावशी तुला छत्र का आली, चामर आली, पायीक आले. मला रे पापिणीला छत्र कोठली? चामर कोठली? पाईक कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावूं आला आहे.राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकांना बहिणी बहिणी आहेर केले. वाटेनं जाऊं लागली. तो पहिल्या मजलेस सैंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जात आहे.त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकाला ये.तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिली.व तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्त भावाने त्याने ऐकली. त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची मोळी झाली.तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा?उत्तर उतशील मातशिल घेतला वसा टाकून देशील.उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही.तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढं दुसर्‍या मजलेस गेली, स्वयंपाक केला.राजाला वाढलं, मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक माराली.आमच्या बाई ची कहाणी ऐक. तो आला.राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली.राणीनं कहाणी मनोभावें सांगितली माळ्याने कहाणी चित्त भावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसर्‍या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.उपाशी नाही. काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा रानात गेलेला आहे. डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्ला होता. यामुळं चिंताक्रांत बसली होती.तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ. मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाहि वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.उपाशी नाही काही नाही. काणा डोळा मासाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होतात्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उलटा केला सहा मोत्ये होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेविली.तीन मोत्ये आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला… पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंघाळ पाणी तापलं. षडरस पक्ववान जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला.ते म्हणाले अगं अगं कोणा पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं. तीन वळचणीखाली बसून आदित्य वारी केस विंचरले होते.डोईचा केस वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणाडोळा मासांचा गोळा इतक्याना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला.तसा तुम्हांआम्हां होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Custom Search

No comments: