Sunday, May 2, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग २

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 2 
Ovya 30 to 58 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग २ 
ओव्या ३० ते ५८

मूळ श्र्लोक

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।

अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभूतां वर ॥ ४ ॥

४) हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ; व जीव हाच अधिदैवत आणि या देहांत अधियज्ञ ( देह भावाचा उपशमन करणारा ) मीच आहे.

आतां अधिभूत जे म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें ।

तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥ ३० ॥

३०) आतां अधिभूत ज्याला म्हणतात, तेंहि थोडक्यांत सांगतों, तर ज्याप्रमाणें ढग उत्पन्न होतात व लय पावतात;

तैसें असतेपण आहाच । नाहीं होईजे हें साच ।

जयांतें रुप आणिती पांचपांच । मिळोनियां ॥ ३१ ॥

३१) त्याप्रमाणें ज्याचें अस्तित्व उगीच वरवर असतें, व न होणें ज्याचें खरे स्वरुप आहे, आणि ज्याला पंचमहाभूतें एकत्र होऊन व्यक्त दशेंत आणतात;  

भूतांते अधिकरुनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे ।

जें वियोगवेळे भ्रंशे । नामरुपादिक ॥ ३२ ॥

३२) जें पंचमहाभूतांचा आश्रय करुन असतें; आणि पंचमहाभूतांचा संयोग ( पंचीकरण ) झाला तरच जें दिसतें; आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असतां जें नामरुपात्मक शरीर नाशाला पावतें;

तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैव पुरुष जाणिजे ।

जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥ ३३ ॥

३३) त्याला ( शरीराला ) अधिभूत म्हणावें. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो प्रकृतीनें मिळविलेले भोग भोगतो.

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।

जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥ ३४ ॥

३४) जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरुपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परुप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे;

जो परमात्माचि परि दुसरा । जे अहंकारनिद्रा निदसुरा ।

म्हणोनि स्वप्नींचिया वोरवारा । संतोषे शिणे ॥ ३५ ॥

३५) जो वास्तविक परमात्माच आहे. पण जो दुसरा ( वेगळा ) झाला. कारण कीं, त्यास अहंकाररुपी झोप येऊन ( द्वैतभावात्मक ) स्वप्नाच्या व्यवहारानें तो संतोष पावतो व कष्टी होतो;

जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावें ।

तें अधिदैव जाणावें । पंचायतनींचें ॥ ३६ ॥

३६) ज्याला जीव या नांवानें स्वभावतः बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररुपी घरांतील अधिदैव समजावें.  

आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी ।

तो अधियज्ञु एथ गा मी । पंडुकुमरा ॥ ३७ ॥

३७) आतां याच शरीररुपी गांवामध्यें जो शरीरभावाला ( देहाहंकारादिकांना ) नाहींसें करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना, मी आहे.     

येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त ।

परि पंधरें किडाळा मिळत । काय साकें नोहे ॥ ३८ ॥

३८) इतर अधिदैव, अधिभूत तेंहि सर्व खरोखर मीच आहे, परंतु अस्सल सोनें डांकाला मिळालें तर तें हिणकस होत नाहीं काय ?

तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाचियाही अंशा न मिळे ।

परि जंव असे जयाचेनि मेळें । तंव साकेंचि म्हणिजे ॥ ३९ ॥ 

३९) वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मळत नाहीं; आणि तें सोनें किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाहीं; पण जोपर्यंत तें उत्तम सोनें किडांच्या मिलाफाने असतें; तोंपर्यंत तयाला हिणकसच म्हटलें जातें.               

तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पालवें ।

झाकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥ ४० ॥

४०) त्याप्रमाणें अधिभूत वगैरे हे सर्व जोंपर्यंत अविद्येच्या पदरानें झांकलेले आहेत, तोपर्यंत, वेगळें असे समजावेत.

तेचि अविद्येची जवनिक फिटे । आणि भेदभावाची अवधि तुटे ।

मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती ॥ ४१ ॥

४१) तोच अविद्येचा पडदा काढला, म्हणजे द्वैत भावाची हद्द संपते, मग हें एकमेकांना मिळून तद्रूप झालें असें जर म्हणावें तर पहिल्याप्रथम ते का दोन होते ?   

पैं केशांचा गुंडाळा । ठेविली स्फटिकशिळा ।

ते वरी पाहिली डोळां । तंव भेदली गमली ॥ ४२ ॥

४२) केसांचा गुंडाळा आहे ( व त्यावर ) स्फटिकाची शिळा ठेवली, तर ती वरुन डोळ्यानें पाहिली असतां ( फुटलेली ) दिसते.

पाठीं केश परौते  नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें ।

तरि डांक देऊनि सांदिले । शिळेतें काई ॥ ४३ ॥

४३) नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढलें, मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठें गेला तें कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय ?  

ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती ।

ते सारीलिया मागौती । जैसी का तैसी ॥ ४४ ॥     

४४) तर नाहीं, ती मूळची अखंड होती तशीच आहे. परंतु केसांच्या संगतीनें भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुनः ती मूळची जशी अखंड होती तशीच आहे.     

तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधींचि आहे ।

हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ॥ ४५ ॥

४५) त्याप्रमाणें अहंकार गेला तर ऐक्य मूळचेंच आहे. हा प्रकार खरोखर जेथें घडतो, तो अधियज्ञ मी आहें.

पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज ।

सांगितलें कां जे काज । मनीं धरुनि ॥ ४६ ॥

४६) अरे, आम्ही जो हेतू मनांत धरुन सर्व यज्ञ कर्मांपासून झाले आहेत असें ( चौथ्या अध्यायांत ) तुला सांगितलें,     

तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा ।

परि उघड करुनि पांडवा । दाविजत असे ॥ ४७ ॥

४७) तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसांवा आहे. व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. मग तो तुला मी उघड करुन दाखवित आहे.

पहिलें वैराग्यइंधन परिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं ।

विषयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥ ४८ ॥

४८) प्रथम वैराग्यरुपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इमद्रियरुपी अग्नींत शब्दादि विषयरुपी द्रव्यांच्या आहुती देऊन,

मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।

वेदिका रचे मांडवीं । शरीराचां ॥ ४९ ॥     

४९) नंतर वज्रासन हीच कोणी जमीन, ती शुद्ध करुन शरीररुपी मांडवांत आधारमुद्रारुपी चांगला ओटा घालतात.     

तेथ सयंमाग्नीचीं कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें ।

पूजिती उदंडें । युक्तिघोषें ॥ ५० ॥

५०) तेथे ध्यानधारणासमाधिरुपी अग्नीच्या कुंडांत बंधत्रयांच्या ममत्रघोषानें इंद्रियरुपी विपुल द्रव्याच्या साह्याने यजन करतात;

मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु ।

येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥ ५१ ॥

५१) नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभानें धूररहित ज्ञानरुप अग्नीला संतुष्ट करतात.    

ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयी हारपे ।

पाठीं ज्ञेयचि स्वरुपें । निखिल उरे ॥ ५२ ॥

५२) अशा रीतीनें हें वर सांगितलेलें साहित्य, ज्ञानरुपी अग्नीमध्यें समर्पण केल्यावर, मग त्या ज्ञानाचाहि ज्ञेयामध्यें लय होतो. मागें केवळ ज्ञेयच स्वरुपानें राहातें. 

तयां नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलला जंव सर्वज्ञु ।

तव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥ ५३ ॥

५३) त्यास अधियज्ञ असें नांव आहे. असें सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्या वेळेस म्हणाले, त्या वेळेस अर्जुन अतिशयच बुद्धिमान्  असल्यामुळें त्याच्या तें लक्षांत आलें.  

हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें ।

या कृष्णाचिया संतोषासवें । येरु सुखाचा जाहला ॥ ५४ ॥

५४) हें लक्षांत येऊन देव म्हणाले, अर्जुना तू चांगल्या तर्‍हेनें ऐकत आहेस. ह्या कृष्णाच्या संतोषानें अर्जुन आनंदित झाला. 

देखा बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होईजे ।

हें सद्गुरुचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥ ५५ ॥ 

५५) पाहा, लहान मुलांच्या तृप्तीनें आपण तृप्त व्हावें किंवा शिष्याच्या पूर्ण होण्यानें आपण कृतार्थ व्हावें, हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरच समजतात.

म्हणोनि सात्त्विक भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं ।

न समातसे परी बुद्धी । सांवरुनि देवें ॥ ५६ ॥

५६) म्हणून अष्टसात्त्विकभावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला; परंतु देवांनीं आपल्या बुद्धीनें तो सांवरुन, 

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कां निवलिया अमृताचा कल्लोळु ।

तैसा कोंवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥ ५७ ॥

५७) नंतर सुख हेंच कोणी पिकलेलें फळ त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणें मृदु आणि सरळ असें भाषण केले.

म्हणे परिसिणेयांचया राया । आइकें बापा धनंजया ।

ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥ ५८ ॥

५८) श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांतील श्रेष्ठा अर्जुना, बाबा, ऐक

. याप्रमाणें माया जळण्याची संपली कीं तिला जाळणारें जें

 ज्ञान तेंहि त्या प्रसंगीं जळून नाहीसें होतें.   



Custom Search

No comments: