Sunday, May 2, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 3 
Ovya 59 to 85 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ३ 
ओव्या ५९ ते ८५

मूळ श्लोक

अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् ।

यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५ ॥

५) आणि मरणाच्या वेळीं जो केवळ माझेंच स्मरण करीत शरीराचा त्याग करुन जातो, तो मत्स्वरुप पावतो; याविषयीं संशय नाहीं. 

जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें ।

जे आदींचि तया मातें । जाणोनि अंती ॥ ५९ ॥

५९) अर्जुना, ज्यास अधियज्ञ म्हणतात, म्हणून आतांच सांगितलें, त्या मला, जें पुरुष जिवंत असतांनाच जाणून मरणकाळींहिजाणतात,

ते देह झोळ ऐसे मानुनी ठेलें आपणपें आपणचि होउनि ।

जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥ ६० ॥

६०) ज्याप्रमाणें मठ हा पोकळीनें भरुन पोकळींत असतो त्याप्रमाणें ते पुरुष, देह खोटा आहे असें विचारानें जाणून, आपणच ( आत्मरुप ) होऊन आपल्या ठिकाणी असतात.

ये प्रतीतीचिया माजघरीं । तयां निश्र्चयाची वोवरी ।

आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥ ६१ ॥

६१) अशा या वरील अनुभवाच्या माजघरांत, निश्र्चयाच्या खोलींत, त्यांस ( झोंप ) आली. म्हणून त्यांस बाह्य विषयांची आठवणच होत नाहीं. 

ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें ।

बाहेरी भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥ ६२ ॥

६२) याप्रमाणें अंतर्बाह्य ऐक्य भरलेलें असून, ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असतां, बाहेर पांचहि भूतांच्या खपल्या पडल्या, तरी त्यांस खबरच नाहीं. 

उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें ।

म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥ ६३ ॥

६३) जिवंतपणीं सर्व व्यवहार करीत असतां ज्यांस त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही; त्यांस मग शरीर पडण्याचें संकट कोणतें असणार ? म्हणून अशाहि प्रसंगीं त्याच्या स्वरुप अनुभवाच्या पोटांतील ( निश्र्चयरुप ) पाणी हालत नाहीं.

ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।

जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ॥ ६४ ॥

६४) ती त्याची प्रतीती ऐक्यरसाचीच जणूं काय ओतलेली असते; अथवा त्रिकालाबाधित जें स्वरुप त्या स्वरुपाच्या हृदयांत ती जणूं काय  घातलेली असते; त्याची प्रतीती ऐक्यतारुपी समुद्रांत जणूं काय धुतली असल्यामुळें ती मळत नाहीं; 

पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला ।

पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ॥ ६५ ॥

६५) अथांग पाण्यांत घट बुडाला असतां तो आंतबाहेर पाण्यानेंच भरलेला असतो; नंतर तो दैववशात् पाण्यांत असतांना जर फुटला, तर त्या घटांत असलेलें पाणी फुटतें काय ?  

नातरी सर्पें कवच सांडिलें । कां उबारेना वस्त्र फेडिलें ।

तरी सांग पां कांहीं मोडलें । अवेवामाजीं ॥ ६६ ॥

६६) अथवा, सर्पानें कात टाकली अगर एखाद्यानें उकडतें म्हणून वस्त्र टाकलें, तर असें करण्यांत अवयवांमध्यें कांहीं मोडतोड झाली का ? सांग बरें .

तैसा आकारु हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे ।

तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां ॥ ६७ ॥

६७) त्याप्रमाणें वरवर भासणारा जो शरीररुपी आकार, तोच नाश पावत असून, त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तु तर, जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे; तीच आत्मवस्तु आपण आनुभवानें झाल्यावर आतां ( देहपाताच्या वेळीं ) बुद्धिचा निश्र्चय कसा डगमगेल ?    

म्हणोनि यापरी मातें । अतंकाळीं जाणतसाते ।

जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥

६८) म्हणून याप्रमाणें मला अंतःकाळीं जाणत असतां जे देहाचा त्याग करतात, ते मद्रूप होतात.

एर्‍हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण ।

जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होईजे ॥ ६९ ॥

६९) एर्‍हवीं साधारण विचार करुन पाहिलें तर, मरण येऊन ठेपलें असतां मनुष्याच्या मनाला ज्या वस्तुची आठवण होते, तीच वस्तू तो होतो.

जैसा कवणु एकु काकुळती । पळतां पवनगती ।

दुपाउलीं अवचितीं । कुहामाजीं पडिला ॥ ७० ॥

७०) ज्याप्रमाणें कोणी एखादा मनुष्य काकुळतीनें वार्‍यासारखा पलत असतां एकाएकी दोन्हीं पावलें निसटून आडांत पडला.

आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें ।

नाहीं म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे ॥ ७१ ॥  

७१) आतां त्याला पडण्यापूर्वी, तें पडणें चुकविण्याकरितां दुसरा कांहीं ( उपाय ) नाहीं; म्हणून जसें त्याला पडावेंच लागतें;

तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके ।

तें होणें मग न चुके । भलतयापरी ॥ ७२ ॥

७२) त्याप्रमाणें मृत्युच्या त्याप्रसंगीं, जी कांहीं एक वस्तु जीवनाच्या समोर येऊन उभी राहते ( ज्या वस्तुकडे त्याचें मन लागतें ) , ती वस्तु होणें मग कोणत्याही प्रकारानें चुकत नाहीं.

आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे ।

डोळां लागतखेंवो देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥ ७३ ॥

७३) आणि जेव्हां ( मनुष्य ) जागा असतो, त्या वेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेंच त्याला, डोळा लागल्याबरोबर , स्वप्नांत दिसतें.  

मूळ श्लोक

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।

तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥

६) अथवा हे कुंतीपुत्रा, ज्या ज्या वस्तुचें स्मरण करीत मनुष्य अंतःकालीं देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तूप्रत तो सर्वदा ( तिच्या स्मरणानें ) तिच्या ठिकाणीं चित्त एकाग्र झालेला असल्यामुळे जातो.  

तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।

तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥

७४) ज्याप्रमाणें जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीनें अंतःकरणांत राहाते, तीच मरणाच्यावेळी वारंवार मनांत येते,

आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे ।

आणि मरणसमयीं ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो.

मूळ श्लोक

तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।

मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७ ॥

७) म्हणून सर्वकाळीं माझें स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धि माझ्या ठिकाणीं अर्पण करुन राहिलास, म्हणजे तू निःसंशय मजप्रतच येशील. 

म्हणोनि सदां स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥

७५) असें आहे म्हणून, तूं नेहमी माझें स्मरण कर. 

डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें ।

मनीं जें भावावें । बोलावें वाचे ॥ ७६ ॥

७६) डोळ्यांनी जें पाहावें किंवा कानांनी जें ऐंकावें अथवा मनानें ज्याची कल्पना करावी किंवा वाणीनें जें बोलावें,

तें आंत बाहेरी आघवें । मीचि करुनि घालावें ।

मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥ ७७ ॥

७७) वरील सांगितलेले सर्व व्यवहार आंतबाहेर मीच करुन घाल. मग सर्वकाल सहज मीच आहें. 

अगा ऐसिया जरी जाहलिया । मग न मरिजे देह गेलया ।

मा संग्रामु केलिया । भय काय तुज ॥ ७८ ॥

७८) अरे, असे झालें म्हणजे मग देह नाहींसा झाला, तरी तो मरत नाहीं, मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे ?  

तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरुपीं अर्पिसी ।

तरी मायेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥ ७९ ॥

७९) तूं मनबुद्धि हीं खरोखर माझ्या स्वरुपांत अर्पण करशील, तर मग माझ्याशी एकरुपच होशील, हें माझें प्रतिज्ञापूर्वक सांगणें आहे.

हेंचि कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्तत आहे ।

तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥ ८० ॥

८०) अशी स्थिति कशानें होईल, असा जर संशय तुझ्या मनांत राहिला असेल, तर अगोदरच अभ्यास करुन पाहा; मग ती स्थिति झाली नाहीं, तर रागाव.

मूळ श्लोक

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।

परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८ ॥

८) हे पार्था, अभ्यासयोगामुळें स्थिर झालेल्या व अन्यत्र न जाणार्‍या चित्तानें ( परम पुरुषाचें ) सतत स्मरण करणारा मनुष्य त्या तेजस्वी परम पुरुषाप्रत जातो.    

येणेंचि अभ्यासेंसि योगु । चित्तासि करीं पां चांगु ।

अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥ ८१ ॥

८१) याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारें घाल. अरे, प्रयत्नांच्या बळावर पांगळादेखील पर्वत चढून जातो. 

तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर ।

लावीं मग शरीर । असो अथवा जावो॥ ८२ ॥

८२) त्याप्रमाणें सद्भ्यासानें तूं निरंतर आपल्या चित्ताला परम पुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जावो.

जें नानागती पावतें । तें चित्त वरील आत्मयातें ।

मग कवण आठवी देहातें । गेलें कीं आहे ॥ ८३ ॥

८३) नाना गतींना पावणार्‍या चित्तानें एकदा आत्म्यास वरलें, मग देह आहे किंवा गेला, याची कोणी आठवण ठेवायची ?  

पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें ।

तें काय वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येती ॥ ८४ ॥

८४) नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यांत मिसळलेलें जें पाणी, तें मागें काय चाललें आहे, म्हणून परत येतें काय ?

ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें ।

जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥ ८५ ॥

 ८५) नाहीं. तर तें समुद्रच होऊन राहिलें; त्याप्रमाणें तें चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणीं जन्ममरणाचा शीण सहजच संपला; कारण तें चैतन्य एकरस आनंद आहे.



Custom Search

No comments: