Tuesday, December 28, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 47 श्रीरामचरितमानस,अयोध्याकाण्ड भाग ४७

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 47 
Doha 275 to 280 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४७ 
दोहा २७५ आणि २८०

दोहा—आश्रम सागर सांत रस पूरन पावन पाथु ।

सेन मनहुँ करुना सरित लिएँ जाहिं रघुनाथु ॥ २७५ ॥

श्रीरामांचा आश्रम शांतरसरुपी पवित्र जलाने पूर्ण भरलेला समुद्र होता. जनकांचा समाज जणू करुणरसाची नदी होती. आणि आश्रमरुपी शांतरसाच्या समुद्राला भेटायला श्रीराम तिला घेऊन निघाले.॥ २७५ ॥

बोरति ग्यान बिराग करारे । बचन ससोक मिलत नद नारे ॥

सोच उसास समीर तरंगा । धीरज तट तरुबर कर भंगा ॥

या करुणा-नदीला इतका पूर आला होता की, तिने ज्ञान-वैराग्यरुपी तटांना बुडवून टाकले होते. शोकपूर्ण बोलणे म्हणजे नद्या व ओढे होते, ते या नदीस मिळत होते आणि चिंतापूर्णा दीर्घ श्वास हवेच्या  झोतात उसळलेल्या लाटा होत्या. त्या धैर्यरुपी किनार्‍यावरील उत्तम वृक्ष उपटून टाकीत होत्या. ॥ १ ॥

बिषम बिषाद तोरावति धारा । भय भ्रम भवँर अबर्त अपारा ॥

केवट बुध बिद्या बड़ि नावा । सकहिं न खेइ ऐक नहिं आवा ॥

भयानक शोक हा या नदीतील प्रचंड प्रवाह होता. भय व भ्रम हे त्यामधील असंख्य भोवरे व चक्रे होती. विद्वान हे नावाडी होते व विद्या ही मोठी नौका होती, परंतु ते चालवू शकत नव्हते. कुणाला तिचा अंदाज येत नव्हता. ॥ २ ॥

बनचर कोल किरात बिचारे । थके बिलोकि पथिक हियँ हारे ॥

आश्रम उदधि मिली जब जाई । मनहुँ उठेउ अंबुधि अकुलाई ॥

वनात फिरणारे बिचारे कोल-किरात हे प्रवासी होते. ते ती नदी पाहून मनातून खचले होते. ही करुणा-नदी जेव्हा आश्रम समुद्रास येऊन मिळाली, तेव्हा जणू तो समुद्र उसळू लागला. ॥ ३ ॥

सोक बिकल दोउ राज समाजा । रहा न ग्यानु न धीरजु लाजा ॥

भूप रुप गुन सील सराही । रोवहिं सोक सिंधु अवगाही ॥

दोन्हीही राज-समाज शोकाकुल झाले होते. कुणाला ज्ञान राहिले नाही की लज्जाही राहिली नाही. राजा दशरथ यांच्या रुप, गुण व शीलाची प्रशंसा करीत सर्वजण रुदन करीत होते आणि शोक-समुद्रात बुड्या मारीत होते. ॥ ४ ॥

 छंद—अवगाहि सोक समुद्र सोचहिं नारि नर ब्याकुल महा ।

दै दोष सकल सरोष बोलहिं बाम बिधि कीन्हो कहा ॥

सुर सिद्ध तापस जोगिजन मुनि देखि दसा बिदेह की ।

तुलसी न समरथु कोउ जो तरि सकै सरित सनेह की ॥

शोक समुद्रात बुड्या मारणारे सर्व स्त्री-पुरुष चिंतेने व्याकूळ झाले होते. ते सर्वजण विधात्याला दोष देत क्रोधाने म्हणत होते की प्रतिकूल दैवाने हे काय केले ? तुलसीदास म्हणतात की, देव, सिद्ध, तपस्वी, योगी व मुनिगण यांमध्ये कोणीही असा सामर्थ्यशाली नाही की, जो त्या प्रसंगी राजा विदेहाची दशा पाहून प्रेमाची नदी पार करु शकेल. ॥

सो०—किए अमित उपदेस जहँ तहॅं लोगन्ह मुनिबरन्ह ।

धीरजु धरिअ नरेस कहेउ बसिष्ठ बिदेह सन ॥ २७६ ॥

जेथे तेथे श्रेष्ठ मुनींनी लोकांना असंख्य उपदेश दिले आणि वसिष्ठांनी विदेह जनकांना म्हटले की, ‘ तुम्ही धीर धरा.’ ॥ २७६ ॥

जासु ग्यानु रबि भव निसि नासा । बचन किरन मुनि कमल बिकासा ॥

तेहि कि मोह ममता निअराई । यह सिय राम सनेह बड़ाई ॥

ज्या राजा जनकांचा ज्ञानरुपी सूर्य जन्म-मरणरुपी रात्रीचा नाश करतो आणि ज्यांची वचनरुपी किरणे ही मुनिरुपी कमलांना प्रफुल्लित करतात, त्यांच्याजवळ मोह व ममता हे फिरकू शकतील काय ? परंतु हा सीतारामांच्या प्रेमाचा महिमा आहे. ॥ १ ॥               

बिषई साधक सिद्ध सयाने । त्रिबिध जीव जग बेद बखाने ॥

राम सनेह सरस मन जासू । साधु सभॉं बड़ आदर तासू ॥

जगामध्ये विषयी, साधक व सिद्ध असे तीन प्रकारचे जीव आहेत, असे वेदांमध्ये सांगितले आहे. या तिघांमध्ये ज्याचे चित्त श्रीरामांच्या स्नेहामध्ये बुडालेले असते, त्याचाच साधूंच्या सभेत मोठा आदर होतो. ॥ २ ॥

सोह न राम पेम बिनु ग्यानू । करनधार बिनु जिमि जलजानू ॥

मुनि बहुबिधि बिदेहु समुझाए । रामघाट सब लोग नहाए ॥

ज्याप्रमाणे नावाड्याविना जहाज चालत नाही, त्याप्रमाणे श्रीरामांच्या प्रेमाविना ज्ञानाला शोभा नाही. वसिष्ठांनी विदेहराज जनकांना पुष्कळ प्रकारे समजाविले. नंतर सर्व लोकांनी रामघाटावर स्नान केले. ॥ ३ ॥

सकल सोक संकुल नर नारी । सो बासरु बीतेउ बिनु बारी ॥

पसु खग मृगन्ह न कीन्ह अहारु । प्रिय परिजन कर कौन बिचारु ॥

स्त्री-पुरुष सर्वजण शोकाकुल होते. त्या दिवशी भोजन ते काय, कुणी पाणीही घेतले नाही. पशु-पक्षी व हरिणांनीसुद्धा आहार घेतला नाही. मग प्रियजन व कुटुंबीयांच्याविषयी काय सांगावे ? ॥ ४ ॥

दोहा—दोउ समाज निमिराजु रघुराजु नहाने प्रात ।

बैठे सब बट बिटप तर मन मलीन कृस गात ॥ २७७ ॥

निमिराज जनक आणि रघुराज रामचंद्र आणि दोन्हीकडची मंडळी यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी स्नान केले आणि सर्वजण वटवृक्षाखाली जाऊन बसले. सर्वांची मने उदास व शरीरे अशक्त झाली होती. ॥ २७७ ॥

जे महिसुर दसरथ पुर बासी । जे मिथिलापति नगर निवासी ॥

हंस बंस गुर जनक पुरोधा । जिन्ह जग मगु परमारथु सोधा ॥

जे अयोध्येचे राहणारे व जे मिथिलेचे राहणारे ब्राह्मण होते आणि सूर्यवंशाचे गुरु वसिष्ठ व जनकांचे पुरोहित शतानंद की ज्यांनी सांसारिक अभ्युदयाचा मार्ग व परमार्थाचा मार्ग शोधून काढला होता, ॥ १ ॥

लगे कहन उपदेस अनेका । सहित धरम नय बिरति बिबेका ॥

कौसिका कहि कहि कथा पुरानीं । समुझाई सब सभा सुबानीं ॥

ते सर्वजण धर्म, नीती, वैराग्य व विवेकयुक्त अनेक विचार सांगू लागले. विश्वामित्रांनी प्राचीन कथा सर्व सभेला सुंदर वाणीमध्ये समजावून दिल्या. ॥ २ ॥

तब रघुनाथ कौसिकहि कहेऊ । नाथ कालि जल बिनु सबु रहेऊ ॥

मुनि कह उचित कहत रघुराई । गयउ बीति दिन पहर अढ़ाई ॥

तेव्हा श्रीरघुनाथांनी विश्र्वामित्रांना म्हटले की, ‘ हे मुनिवर्य ! काल सर्व लोक पाणीसुद्धा न पिता राहिले आहेत, म्हणून आता काही आहार घेतला पाहिजे.’ विश्र्वामित्र म्हणाले, ‘ श्रीरघुनाथ योग्यच सांगत आहेत. आजही अडीच प्रहर उलटून गेले. ॥ ३ ॥

 रिषि रुख लखि कह तेरहुतिताजू । इहॉं उचित नहिं असन अनाजू ॥

कहा भूप भल सबहि सोहाना । पाइ रजायसु चले नहाना ॥

विश्र्वामित्रांचा रोख पाहून जनक म्हणाले की, ‘ येथे अन्न खाणे योग्य नाही.’ राजांचे सुंदर बोलणे ऐकून सर्वांच्या मनाला बरे वाटले. आज्ञा घेऊन सर्व स्नानास गेले. ॥ ४ ॥   

दोहा—तेहि अवसर फल फूल दल मूल अनेक प्रकार ।

लइ आए बनचर बिपुल भरि भरि कॉंवरि भार ॥ २७८ ॥

त्याचवेळी अनेक प्रकारची पुष्कळ फळे, फुले, पाने, मुळे इत्यादी पदार्थंच्या कावड्या घेऊन कोल, किरात हे वनवासी लोक आले. ॥ २७८ ॥

कामद भे गिरि राम प्रसादा । अवलोकत अपहरत बिषादा ॥

सर सरिता बन भूमि बिभागा । जनु उमगत आनँद अनुरागा ॥

श्रीरामचंद्रांच्या कृपेमुळे सर्व पर्वत मनोवांछित वस्तू देणारे बनले. केवळ दर्शनानेच ते सर्व दुःखांचे हरण करीत. तेथील तलाव, नद्या, वने आणि पृथ्वीचे सर्व भाग यांमध्ये जणू आनंद व प्रेमाचा सागर उसळत होता. ॥ १ ॥

बेलि बिटप सब सफल सफूला । बोलत खग मृग अलि अनुकूला ॥

तेहि अवसर बन अधिक उछाहू । त्रिबिध समीर सुखद सब काहू ॥

वेली आणि वृक्ष हे सर्वच फुलांनी भरुन गेले. पक्षी, पशू आणि भ्रमर हे मनोहर बोल बोलू लागले. त्याप्रसंगी वनामध्ये फार उत्साह भरला होता. सर्वांना सुख देणारे शीतल, मंद व सुगंधित वारे वाहात होते. ॥ २ ॥

जाइ न बरनि मनोहरताई । जनु महि करति जनक पहुनाई ॥

तब सब लोग नहाइ नहाई । राम जनक मुनि आयसु पाई ॥

देखि देखि तरुबर अनुरागे । जहँ तहँ पुरजन उतरन लागे ॥

दल फल मूल कंद बिधि नाना । पावन सुंदर सुधा समाना ॥

वनाच्या मनोहरतेचे वर्णन करणेंच कठीण होते. जणू पृथ्वी ही जनकांचा पाहुणचार करीत होती. त्यावेळी जनकपुरवासी सर्व लोक आंघोळ करुन श्रीराम, जनक व मुनी यांची आज्ञा घेऊन सुंदर वृक्ष पाहात-पाहात प्रेमाने जिकडे तिकडे उतरत होते. पवित्र, सुंदर व अमृतासारखी अनेक प्रकारची पाने, फळे, मुळे व कंद ॥ ३-४ ॥

दोहा—सादर सब कहँ रामगुर पठए भरि भरि भार ।

पूजि पितर सुर अतिथि गुर लगे करन फरहार ॥ २७९ ॥

यांची ओझी श्रीरामांचे गुरु वसिष्ठांनी सर्वांच्याकडे भरभरुन आदराने पाठविली. तेव्हा ते लोक पितर, देवता, अतिथी आणि गुरु यांची पूजा करुन फलाहार करु लागले. ॥ २७९ ॥

एहि बिधि बासर बीते चारी । रामु निरखि नर नारि सुखारी ॥

दुहु समाज असि रुचि मन माहीं । बिनु सिय राम फिरब भल नाहीं ॥

अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. श्रीरामचंद्रांच्या दर्शनामुळे सर्व स्त्री-पुरुष सुखी होते. श्रीसीतारामांना घेतल्याविना परत जाणे चांगले नाही, अशी दोन्ही समाजांच्या मनात इच्छा होती. ॥ १ ॥

सीता राम संग बनबासू । कोटि अमरपुर सरिस सुपारी ॥

परिहरि लखन रामु बैदेही । जेहि धरु भाव बाम बिधि तेही ॥

श्रीसीतारामांच्या सोबत वनात राहणे म्हणजे कोट्यावधी देवलोकांमध्ये निवास करण्याजोगे सुखदायक होते. लक्ष्मण, श्रीराम व जानकी यांना सोडून ज्यांना आपले घर बरे वाटते, देव त्यांच्या विरुद्ध आहे, असे समजावे. ॥ २ ॥

दाहिन दइउ होइ जब सबही । राम समीप बसिअ बन तबही ॥

मंदाकिनि मज्जनु तिहु काला । राम दरसु मुद मंगल माला ॥

जेव्हा दैव हे सर्वांना अनुकूल असेल,तेव्हाच श्रीरामांच्याजवळ वनात निवास घडू शकतो. मंदाकिनीचे त्रिकाळ स्नान, आनंद व मांगल्याची रास असलेले श्रीरामांचे दर्शन, ॥ ३ ॥

अटनु राम गिरि बन तापस थल । असनु अमिअ सम कंद मूल फल ॥

सुख समेत संबत दुइ साता । पल सम होहिंन जनिअहिंजाता ॥

श्रीरामांचा कामदनाथ पर्वत, वने व तपस्व्यांच्या स्थानातून फिरणे आणि अमृतासमान मधुर कंद, मुळे, व फळांचे भोजन. अशा सुखसोहळ्यात चौदा वर्षे पळासारखी निघून जातील. केव्हा गेली कळणार नाही. ॥ ४ ॥  

दोहा—एहि सुख जोग न लोग सब कहहिं कहॉं अस भागु ।

सहज सुभायँ समाज दुहु राम चरन अनुरागु ॥ २८० ॥

सर्व लोक म्हणत होते की, आम्ही या सुखांच्या योग्यतेचे नाही. आमचे एवढे भाग्य कुठचे ? दोन्ही समाजांना श्रीरामांविषयी मनापासून प्रेम होते. ॥ २८० ॥

एहि बिधि सकल मनोरथ करहीं । बचन सप्रेम सुनत मन हरहीं ॥

सीय मातु तेहि समय पठाईं । दासीं देखि सुअवसरु आईं ॥

सर्वजण अशा प्रकारे मनोरथ करीत होते. त्यांचे प्रेमळ बोलणें ऐकणार्‍यांची मने आकर्षित करुन घेत होते. त्याचवेळी सीतेची माता सुनयना हिने पाठविलेल्या दासी कौसल्या इत्यादी राण्यांना भेटण्याची योग्य वेळ पाहून आल्या. ॥ १ ॥

सावकास सुनि सब सिय सासू । आयउ जनकराज रनिवासू ॥

कौसल्यॉं सादर सनमानी । आसन दिए समय सम आनी ॥

सीतेच्या सर्व सासवा या वेळी मोकळ्या आहेत. हे ऐकून जनक राजांचा राणीवसा त्यांना भेटायला आला. कौसल्येने आदराने त्यांना सन्मान दिला आणि प्रसंगानुरुप आसने आणून दिली. ॥ २ ॥

सीलु सनेहु सकल दुहु ओरा । द्रवहिं देखि सुनि कुलिस कठोरा ॥

पुलक सिथिल तन बारि बिलोचन । महि नख लिखन लगीं सब सोचन ॥

दोन्ही बाजूच्या सर्वांचे वागणे आणि प्रेम पाहून आणि ऐकून कठोर वज्रसुद्धा वितळून जात होते. त्यांचे देह पुलकित व प्रेमविह्वळ झाले होते. नेत्रांतून दुःखाचे व प्रेमाचे अश्रू भरले होते. सर्वजणी आपल्या पायांच्या नखांनी जमीन उकरत विचार करीत होत्या. ॥ ३ ॥

सब सिय राम प्रीति कि सि मूरति । जनु करुना बहु बेष बिसूरति ॥

सीय मातु कह बिधि बुधि बॉंकी । जो पय फेनु फोर पबि टॉंकी ॥

त्या सर्व सीतारामांच्या प्रेमाच्या मूर्ती होत्या. जणू प्रत्यक्ष करुणाच अनेक रुपे धारण करुन स्फुंदत  होत्या. सीतेची माता सुनयना म्हणाली, ‘ विधात्याची बुद्धी मोठी विचित्र आहे. ती दुधाच्या फेसासारख्या कोमल वस्तूला वज्रासारख्या छिनीने फोडत आहे. कोमल व निर्दोष लोकांवर संकटे घालत आहे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: