Friday, September 9, 2022

KikshindhaKanda Part 10 किष्किन्धाकाण्ड भाग १०

 

KikshindhaKanda Part 10
ShriRamCharitManas 
Doha 28 to Doha 30 
किष्किन्धाकाण्ड भाग १० 
श्रीरामचरितमानस 
दोहा २८ ते दोहा ३०

दोहा—मैं देखउँ तुम्ह नाहीं गीधहि दृष्टि अपार ।

बूढ़ भयउँ न त करतेउँ कछुक सहाय तुम्हार ॥ २८ ॥

मी तिला पाहू शकतो, तुम्ही पाहू शकणार नाही, कारण गिधाडाची नजर फार लांब जाते. काय करु ? मी म्हातारा झालो आहे, नाही तर तुम्हांला थोडीशी तरी मदत नक्की केली असती. ॥ २८ ॥

जो नाघइ सत जोजन सागर । करइ सो राम काज मति आगर ॥

मोहि बिलोकि धरहु मन धीरा । राम कृपॉं कस भयउ सरीरा ॥

जो शंभर योजने- ( चारशे कोस ) विस्तार असलेला समुद्र उल्लंघन करु शकेल आणि बुद्धिमान असेल, तोच श्रीरामांचे कार्य पार पाडू शकेल. निराश न होता माझ्याकडे पाहून धीर धरा. बघा, श्रीरामांच्या कृपेमुळे पाहता पाहता माझे शरीर कसे झाले. ‘ ॥ १ ॥

पापिउ जा कर नाम सुमिरहीं । अति अपार भवसागर तरहीं ॥

तासु दूत तुम्ह तजि कदराई । राम हृदयँ धरि करहु उपाई ॥

पापीसुद्धा ज्तांचे नामस्मरण करताच अत्यंत अपार भवसगर तरुन जातात, त्यांचे तुम्ही दूत आहात. म्हणून भय सोडून श्रीरामांना हृदयात ठेवून काम करा. ॥ २ ॥

अस कहि गरुड़ गीध जब गयऊ । तिन्हकेंमन अति बिसमय भयऊ ॥

निज निज बल सब काहूँ भाषा । पार जाइ कर संसय राखा ॥

काकभुशुंडी म्हणतात, ‘ हे गरुडा, असे सांगून जेव्हा संपाती निघून गेला, तेव्हा वानरांना फार आश्चर्य वाटले. सर्वजणांनी आपापले सामर्थ्य सांगितले परंतु सर्वांनी समुद्र उल्लंघून जाण्याविषयी संशय प्रगट केला.’ ॥ ३ ॥

जरठ भयउँ अब कहइ रिछेसा । नहिं तन रहा प्रथम बल लेसा ॥

जबहिं त्रिबिक्रम भए खरारी । तब मैं तरुन रहेउँ बल भारी ॥

ॠक्षराज जांबवान म्हणू लागला, ‘ मी आता म्हातारा झालो आहे. शरीरामध्ये पूर्वींचे बळ थोडेसुद्धा राहिले नाही. जेव्हा श्रीराम यांनी वामनावतार घेतला होता, तेव्हा मी तरुण होतो व माझ्यामध्ये पुष्कळ बळ होते. ॥ ४ ॥

दोहा—बलि बॉंधत प्रभु बाढ़ेउ सो तनु बरनि न जाइ ।

उभय घरी महँ दीन्हीं सात प्रदच्छिन धाइ ॥ २९ ॥

बळीला बांधून घालताना प्रभू एवढे वाढले की, त्या शरीराचे वर्णन करता येत नाही. परंतु मी दोन घटकातच धावत धावत त्यांच्या देहाला सात प्रदक्षिणा घातल्या. ‘ ॥ २९ ॥

अंगद कहइ जाउँ मैं पारा । जियँ संसय कछु फिरती बारा ।

जामवंत कह तुम्ह सब लायक । पठइअ किमि सबही कर नायक ॥

अंगद म्हणाला, ‘ मी पलीकडे जाईन, परंतु परत येता येईल की नाही, अशी मनात शंका आहे. ‘ जांबवान म्हणाला, ‘ तू सर्व प्रकारे योग्य आहेस, परंतु तू सर्वांचा नेता आहेस. तुला कसे पाठविता येईल ? ॥ १ ॥

कहइ रीछपति सुनु हनुमाना । का चुप साधि रहेहु बलवाना ॥

पवन तनय बल पवन समाना । बुधि बिबेक बिग्यान निधाना ॥

ॠक्षराज जांबवानाने हनुमानाला म्हटले, ‘ हे हनुमाना, हे बलवाना, तू का गप्प आहेस ? तू पवनाचा पुत्र आहेस आणि बळामध्ये पवनासमान आहेस. तू बुद्धी, विवेक व विज्ञानाची खाण आहेस. ॥ २ ॥

कवन सो काज कठिन जग माहीं । जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं ॥

राम काज लगि तव अवतारा । सुनतहिं भयउ पर्बताकारा ॥    

जगात असे कोणते कठीण काम आहे की, बाबा रे, जे तुझ्याकडून होऊ शकणार नाही ? श्रीरामांच्या कार्यासाठीच तुझा अवतार झाला आहे.’ हे ऐकताच हनुमान पर्वताच्या आकारासारखा विशाल झाला. ॥ ३ ॥

कनक बरन तन तेज बिराजा । मानहुँ अपर गिरिन्ह कर राजा ॥

सिंहनाद करि बारहिं बारा । लीलहिं नाघउँ जलनिधि खारा ॥

त्याचा सोन्यासारखा रंग होता. शरीरावर तेज शोभत होते, जणू दुसरा पर्वतांचा राजा सुमेरु होता. हनुमानाने वारंवार सिंहनाद करुन म्हटले, ‘ मी या खार्‍या समुद्राला लीलया उल्लंघून जाईन. ॥ ४ ॥

सहित सहाय रावनहि मारी । आनउँ इहॉं त्रिकूट उपारी ॥

जामवंत मैं पूँछउँ तोही । उचित सिखावनु दीजहु मोही ॥

मी रावणाला त्याच्या सहाय्यकांसह ठार मारुन त्रिकूट पर्वत उपटून येथे घेऊन येऊ शकतो. हे जांबुवाना, मी तुला विचारतो की, मला काय करायचे आहे, ते सांग.’ ॥ ५ ॥

एतना करहु तात तुम्ह जाई । सीतहि देखि कहहु सुधि आई ॥

तब निज भुज बल राजिवनैना । कौतुक लागि संग कपि सेना ॥

जांबवान म्हणाला, ‘ हे हनुमंता, तू इतकेच कर की, सीतेला पाहून परत ये आणि बातमी सांग. नंतर कमलनयन श्रीराम आपल्या बाहुबलाने राक्षसांचा संहार करुन सीतेला घेऊन येतील. लीला म्हणून ते वानरांची सेना बरोबर घेतील.॥  ६ ॥      

छंद—कपि सेन संग सँघारि निसिचर रामु सीतहि आनिहैं ।

त्रैलोक पावन सुजसु सुर मुनि नारदादि बखानिहैं ॥

जो सुनत गावत कहत समुझत परम पद नर पावई ।

रघुबीर पद पाथोज मधुकर दास तुलसी गावई ॥

वानरांची सेना बरोबर घेऊन, राक्षसांचा संहार करुन श्रीराम सीतेला घेऊन येतील. मग देव आणि नारदादी मुनी तिन्ही लोकांना पवित्र करणार्‍या त्यांच्या सुंदर कीर्तीचे वर्णन करतील. ते ऐकून, गाऊन, सांगून व समजून घेऊन मनुष्य परम पद प्राप्त करतील. श्रीरघुवीरांच्या चरण-कमलांवरील भ्रमर बनून तुलसीदास ती कीर्ती गात आहे.

दोहा—भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि ।

तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करहिं त्रिसिरारि ॥ ३० ( क) ॥

श्रीरघुवीरांची कीर्ती ही जन्म-मरणरुप भव-रोगाची अचूक औषधी आहे. जे स्त्री-पुरुष ती ऐकतील, त्यांचे मनोरथ श्रीराम पूर्ण करतील. ॥ ३० ( क ) ॥

सो० नीलोत्पल तन स्याम काम कोटि सोभा अधिक ।

सुनिअ तासु गुन ग्राम जासु नाम अघ खग बधिक ॥ ३० ( ख ) ॥

ज्यांचे नील कमलाप्रमाणे श्यामल शरीर आहे. ज्यांची शोभा कोट्यावधी कामदेवांहून अधिक आहे आणि ज्यांचे नाम हे पापरुपी पक्ष्यांना मारण्यासाठी पारध्यासारखे आहे, त्या श्रीरामांच्या लीलांच्या समूहांचे वर्णन ऐकावे. ॥ ३० ( ख ) ॥

मासपारायण, तेविसावा विश्राम

इति श्रीमत् रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने चतुर्थः सोपानः समाप्तः

कलियुगातील समस्त पापांचा नाश करणार्‍या श्रीरामचरितमानसाचा हा चौथा सोपान समाप्त झाला.

॥किष्किन्धाकाण्ड समाप्त ॥ 

      


Custom Search

No comments: