Monday, December 19, 2022

BhaktiYoga Part 7 Adhyay 12 Ovya 136 to 164 भक्तियोग भाग ७ अध्याय १२ ओव्या १३६ ते १६४

 

BhaktiYoga Part 7 
Shri Dnyaneshwari Adhyay 12 
Ovya 136 to 164 
भक्तियोग भाग ७ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या १३६ ते १६४

तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे ।

किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥ १३६ ॥

१३६) त्याप्रमाणें याच शरीरानें शरीराला येणें ( जन्माला येणें ) संपतें. फार काय सांगावें ? जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो.

पैं अभ्यासाचां पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी ।

ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥ १३७ ॥

१३७) मग अर्जुना, अभ्यासाच्या ( वरील ९ व्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणें ) पायरीनें ज्ञान ( परमेश्र्वराचे परोक्ष ज्ञान ) प्राप्त करुन घ्यावें व त्या ज्ञानाच्या योगानें ध्यानाच्या भेटीस यावें. ( त्या ज्ञानानें माझ्या स्वरुपाचें ध्यान करावें )

मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव ।

तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥ १३८ ॥

१३८) मग सर्व भाव ( कायिक, वाचिक, मानसिक भाव ) ध्यानाला आलिंगन देतात म्हणजे ध्यानात गढून जातात. त्या वेळेला कर्ममात्र जेंवढें आहे, तें दूर राहातें. ( म्हणजे होत नाहीं. कारण कर्में करण्याची साधनें किंवा द्वारें जी काया, वाचा व मन तीं सर्व ध्यानांत गढून गेल्यामुळें कर्मे करण्यास जाग्यावर कोणीच नसतात; म्हणून कर्मे होत नाहीत.   

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।

त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥ १३९ ॥

१३९) फळाला उत्पन्न करणारें जें कर्म तें जेव्हां दूर होतें, तेव्हां फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळें पूर्ण शांति ( पूर्ण ब्रह्मस्थिति ) हस्तगत होते.

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती ।

अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ॥ १४० ॥    

१४०) म्हणूनच अर्जुना, शांति प्राप्त होण्याकरितां हाच ( आतां सांगितलेला ) काय तो क्रम आहे; ( म्हणून ) सांप्रतकाळीं तुला अभ्यासच केला पाहिजे.

मूळ श्लोक

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।

ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥ १२ ॥

१२) अभ्यासापेक्षां ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षां ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षां कर्मफलत्याग अधिक बरा आणि कर्मफलत्यागापेक्षाहि शांति श्रेष्ठ आहे. 

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान ।

ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥

१४१) अर्जुना, मग अभ्यासापेक्षां ज्ञान हें खोल आहे आणि ज्ञानापेक्षां ध्यान अधिक महत्वाचें आहे.

मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।

त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

१४२) मग कर्मफलत्याग जो आहे, तो ध्यानापेक्षां चांगला आहे आणि कर्मफलत्यागापेक्षां शांतिसुखाचा भोग ( म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव ) चांगला आहे. 

ऐसिया या वाटा । इहींचि पेणां सुभटा ।

शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें ॥ १४३ ॥

१४३) अर्जुना, अशा या वाटेनें व याच मुक्कामाच्या क्रमानें ज्यानें शांतीचा मध्य गांठला,

मूळ श्लोक

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।

निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥

१३) सर्व भूतांच्या ठिकाणीं द्वेष न धरणारा, मैत्रीनें वागणारा आणि तसाच कृपायुक्त, मी-माझेंपण रहित, सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील, 

जो सर्व भूतांचां ठायीं । द्वेषातें नेणेचि कहीं ।

आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ॥ १४४ ॥

१४४) सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणें आपला व परकेपणाचा भाव कोठेंच नसतो, त्याप्रमाणें त्याला लोकांविषयीं आपला व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याहि प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही;

उत्तमातें धरिजे । अधम तरि अव्हेरिजे ।

हें कांहींच नेणिजे । वसुधा जेवीं ॥ १४५ ॥

१४५) उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून ( नीचाचा ) त्याग करावा, हें ज्याप्रमाणें पृथ्वी मुळींच जाणत नाही;

कां रायाचें देह चाळूं । रंका परौतें गाळूं ।

हें न म्हणेचि कृपाळू । प्राणु पैं गा ॥ १४६ ॥

१४६) किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असे कृपाळू प्राण केव्हांहि म्हणतच नाही;

गाईची तृषा हरुं । कां व्याघ्रा विष होऊनि मारुं ।

ऐसें नेणेचि का करुं । तोय जैसें ॥ १४७ ॥

१४७) गायीची तहान भागवूं आणि वाघाला विष होऊन मारुं, असें करणें पाण्याला जसें ठाऊकच नसतें; 

तैसी आघवांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री ।

कृपेशीं धात्री । आपणपां जो ॥ १४८ ॥

१४८) त्याप्रमाणें ऐक्यबोधानें संपूर्ण प्राणिमात्रांशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमि असतो;

आणि मी तूं हे भाष नेणे । माझें कांहींचि न म्हणे ।

सुखदुःख जाणणें । नाहीं जया ॥ १४९ ॥

१४९) आणखी मी- तूं अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझें असें तो कांहींच म्हणत नाही व ज्याला सुखदुःखांची जाणीव नसते; 

तेवींच क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं ।

संतोषा उत्संगीं । दिधलें घर ॥ १५० ॥  

१५०) त्याप्रमाणें क्षमेच्या बाबतीत, ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्यानें आपल्या माडीवर संतोषाला घर दिले आहे. ( संतोष ज्याच्यामुळें वाढता आहे. ) 

मूळ श्लोक

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥

१४) सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणीं ज्याचें मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणीं ज्यानें मन व बुद्धि अर्पण केलीं आहेत, असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे.  

वार्षियेंवीण सागरु । जैसा जळें नित्य निर्भरु ।

तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥ १५१ ॥

१५१) वर्षाॠतूशिवाय जसा समुद्र पाण्यानें नेहमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणताहि बाह्य उपचाराशिवाय संतोषानें नेहमीं पूर्ण भरलेला असतो.

वाहुनि आपुली आण । धरी जो अंतःकरण ।

निश्र्चया साचपण । जयाचेनि ॥ १५२ ॥

१५२) जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आंवरुन धरतो आणि ज्याच्या योगानें निश्चयाला खरेपणा असतो;

जीव परमात्मा दोन्ही । बैसोनि ऐक्यासनीं ।

जयाचां हृदयभुवनीं । विराजती ॥ १५३ ॥

१५३) त्याच्या अंतःकरणरपी घरामध्यें जीव व परमात्मा हे दोन्हीं ऐक्यरुपी आसनावर बसून शोभत आहेत. ( जीव व परमात्मा यांचें ऐक्य, ज्याच्या अनुभवाला आलें आहे );  

ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि ।

अर्पी मनोबुद्धि । माझां ठायीं ॥ १५४ ॥

१५४) असा ऐक्यरुपी ऐश्वर्यानें संपन्न होऊन जो आपलें मन व बुद्धि अखंड माझ्या ठिकाणीं अर्पण करितो;

आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाही चांगु ।

तरि माझा अनुरागु । सप्रेम जया ॥ १५५ ॥  

१५५) अंतःकरणांत ( आत्मैक्यप्रतीतीच्या दृढतेनें ) व बाह्य शरीरांत ( ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारें ) चांगल्या तर्‍हेनें योगांत तयार होऊन देखील, ज्याला माझ्या सगुण स्वरुपाविषयीं दृढ प्रेम असतें;  

अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु ।

तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥ १५६ ॥

१५६) अर्जुना, तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त; तो जशी कांहीं स्त्री व मी पति इतका तो मला आवडतो.

हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें ।

हेंही एथ थोडें । रुप करणें ॥ १५७ ॥

१५७) इतकेंच नाहीं, तर तो मला जीवाइतका प्यारा आहे. पण माझें जें त्याच्यावर प्रेम आहे, त्याला ही देखील उपमा अपुरी आहे.

तरी पढियंतयाची कहाणी । हे भुलीची भारणी ।

इयें तंव न बोलणीं । परि बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥

१५८) परंतु, प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखविण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा, असली न बोलावयाची गोष्ट ( पण ) बोलावयास लावते.

म्हणोनि गा आम्हां । वेगा आली उपमा ।

एर्‍हवीं काय प्रेमा । अनुवादु असे ॥ १५९ ॥

१५९) म्हणून आम्ही ( बायकोची व जीवाची ) झटकन उपमा देऊं शकलों.  नाहीं तर हे प्रेम बोलून दाखविण्यांत येईल काय ?

आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी ।

दुणा थांव उठी । आवडी गा ॥ १६० ॥ 

१६०) आतां अर्जुना, हें असूं दे. पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढतें.

तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये ।

तिये गोडीसी आहे । कांटाळें मग ॥ १६१ ॥

१६१) त्यांत आणखी कदाचित् संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला, तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा आहे काय ?

म्हणोनि गा पांडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता ।

वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ॥ १६२ ॥

१६२) म्हणून अर्जुना, तूंच प्रेमळ भक्त आणि तूंच श्रोता आहेस;  शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली.

तरी आतां बोलों । भलेया सुखा मीनलों ।

ऐसें म्हणतखेंवीं डोलों । लागले देवो ॥ १६३ ॥

१६३) ( जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवितां येत नाहीं, तरी मागील ओवींत सांगितल्याप्रमाणें प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे ) म्हणून आतां मी बोलतोंच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे ! असें म्हणतांक्षणीं देव डोलावयास लागले.

मग म्हणे जाण । तया भक्तांचें लक्षण ।

जया मी अंतःकरण । बैसों घालीं ॥ १६४ ॥   

१६४) मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपलें अंतःकरण बसावयास घालतों, त्या भक्ताचीं लक्षणें समजून घे. 




Custom Search

No comments: