Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 10 Doha 21 to 23 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १० दोहा २१ ते २३

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 10 
Doha 21 to 23 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १० 
दोहा २१ ते २३

सो०—रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनिअ न छोट करि ।

अस कहि बिबिध बिलाप करि लागी रोदन करन ॥ २१ ( क ) ॥

शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प यांना कधी लहान समजू नये.’ असे म्हणून शूर्पणखा अनेक प्रकारे विलाप करु लागली. ॥ २१ ( क ) ॥

दोहा—सभा माझ परि ब्याकुल बहु प्रकार कह रोइ ।

तोहि जिअत दसकंधर मोरि कि असि गति होइ ॥ २१ ( ख ) ॥

रावणाच्या सभेत ती व्याकूळ होऊन पडली आणि अनेक प्रकारे रडरडून म्हणू लागली की, ‘ अरे दशग्रीवा, तू जिवंत असताना माझी अशी दशा व्हावी काय ? ॥ २१ ( ख ) ॥

सुनत सभासद उठे अकुलाई । समुझाई गहि बॉंह उठाई ॥

कह लंकेस कहसि निज बाता । केइँ तव नासा कान निपाता ॥

शूर्पणखेचे बोलणे ऐकताच सभासद बेचैन झाले. त्यांनी शूर्पणखेचा हात धरुन तिला उठवले आणि तिची समजूत घातली. लंकापती रावण म्हणाला, ‘ आधी तुझी हकीकत तर सांग. कुणी तुझे नाक-कान कापले ? ॥ १ ॥

अवध नृपति दसरथ के जाए । पुरुष सिंघ बन खेलन आए ॥

समुझि परी मोहि उन्ह कै करनी । रहित निसाचर करिहहिं धरनी ॥

ती म्हणाली, ‘ अयोध्येचा राजा दशरथाचे पुत्र पुरुष-सिंह आहेत. वनात ते शिकार करण्यासाठी आले आहेत. मला त्यांची करणी अशी वाटली की, ते पृथ्वीला राक्षसरहित करुन टाकतील. ॥ २ ॥

जिन्ह कर भुजबल पाइ दसानन । अभय भए बिचरत मुनि कानन ॥

देखत बालक काल समाना । परम धीर धन्वी गुन नाना ॥

त्यांच्या भुज-बळावर हे दशमुख, मुनी लोक वनात निर्भयपणे वावरु लागले आहेत. दिसायला ते बालक आहेत, परंतु आहेत काळासारखे. ते परम धीर, श्रेष्ठ धनुर्धर आणि अनेक गुणांनी युक्त आहेत. ॥ ३ ।

अतुलित बल प्रताप द्वौ भ्राता । खल बध रत सुर मुनि सुखदाता ॥

सोभा धाम राम अस नामा । तिन्ह के संग नारि एक स्यामा ॥

दोघे भाऊ बळाने व प्रतापाने अतुलनीय आहेत. ते दुष्टांचा वध करुन देव व मुनींना सुख देणारे आहेत. ते शोभेचे माहेर आहेत. त्यापैकी एकाचे नाव ‘ राम ‘ आहे. त्यांच्याबरोबर एक सुंदर तरुण स्त्री आहे. ॥ ४ ॥

रुप रासि बिधि नारि सँवारी । रति सत कोटि तासु बलिहारी ॥

तासु अनुज काटे श्रुति नासा । सुनि तव भगिनि करहिंपरिहासा ॥

विधात्याने त्या स्त्रीला रुपाची राशी बनविले आहे. ती इतकी सुंदर आहे की, शंभर कोटी रतींना तिच्यावरुन ओवाळून टाकावे. रामाच्या लहान भावाने माझे नाक-कान कापून टाकले. मी तुझी बहीण आहे, हे ऐकून ते माझी चेष्टा करु लागले. ॥ ५ ॥

खर दूषन सुनि लगे पुकारा । छन महुँ सकल कटक उन्ह मारा ॥

खर दूषन तिसिरा कर घाता । सुनि दससीस जरे सब गाता ॥

माझी हाक ऐकून खर-दूषण मदतीला आले. परंतु एका क्षणात रामाने सर्व सेना मारुन टाकली.’ खर, दूषण आणि त्रिशिरा यांचा वध झाल्याचे ऐकून रावणाच्या सर्व अंगाची लाही लाही झाली. ॥ ६ ॥

दोहा—सूपनखहि समुझाइ करि बल बोलेसि बहु भॉंति ।

गयउ भवन अति सोचबस नीद परइ नहिं राति ॥ २२ ॥

त्याने शूर्पणखेची समजूत घालून पुष्कळ प्रकारे आपल्या बळाची पौढी सांगितली. परंतु मनातून तो अत्यंत चिंतित होऊन आपल्या महालात गेला. त्याला रात्रभर झोप आली नाही. ॥ २२ ॥

सुर नर असुर नाग खग माहीं । मोरे अनुचर कहँ कोउ नाही ॥

खर दूषन मोहि सम बलवंता । तिन्हहि को मारइ बिनु भगवंता ॥

तो मनातल्या मनात विचार करु लागला की, देव, मनुष्य, असुर, नाग आणि पक्ष्यांमध्ये कोणी असा नाही की, जो माझ्या सेवकावरही मात करु शकेल. खर-दूषन तर माझ्यासारखेच बलवान होते. त्यांना भगवंताशिवाय दुसरा कोण मारु शकेल ? ॥ १ ॥

सुर रंजन भंजन महि भारा । जौं भगवंत लीन्ह अवतारा ॥

तौ मैं जाइ बैरु हठि करऊँ । प्रभु सर प्रान तजें भव तरऊँ ॥

देवांना आनंद देणार्‍या व पृथ्वीचा भार हरण करणार्‍या भगवंतानेच जर अवतार घेतला असेल, तर मी जाऊन मुद्दाम त्यांच्याशी वैर करीन आणि प्रभूंच्या बाणाने प्राण सोडून भवसागर तरुन जाईन. ॥ २ ॥    

होइहि भजनु न तामस देहा । मन क्रम बचन मंत्र दृढ़ एहा ॥

जौं नररुप भूपसुत कोऊ । हरिहउँ नारि जीति रन दोऊ ॥

या माझ्या तामस शरीराने भजन होणार नाही. म्हणून कायावाचामनाने त्यांच्याशी वैर करणे हाच माझा दृढ निश्चय आहे. आणि जर ते मनुष्यरुप असलेले कुणी राजकुमार असतील, तर मी त्या दोघांना युद्धात जिंकून त्यांच्या स्त्रीचे हरण करीन. ॥ ३ ॥

चला अकेल जान चढ़ि तहवॉं । बस मारीच सिंधु तट जहवॉं ॥

इहॉं राम जसि जुगुति बनाई । सुनहु उमा सो कथा सुहाई ॥

असा विचार करुन रावण समुद्रतटावर जिथे मारीच राहात होता, तिथे रथात बसून एकटाच गेला. शिव म्हणतात, हे पार्वती, इथे श्रीरामचंद्रांनी काय युक्ती केली, ती सुंदर कथा ऐक. ॥ ४ ॥

दोहा---लछिमन गए बनहिं जब लेन मूल फल कंद ।

जनकसुता सन बोले बिहसि कृपा सुख बृंद ॥ २३ ॥

लक्ष्मण जेव्हा कंद, मूल, फल आणण्यासाठी वनात गेला, तेव्हा एकांतात कृपा व सुखाचे निधान असलेले श्रीरामचंद्र हसून जानकीला म्हणाले, ॥ २३ ॥

सुनहु प्रिया ब्रत रुचिर सुसीला । मैं कछु करबि ललित नरलीला ॥

तुम्ह पावक महुँ करहु निवासा । जौ लगि करौं निसाचर नासा ॥

‘ हे प्रिये, हे सुंदर पातिव्रत्यधर्माचे पालन करणार्‍या सुशीले, ऐक. मी आता काही मनोहर मनुष्य-लीला करीन. म्हणून मी राक्षसांचा नाश करीपर्यंत तू अग्नीत निवास कर. ॥ १ ॥

जबहिं राम सब कहा बखानी । प्रभु पद धरि हियँ अनल समानी ॥

निज प्रतिबिंब राखि तहँ सीता । तैसइ सील रुप सुबिनीता ॥

श्रीरामांनी सर्व समजावून सांगताच सीतेने प्रभूंचे चरण हृदयात धारण करुन ती अग्नीमध्ये समाविष्ट झाली. सीतेने आपलीच छायामूर्ती येथे ठेवली. ती तिच्यासारखीच शील-स्वभाव-रुपाची आणि विनम्र होती. ॥ २ ॥

लछिमनहूँ यह मरमु न जाना । जो कछु चरित रचा भगवाना ॥

दसमुख गयउ जहॉं मारीचा । नाइ माथ स्वारथ रत नीचा ॥

भगवंतांनी जी लीला मांडली होती, तिचे रहस्य लक्ष्मणालासुद्धा समजले नाही. स्वार्थपरायण आणि नीच रावण मारीचाकडे गेला व त्याच्यापुढे नतमस्तक झाला. ॥ ३ ॥

नवनि नीच कै अति दुखदाई । जिमि अंकुस धनु उरग बिलाई ॥

भयदायक खल कै प्रिय बानी । जिमि अकाल के कुसुम भवानी ॥

नीच मनुष्याने नम्रता दाखविणे हे अत्यंत दुःखदायक असते. जसे, अंकुश, धनुष्य, साप व मांजर यांचे झुकणे. हे भवानी, दुष्टाची गोड वाणीसुद्धा भय देणारी असते, ज्याप्रमाणे ऋतू नसताना फूल उमलणे, भयसूचक असते. ॥ ४ ॥   



Custom Search

No comments: