Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ३१. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग ३१. Show all posts

Sunday, August 9, 2020

ShriRamCharit Manas Part 31 श्रीरामचरितमानस भाग ३१


 ShriRamCharit Manas Part 31

श्रीरामचरितमानस भाग ३१

दोहा १८० ते १८२

Doha 180 to 182

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा--कुमुख अकंपन कुलिसरद धूमकेतु अतिकाय ।

एक एक जग जीति सक ऐसे सुभट निकाय ॥ १८० ॥

( याशिवाय ) दुर्मुख, अकंपन, वज्रदंत, धूमकेतू, अतिकाय इत्यादी असे अनेक योद्धे होते. ते एक-एकटेच सर्व जगाला जिंकणारे होते. ॥ १८० ॥

कामरुप जानहिं सब माया । सपनेहुँ जिन्ह कें धरम न दाया॥

दसमुख बैठ सभाँ एक बारा । देखि अमित आपन परिवारा॥

सर्व राक्षस हवे तसे रुप घेऊ शकत होते आणि आसुरी ( माया ) जाणत होते. दया, धर्म हे कधी त्यांच्या स्वप्नातच येत नसत. एकदा सभेत बसलेल्या रावणाने आपला असंख्य परिवार पाहिला. ॥ १ ॥

  , सुत समूह जन परिजन नाती । गनै को पार निसाचर जाती ॥

सेन बिलोकि सहज अभिमानी । बोला बचन क्रोध मद सानी ॥

पुत्र, पौत्र, कुटुंबीय आणि सेवक अगणित होते. त्या संपूर्ण राक्षस जातीला मोजणार कोण ? आपली सेना पाहून स्वभावतःच घमेंडखोर रावण रागाने व गर्वाने म्हणाला, ॥ २ ॥

सुनहु सकल रजनीचर जूथा । हमरे बैरी बिबुध बरुथा ॥

ते सनमुख नहिं करहिं लराई । देखि सबल रिपु जाहिं पराई ॥

' हे सर्व राक्षसगण हो ! ऐका. देव हे आपले शत्रू आहेत. ते समोर येऊन युद्ध करीत नाहीत. बलाढ्य शत्रू पाहिला की, पळून जातात. ॥ ३ ॥

तेन्ह कर मरन एक बिधि होई । कहउँ बुझाइ सुनहु अब सोई ।

द्विजभोजन मख होम सराधा । सब कै जाइ करहु तुम्ह बाधा ॥

त्यांना एकाच उपायाने मारता येते. तो मी तुम्हांला सांगतो. ऐका. ( त्यांना बळ देणारे ) ब्राह्मणभोजन, यज्ञ, हवन आणि श्राद्ध हे आहेत. या सर्वांमध्यें तुम्ही जाऊन विघ्न आणा. ॥ ४ ॥

 दोहा--छुधा छीन बलहीन सुर सहजेहिं मिलिहहिं आइ ।

तब मरिहउँ कि छाड़िहउँ भली भाँति अपनाइ ॥ १८१ ॥

भुकेने दुर्बळ आणि अशक्त झाल्यावर देव सहजपणें शरण येतील. त्यांना मी ठार मारीन किंवा पूर्णपणे आपल्या अधीन करुन सोडून देईन. ' ॥ १८१ ॥

मेघनाद कहुँ पुनि हँकरावा । दीन्हीं सिख बलु बयरु बढ़ावा ॥

जे सुर समर धीर बलवाना । जिन्ह कें लरिबे कर अभिमाना ॥

मग त्याने मेघनादाला बोलावले. सांगून समजावून त्याचे सामर्थ्य वाढेल व देवांविषयी शत्रुभाव वाढेल, असे प्रोत्साहन दिले. ( मग तो म्हणाला, ) ' हे पुत्रा, जे देव युद्धवीर आहेत, बलवान आहेत आणि ज्यांना लढण्याची खुमखुमी आहे, ॥ १ ॥

तिन्हहि जीति रन आनेसु बाँधी । उठि सुत पितु अनुसासन काँधी ॥

एहि बिधि सबही अग्या दीन्ही । आपुन चलेउ गदा कर लीन्ही ॥

त्यांना युद्धांत जिंकून पकडून आण.' मुलाने उठून पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली. त्याने सर्वांना आज्ञा दिली आणि तो स्वतः हातात गदा घेऊन निघाला. ॥ २ ॥

चलत दसानन डोलति अवनी । गर्जत गर्भ स्त्रवहिं सुर रवनी ॥

रावन आवत सुनेउ सकोहा । देवन्ह तके मेरु गिरि खोहा ॥

रावण चालू लागला, तेव्हा त्याच्या चालण्याने पृथ्वी डळमळू लागली आणि गर्जनेमुळे देवांगनांचे गर्भपात होऊ लागले. रावण रागारागाने येत असल्याचे पाहून देवगण सुमेरु पर्वतातील गुहांमधून आसरा शोधू लागले. ॥ ३ ॥

दिगपालन्ह के लोक सुहाए । सूने सकल दसानन पाए ॥

पुनि पुनि सिंघनाद करि भारी । देइ देवतन्ह गारि पचारी ॥

दिक्पालांचे जे लोक होते, ते रावणाला ओसाड पडलेले दिसले. तो वारंवार प्रचंड सिंहगर्जना करुन देवांना ललकारुन शिव्या देत होता. ॥ ४ ॥

रन मद मत्त फिरइ जग धावा । प्रतिभट खोजत कतहुँ न पावा ॥

रबि ससि पवन बरुन धनधारी । अगिनि काल जम सब अधिकारी ॥

मदाने उन्मत्त झालेला रावण रणामध्ये आपल्या जोडीचा योद्धा शोधत जगभर फिरला, परंतु त्याला आपल्या तोडीचा योद्धा कुठेही मिळाला नाही. सूर्य, चंद्र, वायू, वरुण, कुबेर, अग्नी, काल, यम इत्यादी सर्व अधिकारी, ॥ ५ ॥

किंनर सिद्ध मनुज सुर नागा । हठि सबही के पंथहिं लागा ॥

ब्रह्मसृष्टि जहँ लगि तनुधारी । दसमुख बसबर्ती नर नारी ॥

किन्नर, सिद्ध, मनुष्य, देव आणि नाग या सर्वांच्या मागे तो हट्टाने लागला. ( कुणालाही त्याने शांतपणे बसू दिले नाही. ) ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील जितके शरीरधारी स्त्री-पुरुष होते, ते सर्व रावणाच्या अधीन झाले. ॥ ६ ॥

आयसु करहिं सकल भयभीता । नवहिं आइ नित चरन बिनीता ॥

भयामुळे सर्वजण त्याची आज्ञा पाळत होते आणि नित्य येऊन त्याच्या पायांवर मस्तक ठेवीत होते. ॥ ७ ॥

दोहा--भुजबल बिस्व बस्य करि राखेसि कोउ न सुतंत्र ।

मंडलीक मनि रावन राज करइ निज मंत्र ॥ १८२ ( क) ॥

रावणाने बाहुबलाने संपूर्ण विश्र्वाला आपल्या ताब्यात घेतले. कुणालाही स्वतंत्र ठेवले नाही. अशा प्रकारे मांडलिक राजांचा अधिपती सार्वभौम सम्राट असलेला रावण मन मानेल तसे राज्य करु लागला. ॥ १८२ ( क) ॥

देव जच्छ गंधर्व नर किंनर नाग कुमारि ।

जीति बरीं निज बाहुबल बहु सुंदर बर नारि ॥ १८२ ( ख ) ॥

देव, यक्ष, गंधर्व, मनुष्य, किन्नर आणि नाग यांच्या कन्या व इतरही सुंदर तसेच उत्तम स्त्रिया त्याने बाहुबलाने जिंकून आणून त्यांच्याशी विवाह केला. ॥ १८२ ( ख ) ॥

इंद्रजीत सन जो कछु कहेऊ । सो सब जनु पहिलेहिं करि रहेऊ ॥

प्रथमहिं जिन्ह कहुँ आयसु दीन्हा । तिन्ह कर चरित सुनहु जो कीन्हा ॥

मेघनादाला त्याने जे सांगितले होते, ते त्याने ( मेघनादाने ) पूर्वीच करुन टाकलेले असे ( अर्थात रावणने सांगताच मेघनाद आज्ञा पाळण्यास जरासुद्धा वेळ लावत नसे. ) ज्यासाठी त्याला पूर्वीच आज्ञा दिल्या होत्या, त्या पाळताना त्याने गाजविलेले कर्तृत्व ऐका. ॥ १ ॥

देखत भीमरुप सब पापी । निसिचर निकर देव परितापी ॥

करहिं उपद्रव असुर निकाया । नाना रुप धरहिं करि माया ॥

सर्व राक्षसांचे समुदाय दिसायला भयंकर, पापी आणि देवांना दुःख देणारे होते. ते समुदाय फार उपद्रव देत व मायेने अनेक प्रकारची रुपे धरीत असत. ॥ २ ॥

जेहि बिधि होइ धर्म निर्मूला । सो सब करहिं बेद प्रतिकूला ॥

जेहिं जेहिं देस धेनु द्विज पावहिं । नगर गाउँ पुर आगि लगावहिं ॥

ज्यामुळे धर्म समूळ नष्ट होईल, अशी वेदविरुद्ध सर्व कामे ते करीत. ज्या ज्या ठिकाणी गाई व ब्राह्मण दिसत, त्या नगरांना, गावांना व वस्त्यांना ते आगी लावत. ॥ ३ ॥

सुभ आचरन कतहुँ नहिं होई । देव बिप्र गुरु मान न कोई ॥

नहिं हरिभगति जग्य तप ग्याना । सपनेहुँ सुनिअ न बेद पुराना ॥

त्यांच्या भयानें कुठेही शुभ आचरण ( ब्राह्मण भोजन, यज्ञ, श्राद्ध इत्यादी ) होत नसे. देव, ब्राह्मण, गुरु यांना कोणीही जुमानत नसे. हरिभक्ती नव्हती, यज्ञ नव्हते, तप व ज्ञान नव्हते. वेद आणि पुराणांचे नाव स्वप्नातही ऐकू येत नसे. ॥ ४ ॥





Custom Search