Saturday, March 14, 2020

ShriRamCharitManas Part 5 श्रीरामचरितमानसस भाग ५


ShriRamCharitManas Part 5 श्रीरामचरितमानसस भाग ५
 ShriRamCharitManas Part 5
श्रीरामचरितमानसस भाग ५
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—राम नाम मनिदीप धरु जीह देहरीं द्वार ।
तुलसी भीतर बाहेरहुँ जौं चाहसि उजिआर ॥ २१ ॥
तुलसीदास म्हणतात की, जर तुम्हांला आत व बाहेर प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरुपी दाराच्या जीभरुपी उंबरठ्यावर रामनामरुपी रत्नदीप ठेवा. ॥ २१ ॥
नाम जीहँ जपि जागहिं जोगी । बिरति बिरंचि प्रपंच बियोगी ॥
ब्रह्मसुखहि अनुभवहिं अनूपा । अकथ अनामय नाम न रुपा ॥
ब्रह्मदेवाने बनविलेल्या प्रपंचामधून पूर्णपणे सुटलेले वैराग्यवान, मुक्त योगी पुरुष हे नाम जिभेने जपत ( तत्वज्ञानरुपी दिवसामध्ये ) जागतात आणि नाम-रुपाने रहित असे अनुपम, अनिर्वचनीय, अनामय ब्रह्मसुख अनुभवतात. ॥ १ ॥
जाना चहहिं गूढ गति जेऊ । नाम जीहँ जपि जानहिं तेऊ ॥
साधक नाम जपहिं लय लाएँ । होहिं सिद्ध अनिमादिक पाएँ ॥
जे परमात्म्याचा यथार्थ महिमा जाणू इच्छितात, ते सुद्धा जिभेने नामाचा जप करुन ते जाणून घेतात. ( लौकिक सिद्धी प्राप्त करु इच्छिणारे अर्थार्थी ) साधक मन लावून नामाचा जप करतात आणि अणिमादी ( अष्ट ) सिद्धी प्राप्त करुन सिद्ध बनतात. ॥ २ ॥
जपहिं नामु जन आरत भारी । मिटहिं कुसंकट होहिं सुखारी ॥
राम भगत जग चारि प्रकारा । सुकृती चारिउ अनघ उदारा ॥
आर्त ( संकटग्रस्त ) भक्त नामजप करतात, तेव्हा त्यांची मोठ-मोठी संकटे नाहीशी होतात आणि ते सुखी होतात. जगात चार प्रकारचे [ (१) अर्थार्थी—द्रव्यादीच्या इच्छेने भजणारे, (२) आर्त—संकटातून सुटका करुन घेण्यासाठी भजणारे, (३) जिज्ञासू—भगवंतांना जाणून घेण्याच्या इच्छेने भजणारे, (४) ज्ञानी—भगवंतांना तत्त्वतः जाणून स्वाभाविक प्रेमाने भजणारे ] रामभक्त आहेत आणि हे चारी पुण्यात्मे, पापरहित आणि उदार आहेत. ॥ ३ ॥
चहू चतुर कहुँ नाम अधारा । ग्यानी प्रभुहि बिसेषि पिआरा ॥
चहुँ जुग चहुँ श्रुति नाम प्रभाऊ । कलि बिसेषि नहिं आन उपाऊ ॥
चारहि चतुर भक्तांना नामाचाच आधार आहे. यापैकी ज्ञानी भक्त हा प्रभूला विशेष आवडतो. तसे पाहिले तर चारी युगांमध्ये आणि चारी वेदांमध्ये नामाचा प्रभाव आहे, परंतु कलियुगामध्ये तो विशेष आहे. या युगामध्ये नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. ॥ ४ ॥
दोहा—सकल कामना हीन जे राम भगति रस लीन ॥
नाम सुप्रेम पियूष हृद तिन्हहुँ किए मन मीन ॥ २२ ॥
जे सर्व प्रकारच्या ( भोग व मोक्षाच्यासुद्धा ) कामनांनी रहित असतात व श्रीरामभक्तीच्या रसामध्ये मग्न असतात, त्यांनी सुद्धा नामाच्या सुंदर प्रेमरुपी अमृत-सरोवरात आपले मन मासा बनवून ठेवले आहे. ( अर्थात ते नामरुपी अमृतापासून क्षणभरही दूर होऊ इच्छित नाहीत. ) ॥ २२ ॥
अगुन सगुन दुइ ब्रह्म सरुपा । अकथ अगाध अनादि अनूपा ॥
मोंरें मत बड नामु दुहू तें । किए जेहिं जुग निज बस निज बूतें ॥
निर्गुण व सगुण ही ब्रह्माची दोन स्वरुपे आहेत. दोन्हीही सांगता न येणारी, अथांग, अनादी व अनुपम आहेत. माझ्या मते ‘ नाम ‘ हे दोन्ही रुपांपेक्षा मोठे आहे. कारण त्याने आपल्या शक्तीने ( सगुण-निर्गुण ) दोघांनाही आपल्या अधीन करुन ठेवले आहे. ॥ १ ॥
प्रौढिसुजन जनि जानहिं जन की । कहउँ प्रतीति प्रीति रुचि मन की ॥
एकु दारुगत देखिअ एकू । पावक सम जुग ब्रह्म बिबेकु ॥
उभय अगम जुग सुगम नाम तें । कहेउँ नामु बड ब्रह्म राम तें ॥
ब्यापकु एकु ब्रह्म अबिनासी । सत चेतन घन आनँद रासी ॥
सज्जनांनी या गोष्टीला मज दासाचे धार्ष्ट्य किंवा निव्वळ काव्योक्ती समजू नये. मी माझ्या मनातील विश्र्वास, प्रेम आणि आवडीची गोष्ट सांगत आहे. ( निर्गुण व सगुण ) या दोन्ही प्रकारच्या ब्रह्माचे ज्ञान हे अग्निप्रमाणे आहे. निर्गुण ह्या काष्ठामधील अग्निप्रमाणे न दिसणारे आणि सगुण हे प्रत्यक्ष दिसणार्‍या अग्निप्रमाणे आहे. दोन्हीही जाणण्यास कठीण आहेत, परंतु नामामुळे ती सुगम बनतात. म्हणूनच मी नामाला ( निर्गुण ) ब्रह्मापेक्षा आणि सगुण रामापेक्षा मोठे असे म्हटले आहे. ब्रह्म हे व्यापक, एक, अविनाशी व सच्चिदानंदघन आहे. ॥ २-३ ॥
अस प्रभु हृदयँ अछत अबिकारी । सकल जीव जग दीन दुखारी ॥
नाम निरुपन नाम जतन तें । सोउ प्रगटत जिमि मोल रतन तें ॥
असे विकाररहित प्रभू हृदयात राहात असूनही जगातील सर्व जीव हे दीन आणि दुःखी आहेत. नामाचे यथार्थ स्वरुप, महिमा, रहस्य व प्रभाव जाणून श्रद्धेने नामजपरुपी साधन केल्यामुळे ज्याप्रमाणे रत्न जाणण्यामुळे त्याचे मूल्य कळते, तसे ब्रह्म ज्ञात होते. ॥ ४ ॥
दोहा—निरगुन तें एहि भॉति बड नाम प्रभाउ अपार ।
कहउँ नामु बड राम तें निज बिचार अनुसार ॥ २३ ॥
अशारीतीने निर्गुणापेक्षा नामाचा प्रभाव फार मोठा आहे. आता मी माझे मत सांगतो की, नाम हे ( सगुण ) रामापेक्षाही मोठे आहे. ॥ २३ ॥
राम भगत हित नर तनु धारी । सहि संकट किए साधु सुखारी ॥
नामु सप्रेम जपत अनयासा । भगत होहिं मुद मंगल बासा ॥
श्रीरामांनी भक्तांच्या कल्याणासाठी मनुष्यशरीर धारण करुन व स्वतः कष्ट सहन करुन साधूंना सुखी केले, परंतु भक्तजन प्रेमाने त्यांच्या नामाचा जप करीत सहजपणे आनंद व कल्याण यांचे निवासस्थान बनून जातात. ॥ १ ॥
  राम एक तापस तिय तारी । नाम कोटि खल कुमति सुधारी ॥
रिषि हित रामसुकेतुसुता की । सहित सेन सुत कीन्हि बिबाकी ॥
सहित दोष दुख दास दुरासा । दलइ नामु जिमि रबि निसि नासा ॥
भंजेउ राम आपु भव चापू । भव भय भंजन नाम प्रतापू ॥
( हेच पाहात ! ) श्रीरामांनी केवळ एका मुनीच्या पत्नीचा ( अहल्येचा ) उद्धार केला, परंतु नामाने कोट्यावधि दुष्टांची बिघडलेली बुद्धी सुधारली. श्रीरामांनी विश्र्वामित्र ऋषींच्यासाठी सुकेतु यक्षाची कन्या ताडका हिचा, सेना आणि तिचा पुत्र ( सुबाहु ) यांच्यासह नाश केला. परंतु नाम हे आपल्या भक्तांचे दोष, दुःख आणि दुष्ट वासना यांचा असा नाश करते, जसा सूर्य रात्रीचा नाश करतो. श्रीरामांनी स्वतः ( एक ) शिव-धनुष्य मोडून टाकले, परंतु नामाचा प्रतापच संसारातील सर्व भयांचा नाश करणारा आहे. ॥ २-३ ॥
दंडक बनु प्रभु कीन्ह सुहावन । जन मन अमित नाम किए पावन ॥
निसिचर निकर दले रघुनंदन । नामु सकल कलि कलुष निकंदन ॥
प्रभू श्रीरामांनी ( भयानक ) दंडकवन शोभिवंत करुन टाकले, परंतु नामाने असंख्य मनुष्यांची मने पवित्र केली. श्रीरघुनाथांनी राक्षसांच्या सेना मारुन टाकल्या, परंतु नाम तर कलियुगातील सर्व पापांचे मूळच उपटून टाकणारे आहे. ॥ ४ ॥
दोहा—सबरी गीध सुसेवकनि सुगति दीन्हि रघुनाथ ।
नाम उधारे अमित खल बेद बिदित गुन गाथ ॥ २४ ॥
श्रीरघुनाथांनी शबरी, जटायू इत्यादी उत्तम सेवकांना मुक्ती दिली, परंतु नामाने असंख्य दुष्टांचा उद्धार केला. नामाच्या गुणांच्या कथा वेदांमध्ये प्रसिद्ध आहेत. ॥ २४ ॥
राम सुकंठ बिभीषन दोऊ । राखे सरन जान सबु कोऊ ॥
नाम गरीब अनेक नेवाजे । लोक बेद बर बिरिद बिराजे ॥
श्रीरामांनी सुग्रीव, बिभिषण या दोघांनाच आपला आश्रय दिला, हे सर्वजणांना ठाऊक आहे, परंतु नामाने अनेक गरिबांच्यावर कृपा केली आहे. नामाचे सुंदर माहात्म्य लोकांमध्ये आणि वेदांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ॥ १ ॥
राम भालु कपि कटकु बटोरा । सेतु हेतु श्रमु कीन्ह न थोरा ॥
नामु लेत भवसिंधु सुखाहीं । करहु बिचारु सुजन मन माहीं ॥
श्रीरामांनी अस्वले आणि वानर यांची सेना एकत्र केली आणि समुद्रावर पूल बांधण्यासाठी काही कमी कष्ट घेतले नाहीत, परंतु नाम घेताच भवसागर आटून जातो. सज्जनांनो, मनात विचार करा. ( की, दोघांमध्ये कोण मोठे आहे. ) ॥ २ ॥
  राम सकुल रन रावनु मारा । सीय सहित निज पुर पगु धारा ॥
राजा रामु अवध रजधानी । गावत गुर सुर मुनि बर बानी ॥
सेवक सुमिरत नामु सप्रीती । बिनु श्रम प्रबल मोह दलु जीती ॥
फिरत सनेहँ मगन सुख अपनें । नाम प्रसाद सोच नहिं सपनें ॥
श्रीरामांनी युद्धामध्ये रावणाला परिवारासह मारले. नंतर सीतेसह आपल्या नगरात प्रवेश केला. प्रभु राम हे राजा झाले, अयोध्या ही त्यांची राजधानी झाली. देव आणि मुनी सुंदर वाणीने त्यांचे गुण गातात. परंतु सेवक (भक्त) प्रेमाने नामाचे फक्त स्मरण करताच विनासायास मोहाच्या प्रबळ सेनेला जिंकून व प्रेमात मग्न होऊन आत्मसुखात रममाण होतात. नामाच्या प्रसादामुळे त्यांना स्वप्नातही कोणती काळजी सतावीत नाही. ॥ ३-४ ॥
दोहा—ब्रह्म राम तें नामु बड बर दायक बर दानि ।
रामचरित सत कोटि महँ लिय महेस जियँ जानि ॥ २५ ॥
अशाप्रकारे नाम हे निर्गुण ब्रह्म आणि सगुण श्रीराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे नाम वरदान देणार्‍यांनाही वर देणारे आहे. श्रीशंकरांनी आपल्या मनात हे जाणून शतकोटी रामचरित्रामधून या ‘ राम ‘ नामाला ( साररुपाने निवडून ) ग्रहण केले आहे. ॥ २५ ॥
            मासपारायण, पहिला विश्राम   
नाम प्रसाद संभु अबिनासी । साजु अमंगल मंगल रासी ॥
सुक सनकादि सिद्ध मुनि जोगी । नाम प्रसाद ब्रह्मसुख भोगी ॥
नामाच्या कृपेमुळे शंकर अविनाशी आहेत आणि त्यांनी अमंगल वेश धारण केला असला, तरी ते मंगलाची खाण आहेत. शुकदेव व सनकादिक सिद्ध, मुनी आणि योगीजन हे नामाच्या प्रसादाने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत आहेत. ॥ १ ॥
नारद जानेउ नाम प्रतापू । जग प्रिय हरि हरि हर प्रिय आपू ॥
नामु जपत प्रभु कीन्ह प्रसादू । भगत सिरोमनि भे प्रहलादू ॥
नारद मुनी हे नामाचा प्रताप जाणतात. सर्व जगाला हरी प्रिय आहेत. ( तर हरीला हर प्रिय आहेत. ) आणि ( नामजपामुळे ) नारद हरि-हर या दोघांनाही प्रिय आहेत. नाम जपल्यामुळे भगवंताने कृपा केली, त्यामुळे प्रल्हाद भक्तशिरोमणी झाला. ॥ २ ॥
ध्रुवँ सगलानि जपेउ हरि नाऊँ । पायउ अचल अनूपम ठाऊँ ॥
सुमिरि पवनसुत पावन नामू । अपने बस करि राखे रामू ॥
ध्रुवाने सावत्र आईच्या बोलण्यामुळे दुःखी होऊन सकाम भावनेने हरीचे नाम जपले. त्याच्या भावामुळे त्याला अढळ स्थान ( ध्रुवलोक ) मिळाले. हनुमानाने पवित्र नामाचे स्मरण करुन श्रीरामांना आपल्या अधीन करुन ठेवले. ॥ ३ ॥
अपतु अजामिलु गजु गनिकाऊ । भए मुकुत हरि नाम प्रभाऊ ॥
कहौं कहॉ लगि नाम बडाई । रामु न सकहिं नाम गुन गाई ॥
नीच अजामिळ, गजेंद्र, वेश्या हे सुद्धा श्रीहरीच्या नामप्रभावाने मुक्त झाले. तर मी नामाचे माहात्म्य किती सांगू ? श्रीराम स्वतःसुद्धा नामाचे गुण वर्णन करु शकत नाहीत. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: