Monday, March 30, 2020

ShriRamCharitManas Part 7 श्रीरामचरितमानस भाग ७


ShriRamCharitManas Part 7 श्रीरामचरितमानस भाग ७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड


दोहा—रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु ।
तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ॥ ३१ ॥
तुलसीदास म्हणतात की, रामकथा ही मंदाकिनी नदी होय, निर्मळ चित्त चित्रकूट होय आणि सुंदर स्नेह हेच वन होय. त्यामध्ये श्रीसीताराम विहार करतात. ॥ ३१ ॥
रामचरित चिंतामनि चारु । संत सुमति तिय सुभग सिंगारु ॥
जग मंगल गुनग्राम राम के । दानि मुकुति धन धरम धाम के ॥
श्रीरामांचे चरित्र हा सुंदर चिंतामणी आहे आणि संतांच्या सुबुद्धिरुपी स्रीचा सुंदर शृंगार आहे. श्रीरामांचे गुण-समुह हे जगाचे कल्याण करणारे आणि मुक्ती, धन, धर्म आणि परमधामाची प्राप्ती करुन देणारे आहेत. ॥ १ ॥
सदगुर ग्यान बिराग जोग के । बिबुध बैद भव भीम रोग के ॥
जननि जनक सिय राम प्रेम के । बीज सकल ब्रत धरम नेम के ॥
( ते गुणसमुह ) ज्ञान, वैराग्य आणि योग यांसाठी सद्गुरु आहेत आणि संसाररुपी भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी देवांचे वैद्य ( अश्र्विनीकुमार ) यांच्याप्रमाणे आहेत. ते श्रीसीतारामांविषयी प्रेम उत्पन्न करणारे माता-पिता आहेत आणि व्रते, धर्म आणि नियम यांचे बीज आहेत. ॥ २ ॥
समन पाप संताप सोक के । प्रिय पालक परलोक लोक के ॥
सचिव सुभट भूपति बिचार के । कुंभज लोभ उदधि अपार के ॥
पाप,दुःख व शोक यांचा नाश करणारे, तसेच इह-परलोकाचे प्रेमाने पालन करणारे आहेत. विचार ( ज्ञान ) रुपी राजाचे शूरवीर मंत्री व लोभरुपी अपार समुद्र शोषून टाकणारे अगस्त्य मुनी आहेत. ॥ ३ ॥
काम कोह कलिमल करिगन के । केहरि सावक जन मन बन के ॥
अतिथि पूज्य प्रियतम पुरारि के । कामद घन दारिद दवारि के ॥
भक्तांच्या मनरुपी वनामध्ये राहणार्‍या काम, क्रोध आणि कलियुगातील पापरुपी हत्तींना ठार मारणारे सिंहाचे छावे आहेत आणि भगवान शिवांचे पूज्य व आवडते अतिथी आहेत. तसेच दारिद्र्यरुपी दावानल विझवून टाकण्याची कामना पूर्ण करणारे मेघ आहेत. ॥ ४ ॥
मंत्र महामनि बिषय ब्याल के । मेटत कठिन कुअंक भाल के ॥
हरन मोह तम दिनकर कर से । सेवक सालि पाल जलधर से ॥
ते विषयरुपी सापाचे विष उतरविण्यासाठी मंत्र व महामणि आहेत. ( माणसाच्या ) ललाटावर लिहिलेले व नष्ट होण्यास कठीण असलेले वाईट लेख ( वाईट प्रारब्ध ) नष्ट करणारे आहेत. अज्ञानरुपी अंधकाराचे हरण करण्याच्या बाबतीत सूर्यकिरणांसमान आणि सेवकरुपी भात-पिकाचे पालन करण्यासाठी मेघाप्रमाणे आहेत. ॥ ५ ॥
अभिमत दानि देवतरु बर से । सेवत सुलभ सुखद हरि हर से ॥
सुकबि सरद नभ मन उडगन से । रामभगत जन जीवन धन से ॥
मनोवांछित वस्तू देणार्‍या श्रेष्ठ कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि सेवा करण्यास हरि-हराप्रमाणे सुलभ व सुख देणारे आहेत. सुकविरुपी शरदऋतूचे मनरुपी आकाश सुशोभित करणार्‍या तारागणामप्रमाणे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनघनच आहेत. ॥ ६ ॥
सकल सुकृत फल भूरि भोग से । जग हित निरुपधि साधु लोग से ॥
सेवक मन मानस मराल से । पावन गंग तरंग माल से ॥
हे संपूर्ण पुण्याच्या फलाच्या महान भोगांसमान आहेत. जगाचे वास्तविक हित करण्यासाठी साधु-संतासमान आहेत. सेवकांच्या मनरुपी सरोवरासाठी हंसासमान आणि पवित्र करण्यासाठी गंगेच्या तरंगासमान आहेत. ॥ ७ ॥
( वरील सर्व विवेचन हे श्रीरामांच्या गुणांचे आहे. ते या आधीच्या भागांत सुरु झाले आहे. )
दोहा—कुपथ कुतरक कुचालि कलि कपट दंभ पाषंड ।
दहन राम गुन ग्राम जिमि इंधन अनल प्रचंड ॥ ३२ (क) ॥
श्रीरामांचे गुण-समूह हे कुमार्ग, कुतर्क, दुराचरण आणि कलियुगातील कपट, दंभ आणि पाखंड जाळून टाकण्यासाठी इंधनास नष्ट करुन टाकणार्‍या प्रचंड अग्नीप्रमाणे आहेत. ॥ ३२ (क) ॥
रामचरित राकेस कर सरिस सुखद सब काहु ।
सज्जन कुमुद चकोर चित हित बिसेषि बड लाहु ॥ ३२ (ख) ॥
रामचरित्र हे पौर्णिमेच्या चंद्राच्या किरणांप्रमाणे सर्वांना सुख देणारे आहे, परंतु सज्जनरुपी कुमुदिनी आणि चकोराच्या चित्तासाठी ते विशेष हितकारक आणि फार लाभदायक आहे. ॥ ३२ (ख) ॥
कीन्हि प्रस्न जेहि भॉति भवानी । जेहि बिधि संकर कहा बखानी ॥
सो सब हेतु कहब मैं गाई । कथा प्रबंध बिचित्र बनाई ॥
पार्वतीने शंकराला जे प्रश्र्ण विचारले आणि त्यांनी त्यांची विस्ताराने जी उत्तरे दिली, ती सर्व मी विशेष प्रकारे कथेची रचना करुन सांगेन. ॥ १ ॥
जेहिं यह कथा सुनी नहिं होई । जनि आचरजु करै सुनि सोई ॥
कथा अलौकिक सुनहिं जे ग्यानी । नहिं आचरजु करहिं अस जानी ॥
रामकथा कै मिति जग नाहीं । असि प्रतीति तिन्ह के मन माहीं ॥
नाना भॉति राम अवतारा । रामायन सत कोटि अपारा ॥
ज्याने पूर्वी ही कथा ऐकली नसेल, त्याने ही ऐकून आश्र्चर्य करु नये. जे ज्ञानी लोक ही विलक्षण कथा ऐकतात, ते जाणत असूनही आश्र्चर्य करीत नाहीत. कारण जगामध्ये रामकथेला काही मर्यादा नाही, असा विश्र्वास त्यांच्या मनात असतो. श्रीरामांचे नाना प्रकारचे अवतार झाले आहेत आणि शंभर कोटी व अपार रामायणे आहेत. ॥ २-३ ॥
कलपभेद हरिचरित सुहाए । भॉति अनेक मुनीसन्ह गाए ॥
करिअ न संसय अस उर आनी । सुनिअ कथा सादर रति मानी ॥
मुनीश्वरांनी श्रीहरीची सुंदर चरित्रे कल्प-भेदानुसार अनेक प्रकारे गाइली आहेत, असा विचार करुन मनात संशय आणू नका आणि आदरपूर्वक प्रेमाने ही कथा ऐका. ॥ ४ ॥
दोहा—राम अनंत अनंत गुन अमित कथा बिस्तार ।
सुनि आचरजु न मानिहहिं जिन्ह कें बिमल बिचार ॥ ३३ ॥
श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुणसुद्धा अनंत आहेत. त्यांच्या कथांचाही विस्तार अनंत आहे. म्हणून ज्यांचे विचार शुद्ध आहेत, त्यांना ही कथा ऐकून आश्र्चर्य वाटणार नाही. ॥ ३३ ॥
एहि बिधि सब संसय करि दूरी । सिर धरि गुर पद पंकज धूरी ॥
पुनि सबही बिनवउँ कर जोरी । करत कथा जेहिं लाग न खोरी ॥
अशा प्रकारे सर्व संदेह दूर करुन आणि श्रीगुरुंच्या चरण-कमलांची धूळ मस्तकी धारण करुन मी पुन्हा हात जोडून सर्वांना विनंती करतो. त्यामुळे कथेच्या रचनेमध्ये कोणत्याही दोषाचा स्पर्श होणार नाही. ॥ १ ॥
सादर सिवहि नाइ अब माथा । बरनउँ बिसद राम गुन गाथा ॥
संबत सोरह सै एकतीसा । करउँ कथा हरि पद धरि सीसा ॥
आता मी आदराने श्री शिवांना मस्तक नमवून श्रीरामांच्या गुणांची पवित्र कथा सांगतो. श्रीहरींच्या चरणांवर मस्तक ठेवून विक्रम संवत १६३१ मध्ये ही कथा प्रारंभ करीत आहे. ॥ २ ॥
नौमी भौम बार मधुमासा । अवधपुरी यह चरित प्रकासा ॥
जेहि दिन राम जनम श्रुति गावहिं । तीरथ सकल तहॉ चलि आवहिं ॥
चैत्र मासातील नवमी तिथी, मंगळवार या दिवशी अयोध्येमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले. ज्या दिवशी श्रीरामांचा जन्म असतो, त्या दिवशी सर्व तीर्थे तेथे येतात, असे वेद सांगतात. ॥ ३ ॥
असुर नाग खग नर मुनि देवा । आइ करहिं रघुनायक सेवा ॥
जन्म महोत्सव रचहिं सुजाना । करहिं राम कल कीरति गाना ॥
असुर, नाग, पक्षी, मनुष्य, मुनी व देव हे सर्वजण अयोध्येमध्ये येऊन श्रीरघुनाथांची सेवा करतात. बुद्धिमान माणसे जन्मोत्सव साजरा करतात आणि श्रीरामांच्या सुंदर कीर्तीचे गायन करतात. ॥ ४ ॥
दोहा—मज्जहिं सज्जन बूंद बहु पावन सरजू नीर ।
जपहिं राम धरि ध्यान उर सुंदर स्याम सरीर ॥ ३४ ॥
त्या दिवशी सज्जन लोकांचेअनेक समूह शरयू नदीच्या पवित्र जळामध्ये स्नान करतात आणि हृदयामध्ये सुंदर श्यामल शरीर असलेल्या श्रीरघुनाथांचे ध्यान करीत त्यांच्या नामाचा जप करतात. ॥ ३४ ॥
दरस परस मज्जन अरु पाना । हरइ पाप कह बेद पुराना ॥
नदी पुनीत अमित महिमा अति । कहि न सकइ सारदा बिमल मति ॥
शरयू नदीचे दर्शन, स्पर्श, स्नान आणि जल-प्राशन या गोष्टी पापांचे हरण करतात, असे वेद-पुराणे सांगतात. ही नदी मोठी पवित्र आहे, हिचा महिमा अनंत आहे. तिचे माहात्म्य अत्यंत बुद्धिमती सरस्वतीसुद्धा वर्णन करु शकत नाही. ॥ १ ॥
राम धामदा पुरी सुहावनि । लोक समस्त बिदित अति पावनि ॥
चारि खानि जग जीव अपारा । अवध तजें तनु नहिं संसारा ॥
ही शोभायमान अयोध्यापुरी श्रीरामचंद्रांचे परमधाम प्राप्त करुन देणारी आहे. ही सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि अत्यंत पवित्र आहे. जगामध्ये ( अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज ) या चार योनींतील अनंत जीव आहेत. यापैकी जे जीव अयोध्येमध्ये शरीर त्याग करतात, ते पुन्हा संसारात येत नाहीत. ( जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटून भगवंताच्या परमधामामध्ये निवास करतात. ) ॥ २ ॥


Custom Search

No comments: