Saturday, November 28, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ९

 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 9 
Ovya 201 to 225 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग ९ 
ओव्या २०१ ते २२५

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।

संशयीं तो नोळखे । हिताहित ॥ २०१ ॥

२०१) त्याप्रमाणें खरें आणि खोटें, प्रतिकूल आणि अनुकूल, हित व अहित हीं संशयग्रस्त मनुष्याला ओळखतां येत नाहींत.

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाऊबा नाहीं ।

तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥ २०२ ॥

२०२) पाहा, ही रात्र आणि हा दिवस असें जन्मांधाला ज्याप्रमाणें ठाऊक नसतें, त्याप्रमाणें जोंपर्यंत ( मनुष्य ) संशयग्रस्त आहे, तोपर्यंत त्याच्या मनाला काही पटत नाहीं.

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।

हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥ २०३ ॥

२०२) म्हणून संशयापेक्षां मोठें असे दुसरे थोर पातक कोणतेंच नाहीं. हा संशय प्राण्याला विनाशाचें एक जाळेंच आहे.

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाची एकु जिणावा ।

जो ज्ञानाचिया अभावा--। माजी असे ॥ २०४ ॥

२०४) एवढ्याकरितां तूं याचा त्याग करावा; जेथें ज्ञानाचा अभाव असतो, तेथेंच जो असतो, त्या ह्या एकट्याला पहिल्यानें जिंकावें.

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।

म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्र्वासाचा ॥ २०५ ॥

२०५) जेव्हां अज्ञानाचा गाढ अंधार पडतो, तेव्हां हा मनांत फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो.

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये ।

तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥ २०६ ॥

२०६) हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असें नाहीं; तर बुद्धीलाहि व्यापून टाकतो. त्या वेळीं तिन्ही लोक संशयरुप होऊन जातात. 

ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे ।

जरी हातीं होय बरवें । ज्ञानखङ्ग ॥ २०७ ॥

२०७) एवढा जरी तो वाढला, तरी एका उपायानें तो जिंकता येतो. चांगलें ज्ञानरुप खङ्ग जर हातीं असेल, 

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।

मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥ २०८ ॥

२०८) तर त्या ज्ञानरुपी तीक्ष्ण शस्त्रानें हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहींसा होतो. 

याकारणें पार्था । उठी वेगीं वरौता ।

नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥ २०९ ॥

२०९) एवढ्याकरितां अर्जुना, अंतःकरणांत असलेल्या सर्व संशयांचा नाश करुन लौकर ऊठ पाहूं.

ऐसें सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु ।

तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ २१० ॥ 

२१०) ( संजय म्हणाला, ) राजा धृतराष्ट्रा, ऐक. सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच, असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणानें ( याप्रमाणें ) अरजुनास म्हणाला.

तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा ।

कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ॥ २११ ॥

२११) पुढें या मागच्यापुढच्या बोलण्याचा विचार करुन अर्जुन कसा समयोचित प्रश्न विचारील.

ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।

रसाची उन्नति । म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥

२१२) ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष, पुढें सांगण्यात येईल. 

जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी ।

सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥ २१३ ॥

२१३) ज्याच्या चांगलेंपणावरुन बाकीचे आठहि रस ओवाळून टाकले, जो या जगांत सज्जनांच्या बुद्धीचें विश्रांतिस्थान आहे;

तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्‍हाठे बोल ।

जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥ २१४ ॥

२१४) तो शांतरसच ज्यांत अपूर्वतेनें प्रकटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षां गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका.   

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।

शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥ २१५ ॥

२१५) सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसतें, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरें पडतें; त्याचप्रमाणें या शब्दांची व्याप्ति आहे, असे अनुभवास येईल.

ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।

बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥ २१६ ॥

२१६) अथवा इच्छा करणार्‍याच्या संकल्पाप्रमाणें कल्पवृक्ष फळ देतो, त्याप्रमाणें हे बोल व्यापक आहेत, म्हणून नीट लक्ष द्यावें.  

हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें ।

तरी निकें चित्त द्यावें । हें विनंति माझी ॥ २१७ ॥

२१७) पण हें राहूं द्या. जास्त काय सांगावें ? जे सर्वज्ञ आहेत, त्यांना आपोआप समजतेंच आहे. तरी नीट लक्ष द्यावें, हीच माझी विनंति आहे.  

जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।

जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥ २१८ ॥

२१८) ज्याप्रमाणें ( एखादी स्त्री ) रुप, गुण आणि कुल यांनीं युक्त आणि पतिव्रता असावी, त्याप्रमाणें या बोलण्याच्या पद्धतीत शांतरसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल.  

आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे ।

तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ॥ २१९ ॥

२१९) आधींच साखर प्रिय, आणि त्यांत तीच जर औषध म्हणून मिळाली, तर मग आनंदानें तिचें वारंवार सेवन का न करावें ?

सहजें मलयानिलु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।

आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥ २२० ॥

२२०) मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद सुगंधी असतो, त्यांतच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगानें त्याच्या ठिकाणींच सुस्वर उत्पन्न होईल;

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।

तेवींचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥

२२१) तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील, 

आपल्या गोडीने जीभेला नाचविल,त्याप्रमाणे कानांकडून 

वाहवा म्हणविल.

तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें ।

आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥ २२२ ॥

२२२) तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानाचें पारणें फिटेल आणि दुसरें अनायासें संसारदुःखाचें समूळ उच्चाटन होईल. 

जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें ।

रोग जाय दुधें साखरे । तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥

२२३) जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार करतां येईल, तर कमरेस कट्यार व्यर्थ कां बांधून ठेवावी ? जर दुधाने व साखरेनेंच रोग नाहींसा होईल तर कडूनिंबाचा रस पिण्याचे काय कारण ? 

तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।

एथ मोक्षु असे आयता । श्रवणादिमाजी ॥ २२४ ॥

२२४) त्याप्रमाणे मनाला न मारतां, इंद्रियांना दुःख न देतां, येथें ( नुसत्या ) ऐकण्यानेंच घरबसल्या मोक्ष मिळणार आहे.  

म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।

ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥ २२५ ॥

२२५) म्हणून प्रसन्न मनानें हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर म्हणतात. 

इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ श्र्लोक ४२; ओव्या २२५ )

॥ ॐश्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥   



Custom Search

No comments: