Friday, April 2, 2021

AyodhyaKanda Part 17 Doha 95 to 100 अयोध्याकाण्ड भाग १७ दोहा ९५ ते १००

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 17 
Doha 95 to 100 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १७ 
दोहा ९५ ते १००

दोहा—पितु पद गहि कहि कोटि नति बिनय करब कर जोरि ।

चिंता कवनिहु बात कै तात करिअ जनि मोरि ॥ ९५ ॥

तुम्ही जाऊन तातांचे चरण धरुन कोटी कोटी नमस्कार करीत हात जोडून विनंती करा की, बाबा ! तुम्ही माझी कोणत्याही प्रकारची काळजी करु नका. ॥ ९५ ॥

तुम्ह पुनि पितुसम अतिहित मोरें । बिनती करउँ तात कर जोरें ॥

सब बिधि सोइ करतब्य तुम्हारें । दुख न पाव पितु सोच हमारें ॥

तुम्ही स्वतःसुद्धा वडिलांप्रमाणे माझे मोठे हितचिंतक आहात म्हणून हे तात, मी हात जोडून विनंती करतो की, तुमचेही सर्वप्रकारे हेच कर्तव्य आहे की, वडिलांना आमच्या काळजीमुळें दुःख होऊ नये. ‘ ॥ १ ॥

सुनि रघुनाथ सचिव संबादू । भयउ सपरिजन बिकल निषादू ॥

पुनि कछु लखन कही कटु बानी । प्रभु बरजे बड़ अनुचित जानी ॥

श्रीरघुनाथ आणि सुमंत्र यांचा हा संवाद ऐकून निषादराज आपल्या कुटुंबासह व्याकूळ झाला. माग लक्ष्मण काहीशा कडवटपणे बोलला, प्रभू रामचंद्रांना ते फारच अयोग्य वाटले. म्हणून त्यांनी त्याला अडवले. ॥ २ ॥

सकुचि राम निज सपथ देवाई । लखन सँदेसु कहिअ जनि जाई ॥

कह सुमंत्रु पुनि भूप सँदेसू । सहि न सकिहि सिय बिपिन कलेसु ॥

श्रीरामचंद्रांनी नम्रतापूर्वक स्वतःची शपथ घालून सुमंत्रांना सांगितले की, ‘ तुम्ही लक्ष्मणाचे हे बोलणें सांगू नका. ‘ सुमंत्राने पुन्हा राजांचा निरोप सांगितला की, ‘सीता वनातील क्लेश सहन करु शकणार नाही. ॥ ३ ॥

जेहि बिधि अवध आव फिरि सीया । सोइ रघुबरहि तुम्हहि करनीया ॥

नतरु निपट अवलंब बिहीना । मैं न जिअब जिमि जल बिनु मीना ॥

म्हणून ती अयोध्येला परत येईल, असे तुम्ही व श्रीराम यांनी प्रयत्न करावेत. नाही तर मी अत्यंत निराधार होऊन पाण्याविना मासा जसा जगू शकत नाही, तसा जगू शकणार नाही. ॥ ४ ॥

दोहा—मइकें ससुरें सकल सुख जबहिं जहॉं मनु मान ।

तहँ तब रहिहि सुखेन सिय जब लगि बिपति बिहान ॥ ९६ ॥

सीतेच्या माहेरी व सासरी सर्व सुखे आहेत. जोपर्यंत हे संकट टळत नाही, तोपर्यंत तिला हवे तेथे ती सुखाने राहील. ॥ ९६ ॥

बिनती भूप कीन्ह जेहि भॉंती । आरति प्रीति न सो कहि जाती ॥

पितु सँदेसु सुनि कृपानिधाना । सियहि दीन्ह सिख कोटि बिधाना ॥

राजांनी ज्या दीनपणे व प्रेमाने विनंती केली आहे, तो दीनपणा व प्रेम सांगण्याच्या पलीकडे आहे. ‘ कृपानिधान श्रीरामांनी पित्याचा संदेश ऐकल्यावर सीतेला अनेक प्रकारे समजावले. ॥ १ ॥

सासु ससुर गुर प्रिय परिवारु । फिरहु त सब कर मिटै खभारु ॥

सुनि पति बचन कहति बैदेही । सुनहु प्रानपति परम सनेही ॥

ते म्हणाले, ‘  तू घरी परत जाशील तर सासू, सासरे, गुरु, प्रियजन आणि कुटुंबीय या सर्वांची काळजी दूर होईल. ‘ पतीचे बोलणे ऐकून जानकी म्हणाली, ‘ हे पतिराज, हे परमस्नेही, ऐका.॥ २ ॥

प्रभु करुनामय परम बिबेकी । तनु तजि रहति छॉंह किमि छेंकी ॥

प्रभा जाइ कहँ भानु बिहाई । कहँ चंद्रिका चंदु तजि जाई ॥          

हे प्रभो, तुम्ही करुणामय व परमज्ञानी आहात. विवार करा की, शरीराला सोडून छाया वेगळी ठेवता येईल कां ? सूर्याची प्रभा सूर्याला सोडून कुठे जाणार ? आणि चांदणे चंद्रास सोडून कुठे जाऊ शकेल ? ॥ ३ ॥

पतिहि प्रेममय बिनय सुनाई । कहति सचिव सन गिरा सुहाई ॥

तुम्ह पितु ससुर सरिस हितकारी । उतरु देउँ फिरि अनुचित भारी ॥

अशा प्रकारे पतीला प्रेमाची विनंती करुन सीता मंत्र्याला सुंदर वाणीने म्हणाली, तुम्ही माझे वडील व श्वशुर यांच्याप्रमाणे हितचिंतक आहात. मी तुम्हांला उलट उत्तर देणे फार योग्य ठरेल. ॥ ४ ॥

दोहा—आरति बस सनमुख भइउँ बिलगु न मानब तात ।

आरजसुत पद कमल बिनु बादि जहॉं लगि नात ॥ ९७ ॥

परंतु हे तात, मी आर्ततेने तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आर्यपुत्रांच्या चरण-कमलांविना जितकी नाती जगात आहेत, ती मला व्यर्थ आहेत. ॥ ९७ ॥

पितु बैभव बिलास मैं डीठा । नृप मनि मुकुट मिलित पद पीठा ॥

सुखनिधान अस पितु गृह मोरें । पिय बिहीन मन भाव न भोरें ॥

मी वडिलांचे ऐश्र्वर्य पाहिले आहे. त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगावर मोठमोठ्या राजांचे मुकुट टेकविले जातात. सर्व प्रकारच्या सुखाचे भांडार असलेले पित्याचे घरसुद्धा पतीविना माझ्या मनाला चुकूनही गोड वाटत नाही. ॥ १ ॥

ससुर चक्कवइ कोसलराऊ । भुवन चारिदस प्रगट प्रभाऊ ॥

आगें होइ जेहि सुरपति लेई । अरध सिंघासन आसनु देई ॥

माझे सासरे कोसलराज हे चक्रवर्ती सम्राट आहेत. त्यांचा प्रभाव चौदा लोकी गाजतो. इंद्रसुद्धा सामोरे येऊन त्यांचे स्वागत करतो आणि आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसण्यासाठी स्थान देतो. ॥ २ ॥

ससुर एतादृस अवध निवासू । प्रिय परिवारु मातु सम सासू ॥

बिनु रघुपति पद पदुम परागा । मोहि केउ सपनेहुँ सुखद न लागा ॥

असे ऐश्र्वर्यशाली व प्रभावशाली सासरे, अयोध्या या राजधानीतील निवास, कुटुंबातील प्रिय व्यक्ती, आईसारख्या सासू यांपैकी काहीही मला श्रीरघुनाथांच्या चरणकमलांच्या धुळीविना स्वप्नातही सुखदायक वाटत नाही. ॥ ३ ॥

अगम पंथ बनभूमि पहारा । करि केहरि सर सरित अपारा ॥

कोल किरात कुरंग बिहंगा । मोहि सब सुखद प्रानपति संगा ॥

दुर्गम रस्ते, अरण्य, पहाडी प्रदेश, हत्ती, सिंह, अथांग तलाव व नद्या, कोल, भिल्ल, हरणे आणि पक्षी हे सर्व, प्राणीप्रिय श्रीराम सोबत असल्यावर मला सुख देणारेच होतील. ॥ ४ ॥

दोहा—सासु ससुर सन मोरि हुँति बिनय करबि परि पायँ ।

मोर सोचु जनि करिअ कछु मैं बन सुखी सुभायँ ॥ ९८ ॥

म्हणून सासू-सासरे यांच्या पाया पडून, माझ्या मार्फत त्यांना विनंती करा की, माझी काहीही काळजी करु नका. वनात मी मनापासून सुखी आहे. ॥ ९८ ॥

प्राननाथ प्रिय देवर साथा । बीर धुरीन धरें धनु भाथा ॥

नहिं मग श्रमु भ्रमु दुख मन मोरें । मोहि लगि सोचु करिअ जनि भोरें ॥

वीरांमध्ये अग्रगण्य, धनुष्य व भरलेले भाते धारण केलेले माझे प्राणनाथ आणि माझे दीर हे सोबत आहेत. त्यामुळे मला वाटेमध्ये थकवा नाही, काळजी नाही आणि माझ्या मनात कोणतेही दुःख नाही. तुम्ही चुकूनही माझी काळजी करु नका. ‘ ॥ १ ॥

सुनि सुमंत्रु सिय सीतलि बानी । भयउ बिकल जनु फनि मनि हानी ॥

नयन सूझ नहिं सुनइ न काना । कहि न सकइ कछु अति अकुलाना॥

साप ज्याप्रमाणे आपला मणी हरवल्यावर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे सीतेची शीतल वाणी ऐकून सुमंत्र व्याकूळ झाला. त्याच्या डोळ्यांना काही दिसत नव्हते. कानांना काही ऐकू येत नव्हते. त्याची इतकी व्याकूळ अवस्था झाली की, काही सांगता सोय नाही. ॥ २ ॥

राम प्रबोधु कीन्ह बहु भॉंती । तदपि होति नहिं सीतलि छाती ॥

जतन अनेक साथ हित कीन्हे । उचित उतर रघुनंदन दीन्हे ॥

श्रीरामचंद्रांनीही त्याचे पुष्कळ प्रकारे समाधान केले. तरीही त्याचे मन शांत झाले नाही. आपल्याबरोबर परत येण्यासाठी सुमंत्राने खूप प्रयत्न केले. परंतु रघुनाथांनी त्याच्या प्रत्येक युक्तीला व तर्काला योग्य असे उत्तर दिले. ॥ ३ ॥

मेटि जाइ नहिं राम रजाई । कठिन करमगति कछु न बसाई ॥

राम लखन सिय पद सिरु नाई । फिरेउ बनिक जिमि मूर गवॉंई ॥

श्रीरामांची आज्ञा डावलता येत नाही. कर्माची गती फार कठीण असते. तिच्यावर कोणताही इलाज नाही. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चरणी मस्तक नम्र करुन सुमंत्र असा परत निघाला की, एखादा व्यापारी आपले सर्व भांडवल गमावून निराशेने परत जातो. ॥ ४ ॥

दोहा—रथु हॉंकेउ हय राम तन हेरि हेरि हिहिनाहिं ।

देखि निषाद बिषादबस धुनहिं सीस पछिताहिं ॥ ९९ ॥

सुमंत्राने रथ चालू केला. घोडे श्रीरामांकडे पाहात-पाहात खिंकाळत होते. हे पाहून निषाद लोक खिन्न होऊन डोक्यवर हात मारुन पश्र्चाताप करीत होते. ॥ ९९ ॥

जासु बियोग बिकल पसु ऐसें । प्रजा मातु पितु जिइहहिं कैसें ॥

बरबस राम सुमंत्रु पठाए । सुरसरि तीर आपु तब आए ॥

ज्यांच्या वियोगामुळे पशूसुद्धा अशा प्रकारे व्याकूळ झाले होते, त्यांच्या वियोगामुळे प्रजा, माता आणि पिता कसे जगणार ? श्रीरामांनी सुमंत्राला आग्रहाने परत पाठविले आणि ते गंगेच्या किनारी आले. ॥ १ ॥

मागी नाव न केवटु आना । कहइ तुम्हार मरमु मैं जाना ॥

चरन कमल रज कहुँ सबु कहई । मानुष करनि मूरि कछु अहई ॥

श्रीरामांनी नावाड्याकडे नाव मागितली, पण तो घेऊन आला नाही. तो म्हणाला की, ‘ मला तुमचे रहस्य समजले आहे. सर्वजण म्हणतात की, तुमच्या चरणकमलांची धूळ ही मनुष्य बनविणारी मुळी आहे. ॥ २ ॥

छुअत सिला भइ नारि सुहाई । पाहन तें न काठ कठिनाई ॥

तरनिउ मुनि घरिनी होइ जाई । बाट परइ मोरि नाव उड़ाई ॥

 तिचा स्पर्श होताच पाषाणाची शिळा सुंदर स्त्री बनून गेली. माझी नाव लाकडाची आहे. लाकूड हे पाषाणापेक्षा टणक नसते. माझी नावसुद्धा तुमच्या चरण-रजामुळे एखाद्या मुनीची स्त्री बनून निघून जाईल आणि माझे दिवाळे निघेल. ( मध्येच जर नांव मनुष्यमय झाली, तर तुम्हांला पलीकडे जातां येणार नाही व माझासुद्धा रोजगार बुडेल. ) ॥ ३ ॥

एहिं प्रतिपालउँ सबु परिवारु । नहिं जानउँ कछु अउर कबारु ॥

जौं प्रभु पार अवसि गा चहहू । मोहि पद पदुम पखारन कहहू ॥

मी या नावेवरच आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो. दुसरा धंदा मला येत नाही. जर तुम्हांला पलीकडे जायचे असेल, तर मला तुमचे चरण-कमल धुण्याची आज्ञा द्या. ॥ ४ ॥

छं०—पद कमल धोइ चढ़ाइ नाव न नाथ उतराई चहौं ।

मोहि राम राउरि आन दसरथ सपथ सब साची कहौं ॥

बरु तीर मारहुँ लखनु पै जब लगि न पाय पखारिहौं ।

तब लगि न तुलसीदास नाथ कृपाल पारु उतारिहौं ॥

महाराज ! मी चरण-कमल धुतल्यावरच तुम्हांला नावेत बसवीन. मी त्यासाठी तुमच्याकडून भाडे घेणार नाही. माझी तुम्हांला विनंती आहे आणि महाराज दशरथांची शपथ आहे की मी हे जे सांगत आहे, ते खरे-खरे सांगत आहे. लक्ष्मणाने जरी माझ्यावर शर-संधान केले, तरी जोपर्यंत मी तुमचे चरण धुणार नाही, तोपर्यंत हे तुलसीदासांचे नाथ, हे कृपाळू, मी तुम्हांला पलीकडे नेणार नाही. ‘ ॥

सो०—सुनि केवट के बैन प्रेम लपेटे अटपटे ।

बिहसे करुनाऐन चितइ जानकी लखन तन ॥ १०० ॥

नावाड्याचे ते प्रेमपूर्ण मजेशीर बोलणे ऐकून करुणानिधान श्रीराम हे जानकी व लक्ष्मणाकडे पाहून हसले. ॥ १०० ॥

कृपासिंधु बोले मुसुकाई । सोइ करु जेहिं तव नाव न जाई ॥

बेगि आनु जल पाय पखारु । होत बिलंबु उतारहि पारु ॥

कृपा-सागर श्रीरामचंद्र हसत-हसत नावाड्याला म्हणाले की, ‘ अरे बाबा, तुझी नाव जेणेकरुन जाणार नाही, असे तू कर. लवकर पाणी आण आणि पाय धू. उशीर होत आहे, पलीकडे आम्हांला लवकर घेऊन चल. ॥ १ ॥

जासु नाम सुमिरत एक बारा । उतरहिं नर भवसिंधु अपारा ॥

सोइ कृपालु केवटहि निहोरा । जेहिं जगु किय तिहु पगहु ते थोरा ॥

ज्यांच्या नावाचे एकदा स्मरण करताच मनुष्य अपार भवसागर तरुन जातात, आणि ज्यांनी वामनावतारामध्ये संपूर्ण जग तीन पावलामपेक्षा छोटे करुन टाकले होते, ते कृपाळू श्रीराम गंगानदी पार करण्यासाठी नावाड्याची मनधरणी करत होते. ॥ २ ॥

पद नख निरखि देवसरि हरषी । सुनि प्रभु बचन मोहँ मति करषी ॥

केवट राम रजायसु पावा । पानि कठवता भरि लेइ आवा ॥

प्रभूंचे हे बोलणें ऐकून गंगेची बुद्धिसुद्धा गुंग झाली. प्रत्यक्ष भगवंत असूनही नदी पार करण्यासाठी श्रीराम नावाड्याकडे याचना करीत होते. परंतु देव-नदी गंगा आपले उगमस्थान असलेली भगवंतांची पद-नखे पाहून आनंदून गेली. भगवंतांची मानव लीला पाहून तिचा मोह दूर झाला. या चरणांच्या स्पर्शामुळे मी धन्य होईन, असा विचार करुन तिला हर्ष झाला. आज्ञा मिळताच नावाडी मोठ्या लाकडी पात्रातून पाणी भरुन घेऊन आला. ॥ ३ ॥

अति आनंद उमगि अनुरागा । चरन सरोज पखारन लागा ॥

बरषि सुमन सुर सकल सिहाहीं । एहि सम पुन्यपुंज कोउ नाहीं ॥

अत्यंत प्रेमाने व उत्साहाने तो भगवंतांचे चरण धुऊ

 लागला. हे पाहून देव फुलांचा वर्षाव करीत संतुष्ट होऊन

 म्हणाले की, ‘ याच्यासारखा पुण्यवान कोणीही नाही. ‘

 ॥ ४ ॥



Custom Search

No comments: