Thursday, February 10, 2022

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 52 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ५२

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 52 
Doha 305 to 310 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ५२ 
दोहा ३०५ ते ३१०

दोहा—राज काज सब लाज पति धरम धरनि धाम ।

गुर प्रभाउ पालिहि सबहि भल होइहि परिनाम ॥ ३०५ ॥

राज्याचे सर्व कार्य, मर्यादा, प्रतिष्ठा, धर्म, पृथ्वी, धन, घर या सर्वांचे पालन गुरुजींचा प्रभाव करील आणि परिणाम शुभ होईल. ॥ ३०५ ॥

सहित समाज तुम्हारा हमारा । घर बन गुर प्रसाद रखवारा ॥

मातु पिता गुर स्वामि निदेसू । सकल धरम धरनीधर सेसू ॥

गुरुजींचा अनुग्रह हाच घरामध्ये व वनामध्ये समाजासह तुझा व आमचा रक्षक आहे. माता, पिता, गुरु आणि स्वामींच्या आज्ञेचे पालन करणे, हे संपूर्ण धर्मरुपी पृथ्वीला धारण करणार्‍या शेषासारखे आहे. ॥ १ ॥

सो तुम्ह करहु करावहु मोहू । तात तरनिकुल पालक होहू ॥

साधक एक सकल सिधि देनी । कीरति सुगति भूतिमय बेनी ॥

भरता ! तू तेच कर, माझ्याकडून करवून घे आणि सूर्यकुलाचा रक्षक बन. साधकासाठी ही एकच आज्ञापालनरुपी साधाना संपूर्ण सिद्धी देणारी आहे. ती कीर्ती, सद्गती आणि ऐश्वर्य यांची त्रिवेणी आहे. ॥ २ ॥

सो बिचारि सहि संकटु भारी । करहु प्रजा परिवारु सुखारी ॥

बॉंटी बिपति सबहिं मोहि भाई । तुम्हहि अवधि भरि बड़ि कठिनाई ॥

याचा विचार करुन, मोठे संकट सोसूनही तू प्रजेला व कुटुंबाला सुखी कर. हे बंधू, माझी विपत्ती सर्वांनी वाटून घेतली. परंतु तुला मात्र चौदा वर्षांच्या अवधीत मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत. ॥ ३ ॥

जानि तुम्हहि मृदु कहउँ कठोरा । कुसमयँ तात न अनुचित मोरा ॥

होहिं कुठायँ सुबंधु सहाए । ओड़िअहिंहाथ असनिहु के घाए ॥

तू कोमल आहेस, हे माहीत असूनही मी वियोगाची कठोर गोष्ट सांगत आहे. कठीण प्रसंगी हे सांगणे माझ्या दृष्टीने अयोग्य नाही. कारण कठीण प्रसंगी थोरला भाऊच मदत करतो. वज्राचे प्रहार हातानेच अडचता येतात.’ ॥ ४ ॥

दोहा—सेवक कर पद नयन से मुख सो साहिबु होइ ।

तुलसी प्रीति कि रीति सुनि सुकबि सराहहिं सोइ ॥ ३०६ ॥

सेवक हा हात, पाय व नेत्रांच्यासारखा आणि स्वामी हा मुखासारखा असला पाहिजे. तुलसीदास म्हणतात की, सेवक-स्वामी यांच्या प्रेमाची अशी रीत ऐकून सुकवी तिची स्तुती करतात. ॥ ३०६ ॥

सभा सकल सुनि रघुबर बानी । प्रेम पयोधि अमिअँ जनु सानी ॥

सिथिल समाज सनेह समाधी । देखि दसा चुप सारद साधी ॥

श्रीरघुनाथांची प्रेमरुपी समुद्रातील अमृताने ओथंबलेली वाणी ऐकून सर्व समाजावरील दडपण उतरले व सर्वांना प्रेमाची समाधी लागली. ही दशा पाहून सरस्वतीसुद्धा मौन झाली. ॥ १ ॥

भरतहि भयउ परम संतोषू । सनमुख स्वामि बिमुख दुख दोषू ॥

मुख प्रसन्न मन मिटा बिषादू । भा जनु गूंगेहि गिरा प्रसादू ॥

भरताला फार संतोष वाटला. स्वामी अनुकूल होताच त्याचे दुःख व दोष पळून गेले. त्याचे मुख प्रसन्न झाले आणि मनातील विषाद दूर झाला. जणू मुक्यावर सरस्वतीची कृपा झाली. ॥ २ ॥

कीन्ह सप्रेम प्रनामु बहोरी । बोले पानि पंकरुह जोरी ॥

नाथ भयउ सुखु साथ गए को । लहेउँ लाहु जग जनमु भए को ॥

त्याने प्रेमाने प्रणाम केला आणि करकमल जोडून तो म्हणाला की, ‘ हे नाथ, मला तुमच्याबरोबर येण्याचे सुख लाभले आणि मला बजगामध्ये जन्म घेण्याचा लाभही मिळाला. ॥ ३ ॥

अब कृपाल जस आयसु होई । करौं सीस धरि सादर सोई ॥

सो अवलंब देव मोहि देई । अवधि पारु पावौं जेहि सेई ॥

हे कृपाळू, आता जशी आज्ञा असेल, तशी ती मी शिरोधार्य मानून आदराने पाळीन. परंतु हे देवा, तुम्ही मला असा आधार द्या की, त्याची सेवा करुन मी हा काळ घालवू शकेन. ॥ ४ ॥

दोहा—देव देव अभिषेक हित गुर अनुसासनु पाइ ।

आनेउँ सब तीरथ सलिलु तेहि कहँ काह रजाइ ॥ ३०७ ॥

हे देव तुमच्या अभिषेकासाठी मी गुरुजींच्या आज्ञेने सर्व तीर्थांतील जल घेऊन आलो आहे. त्याबद्दल काय आज्ञा आहे. ॥ ३०७ ॥

एकु मनोरथु बड़ मन माहीं । सभयँ सकोच जात कहि नाहीं ॥

कहहु तात प्रभु आयसु पाई । बोले बानि सनेह सुहाई ॥

माझ्या मनात आणखी एक मोठी इच्छा आहे, परंतु भय व संकोचामुळे ती सांगवत नाही.’ श्रीराम म्हणाले, ‘ हे बंधू, सांग.’ तेव्हा प्रभूंची आज्ञा झाल्यावर भरत स्नेहपूर्ण सुंदर वाणीने म्हणाला, ॥ १ ॥

चित्रकूट सुचि थल तीरथ बन । खग मृग सर सरि निर्झर गिरिगनु ॥

प्रभु पद अंकित अवनि बिसेषी । आयसु होइ त आवौं देखी ॥

‘ आज्ञा असेल तर चित्रकूटावरील पवित्र स्थाने, तीर्थे, वन, पशु-पक्षी, तलाव, नद्या, झरे आणि पर्वतांचे समूह, विशेषतः प्रभू, तुमच्या चरणचिह्नांनी अंकित झालेली भूमी पाहून येतो.’ ॥ २ ॥

अवसि अत्रि आयसु सिर धरहू । तात बिगतभय कानन चरहू ॥

मुनि प्रसाद बनु मंगल दाता । पावन परम सुहावन भ्राता ॥

श्रीरघुनाथ म्हणाले, ‘ अवश्य. अत्रि ऋषींच्या आज्ञेने ते सांगतल तसे कर आणि निर्भयपणे वनात फिरुन ये. हे बंधू, अत्रिमुनींच्या प्रसादामुळे हे वन मांगल्य देणारे, परम पवित्र व अत्यंत सुंदर झाले आहे. ॥ ३ ॥

रिषिनायकु जहँ आयसु देहीं । राखेहु तीरथ जलु थल तेहीं ॥

सुनि प्रभु बचन भरत सुखु पावा । मुनि पद कमल मुदित सिरु नावा ॥

आणि ऋषींचे प्रमुख अत्री हे आज्ञा देतील तेथे ते आणलेले तीर्थांचे जल स्थापन कर.’ प्रभूंचे बोलणे ऐकून भरत सुखावला आणि आनंदित होऊन त्याने अत्रिमुनींच्या चरणी मस्तक ठेवले. ॥ ४ ॥

दोहा—भरत राम संबादु सुनि सकल सुमंगल मूल ।

सुर स्वारथी सराहि कुल बरषत सुरतरु फूल ॥ ३०८ ॥

सर्व सुंदर मांगल्याचे मूळ असलेला भरत व श्रीरामांचा संवाद ऐकून स्वार्थी देव रघुकुलाची प्रशंसा करुन कल्पवृक्षाची फुले उधळू लागले. ॥ ३०८ ॥

धन्य भरत जय राम गोसाईं । कहत देव हरषत बरिआईं ॥

मुनि मिथिलेस सभॉं सब काहू । भरत बचन सुनि भयउ उछाहू ॥

‘ भरत धन्य आहे, स्वामी श्रीरामांचा विजय असो,’ असे म्हणत देव अत्यंत हर्षित होऊ लागले. भरताचे बोलणे ऐकून मुनी वसिष्ठ, मिथिलापती जनक आणि सभेंतील सर्वांना आनंद झाला. ॥ १ ॥

भरत राम गुन ग्राम सनेहू । पुलकि प्रसंसत राउ बिदेहू ॥

सेवक स्वामि सुभाउ सुहावन । नेमु पेमु अति पावन पावन ॥

भरत आणि श्रीरामचंद्र यांच्या गुणांची व प्रेमाची प्रशंसा विदेहराजा जनक पुलकित होऊन करु लागले, ‘ सेवक व स्वामी या दोघांचा सुंदर स्वभाव आहे. या दोघांचे नियम व प्रेम हे पावित्र्यालाही अत्यंत पवित्र करणारे आहे. ‘ ॥ २ ॥

मति अनुसार सराहन लागे । सचिव सभासद सब अनुरागे ॥

सुनि सुनि राम भरत संबादू । दुहु समाज हियँ हरषु बिषादू ॥

मंत्री आणि सभासद सर्वजण प्रेममुग्ध होऊन आपापल्या बुद्धीप्रमाणे त्या दोघांच्या प्रेमाची वाखाणणी करु लागले. श्रीरामचंद्र आणि भरत यांचा संवाद ऐकून दोन्ही समाजांच्या हृदयांमध्ये भरताचा सेवाधर्म पाहून हर्ष आणि रामवियोगाच्या कल्पनेमुळे विषाद वाटला. ॥ ३ ॥

राम मातु दुखु सुखु सम जानी । कहि गुन राम प्रबोधीं रानी ॥

एक कहहिं रघुबीर बड़ाई । एक सराहत भरत भलाई ॥

राममाता कौसल्येने दुःख व सुख समान मानून श्रीरामांचे गुण सांगत इतर राण्यांना धीर दिला. कोणी श्रीरामांच्या मोठेपणाची चर्चा करीत होते. तर कोणी भरताच्या चांगुलपणाची प्रशंसा करीत होते. ॥ ४ ॥ 

दोहा—अत्रि कहेउ तब भरत सन सैल समीप सुकूप ।

राखिअ तीरथ तोय तहँ पावन अमिअ अनूप ॥ ३०९ ॥

मग अत्रि ऋषींनी भरताला सांगितले की, ‘ या पर्वताजवळ एक विहीर आहे. ते पवित्र, अनुपम व अमृतासारखे तीर्थजल तिच्यातच स्थापन कर.’ ॥ ३०

भरत अत्रि अनुसासन पाई । जल भाजन सब दिए चलाई ॥

सानुज आपु अत्रि मुनि साधू । सहित गए जहँ कूप अगाधू ॥

भरताने अत्रि-मुनींच्या आज्ञेनुसार जलाची सर्व पात्रे रवाना केली आणि शत्रुघ्न, अत्रिमुनी आणि अन्य साधु-संतांसह त्या अथांग विहिरीकडे तो गेला. ॥ १ ॥

पावन पाथ पुन्यथल राखा । प्रमुदित प्रेम अत्रि अस भाषा ॥

तात अनादि सिद्ध थल एहू । लोपेउ काल बिदित नहिं केहू ॥

आणि ते पवित्र जल त्या पुण्यस्थळामध्ये ठेवले. तेव्हा अत्रि ऋषींनी प्रेमाने आनंदित होऊन म्हटले, ‘ भरता, हे अनादी सिद्धस्थल आहे. काळाच्या ओघात हे लोप पावले होते, म्हणून कुणालाच हे ठाऊक नव्हते. ‘ ॥ २ ॥

तब सेवकन्ह सरस थलु देखा । कीन्ह सुजल हित कूप बिसेषा ॥

 बिधिबस भयद बिस्व उपकारु । सुगम अगम अति धरम बिचारु ॥           

 तेव्हा भरताच्या सेवकांनी ते जलयुक्त स्थान पाहिले आणि त्या पवित्र तीर्थांच्या जलासाठी त्या विहिरीचा चांगल्याप्रकारे जीर्णोद्धार केला. दैवयोगामुळे सर्व तीर्थे एकत्र आल्याने विश्र्वावर उपकार झाला. धर्माचा अत्यंत अगम्य विचार या विहिरीमुळे सुगम झाला. ॥ ३ ॥

भरतकूप अब कहिहहिं लोगा । अति पावन तीरथ जल जोगा ।

प्रेम सनेम निमज्जत प्रानी । होइहहिं बिमल करम मन बानी ॥

आता लोक याला ‘ भरतकूप ‘ म्हणतील. तीर्थाच्या जलामुळ हा अत्यंत पवित्र झाला आहे.  यात प्रेमाने नियमितपणे स्नान केलयावर प्राणी काया-वाचामने शुद्ध होतील. ॥ ४ ॥

दोहा—कहत कूप महिमा सकल गए जहॉं रघुराउ ।

अत्रि सुनायउ रघुबरहि तीरथ पुन्य प्रभउ ॥ ३१० ॥

त्या विहिरीचा महिमा सांगत सर्वजण श्रीरघुनाथांच्याकडे गेले. अत्रिमुनींनी श्रीरघुनाथांना त्या तीर्थाचा पुण्यप्रभाव सांगितला.॥ ३१० ॥

कहत धरम इतिहास सप्रीती । भयउ भोरु निसि सो सुख बीती ॥

नित्य निबाहि भरत दोउ भाई । राम अत्रि गुर आयासु पाई ॥

प्रेमपूर्वक धर्माचा इतिहास सांगत ती रात्र सुखाने गेली. सकाळ उजाडली. भरत-शत्रुघ्न हे नित्यक्रिया आटोपून श्रीराम,अत्रिमुनी व वसिष्ठ यांची घेऊन, ॥ १ ॥

सहित समाज साज सब सादें । चले राम बन अटन पयादें ॥

कोमल चरन चलत बिनु पनहीं । भइ मृदु भूमि सकुचि मन मनहीं ॥

सर्व समाजासह साधेपणाने श्रीरामांच्या वनास प्रदक्षिणा करण्यास पायी गेले. ते अनवाणी चालत आहेत, हे पाहून पृथ्वी मनातून संकोच पावून कोमल झाली. ॥ २ ॥

कुस कंटक कॉंकरीं कुराईं । कटुक कठोर कुबस्तु दुराईं ॥

महि मंजुल मृदु मारग कीन्हे । बहत समीर त्रिबिध सुख लीन्हे ॥

कुश, काटे, खडे, खड्डे इत्यादी कठोर, त्रासदायक आणि वाईट वस्तू लपवून पृथ्वीने मार्ग सुंदर व कोमल बनविले. सुखदायक, शीतल, मंद, सुगंधित हवा वाहू लागली. ॥ ३ ॥

सुमन बरषि सुर घन करि छाहीं । बिटप फूलि फलि तृन मृदुताहीं ॥

मृग बिलोकि खग बोलि सुबानी । सेवहिं सकल राम प्रिय जानी ॥

मार्गामध्यें देवांनी फुलांचा वर्षाव केला, मेघांनी सावली

 धरली, वृक्ष फुला-फळांनी बहरले, गवत कोमल झाले

, पशु त्यांना पाहात होते आणि पक्षी सुंदर वाणीने बोलत

 होते. ते सर्वजण भरत हा श्रीरामांचा आवडता आहे, असेमानून त्याची सेवा करु लागले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: