Showing posts with label Adi Shankaracharyas Spiritual Stotras. Show all posts
Showing posts with label Adi Shankaracharyas Spiritual Stotras. Show all posts

Friday, April 20, 2018

ShriGurvashtakam श्रीगुर्वाष्टकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras

श्रीगुर्वष्टकम्

शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं, 
यशश्र्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥
भावार्थ;
१) जर शुद्ध एकनिष्ठ भावानें, मन श्रीहरीच्या चरणीं लीन झालें नाहीं, तर शरीर सुन्दर, निरोगी असून त्याचा उपयोग काय? तसेंच सुंदर स्त्री, अगाध कीर्ति व मेरुपर्वताप्रमाणें धनप्राप्ती झाली तरीही त्याचा उपयोग काय? कांहीं नाहीं. विशेष काय सांगावें ! सांसारिक सर्व वैभव प्राप्त झालें, तरी तें सर्व वैभव हरिभक्तीवांचून व्यर्थ आहे. शोक व दुःखाचे साधन आहे.     
कलत्रं धनं पुत्रपौत्रादि कीर्तिः 
गृहं बांधवाः जातिमेतद्धि सर्वम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ २ ॥
२) स्त्री, धन, पुत्रपौत्रादि, कीर्ति, गृह, बन्धुवर्ग, उत्तम जाति, इत्यादि सर्व प्राप्त झालें , तरी त्याचा उपयोग काय ? कंहीं नाहीं. हरिभक्तीवांचून जगणें निष्फल होय. 
षडङ्गादि वेदो मुखे शास्त्रविद्या 
कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ३ ॥    
३) जगद्गुरु परमेश्र्वरचरणीं मन लीन झालें नाहीं, पण शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष यांसहित ऋगवेदादि चार वेदांचें अध्ययन, पूर्वोत्तर मीमांसा, सांख्य, योग, न्याय तसेंच वैशेषिक इत्यादि चौदा विद्या कंठगत केल्या, पण त्याचा उपयोग काय? तसेंच गद्यपद्यसदि काव्यरचना केल्या, त्याचा तरी काय उपयोग? अर्थांत कांहींच नाहीं. हरिभक्तीवांचून सर्व विद्या प्राप्ती निष्फल होय. हरिभक्तिवांचून विद्वानाचें जीवन पशुतुल्य समजावें. हरिभक्तीनें पांडित्याला शोभा आहे.   
विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः 
सदाचारवृतेषु मत्तो न चान्यः ।
गुरोरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ४ ॥
४) विदेशांत मान आहे. स्वदेशीं लोकप्रशंसेस पात्र आहे. माझ्यावांचून सदाचारपरायणता कोणासही नाही म्हणजे माझ्यावांचून अधिक सदाचारी कोणीही नाही. हें सर्व असेल तरीही भगवान श्रीहरीचरणाच्या ठिकाणीं निष्कपट भावानें ज्याचें मन तल्लीन नाहीं, त्यास वरील गोष्टीनीं कोणताही लाभ होणार नाहीं.    
क्ष्मामंडले भूपभूपालवृन्दैः 
सदा सेवितं यस्य पादारविन्दम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ५ ॥
५) पृथ्वीवरील सर्व राजे ज्याच्या चरणकमलाची सेवा करीत आहेत, पण तो जर श्रीहरिचरणाच्या ठिकाणीं लीन नसेल, तर त्याचे सर्व ऐश्र्वर्य कवडीमोल आहे. हरिभक्तिविमुख दांभिक मनुष्याचा सर्व राजांनीं सन्मान केला तरी त्यापासून हित काय होणार? कांहीं नाहीं.
यशो मे गतं दिक्षु दानप्रतापात् 
जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रभावात् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ६ ॥
६) दानशूर म्हणून ज्याची कीर्ति दिगंती पसरली आहे, जगांतील सर्व संसारोपयोगी वस्तु स्वसामर्थ्यानें आज ज्याला प्राप्त आहेत, पण त्याचें चित्त जर श्रीहरिचरणकमलीं रत नसेल, तर त्याचें तें सर्व ऐश्र्वर्य व दानशूरपणा व्यर्थ आहेत. असें समजावें. 
न भोगे न योगे न वा वाजिराजौ, 
न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ७ ॥
७) ज्याचें चित्त भोगांत, योगांत, उत्तम अश्र्वविद्येंत, सुंदर स्त्रीच्या ठिकाणीं अथवा धनधान्यादि संग्रहांत आसक्त नाहीं, अशा प्रकारचें वैराग्य व अनासक्ति असूनहि, जर त्याचें चित्त हरिचरणकमलाच्या ठिकाणीं रत नसेल, तर त्याच्या त्या नुसत्या वैराग्यादिकांपासून कांहींच लाभ नाहीं.   
अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये,
न देहे मनो वर्तते मे त्वनर्घ्ये ।
गुरोरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ८ ॥
८) ज्याचें मन सुंदर व संपत्तिपरिपूर्ण घरांत, व्यापारांत, शरीरपालनपोषणादि व्यवहारांत, त्याचप्रमाणें मूल्यवान् पदार्थांचा संग्रह करणें इत्यादि कार्यांत आसक्त नाहीं, आणि जो अरण्यांत एकांतवासांत जाऊन बसला, पण तो जर हरिचरणांची भक्ति करीत नसेल तर त्याचें तें सर्व वैराग्य व्यर्थ आहे. 
अनर्घ्याणि रत्नानि भुक्तानि सम्यक्,
समालिङ्गिता कामिनी यामिनीषु ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ९ ॥ 
९) मौल्यवान रत्नांचा उपभोग, त्याचप्रमाणें रात्रीं उत्तम रुपवान् स्त्रीयांच्या आलिंगनादिकांपासून होणारें प्राकृत सुख प्राप्त झालें, पण जर भगवान् श्रीहरीच्या चरणकमळीं मन स्थिर नसेल तर वरील तुच्छ सुखाच्या प्राप्तीनें काय फल मिळणार ? कांहीं नाहीं !
गुरोरष्टकं यः पठेत् पुण्यदेही,
यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही ।
लभेद्वांछितार्थं पदं ब्रह्मसंज्ञं 
गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नं ॥ १० ॥
१०) जो शुभकर्मकृत संन्यासी, राजा, ब्रह्मचारी, तसाच गृहस्थाश्रमी या गुर्वष्टकाचें पठन व पाठण करील, तसेंच ज्याचें मन श्रीगुरुनें उपदेशिलेल्या वाक्यांच्या ठिकाणीं स्थिर होईल, तो अभिलाषित परमानन्दरुप ब्रह्मतत्वाला प्राप्त होईल म्हणजे ब्रह्मरुप होईल. 
वरील भावार्थ ह. भ. प. श्री भार्गव वासुदेव खांबेटे  यांनी केला आहे. तो त्यांच्या सार्थ स्तोत्ररत्नावली या पुस्तकांतून साभार घेतला आहे. 


Custom Search
Responsive Add unit.

MayaPanchakam मायपंचकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras


मायापंचकम्
निरुपमनित्य निरंशकेऽप्यखंडे, 
मयिचिति सर्वविकल्पनादिशून्ये ।
घटयति जगदीशजीवभेदम् ,
अघटितघटनापटीयसी माया ॥ १ ॥ 
१) निरुपम म्हणजे उपमाशून्य, नित्य, निरंश, अखंड, जगदादि सर्व विकल्पनाशून्य, ज्ञानस्वरुप, परब्रह्मरुप जो मीं, त्या माझ्याठिकाणीं अघटितघटना करण्यांत कुशल जी अनिर्वचनीय माया, तीं जगत् , ईश्र्वर व जीव असा भेद दाखविते.
श्रुतिशतनिगमान्तशोधकान् 
अप्यहह धनादिनिदर्शनेन सद्यः ।
कलुपयति चतुष्पदाद्यभिन्नान् 
अघटितघटनापटीयसी माया ॥ २ ॥ 
२) अनेक श्रुति व वेदवाक्यें यांचा शोध करणारे महान् विद्वान, पण आचार्य म्हणतात -- अरेरे ! काय करावें ! किंचित् धनलाभ अगर मान प्राप्त होण्याचा समु प्राप्त झाला असतां आपली विद्वत्ता विसरुन पशुतुल्य वर्तन करण्यास तयार होतात, म्हणजे वेदशास्त्राविरुद्ध वर्तन करण्यास तयार होतात; ब्रह्मदेवादिकांनाहि मोह पाडणारी व अघटित घटना करणारी माया काय करणार नाही ? वाटेल तें करील.
सुखचिदखंडविबोधमद्वितीयम् ,
वियदनलादि विनिर्मिते नियोज्य ।
भ्रमयति भवसागरे नितान्तम् ,
अघटितघटनापटीयसी माया ॥ ३ ॥  
ब्रह्म ( आत्मा ), सुखरुप, चिद्रूप, अखंड, ज्ञानरुप व अद्वितीय आहे, पण माया आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीनें त्या आत्म्यापासून आकाश, वायु, तेज, जल व पृथ्वी या पंचभूतांची उत्पत्ति करिते पण ती भूतें परस्परांची वैरी असल्यामुळें एकमेकांचा नाश करतील म्हणून त्यांचा नियामक जो अंतर्यामी ईश्र्वर त्याचीहि उत्पत्ति करते, म्हणजे शुद्ध ब्रह्माला मायेच्या आध्यात्मिक संबंधानें ईश्र्वरभाव येतो; ( ब्रह + माया + आभास = ईश्र्वर ). तात्पर्य, ईश्र्वरत्वरुपान्तर्गत माया जगताचें उपादानकारण असून, आभास निमित्तकारण आहे व तोच आभास मायेचा नियामक आहे. द्वैतीकपिल सांख्यमताप्रमाणें माया स्वतंत्र जगत् कर्ती नसून परतंत्र म्हणजे ईश्र्वराधीन आहे. त्या ईश्र्वराला आपल्या स्वरुपाचा केव्हांहि भ्रम नाही म्हणून तो नित्य मुक्त आहे. सर्व पदार्थांना जाणतो म्हणून सर्वज्ञ, व सर्वशक्तिमान म्हणून स्वतंत्र जगत्कर्ता आहे; अल्पज्ञ, अल्पशक्तिमान व पराधीन असतो त्यास जीव असें म्हणतात. पारमार्थिक दृष्टीनें जीवाचे ठिकाणी अल्पज्ञत्वादि धर्म नाहीत, परंतु अविद्येनें त्याच्या ठिकाणीं प्रतीत होतात, अविद्याकृताअल्पज्ञात्वादिकांची जी आत्म्याच्या ठिकाणीं भ्रांन्ति तेंच जीवाचें जीवत्व होय. अशी ही अद्भुत व मोहकारी माया, या जीवाला भवसागरामध्यें अविरत भ्रमण करावयास लावतें.  आचार्य म्हणतात, या मायेची अद्भुत व मोहकारी शक्ति कशी आहे ? हें काय सांगावें ! ती अघटित घटना करण्यांत कुशल आहे हें खरें.
अपगतगुणवर्णजातिभेदे ,
सुखचिति विप्रविडाद्यहंकृतिं च ।
स्फुटयति सुतदारगेहमोहम् 
अघटितघटनापटीयसी माया ॥ ४ ॥  
४) ज्या ब्रह्माच्या ( आत्म्याच्या ) ठिकाणीं गुण, जाति, वर्ग इत्यादि भेद नाहीं. व्यवहारांत या शब्दाचा हा अर्थ आहे अशा संकेताच्या ज्ञानानें अर्थाचा प्रत्यय येतो. त्यावांचून कोणताहि शब्द आपल्या अर्थाचा प्रत्यय आणून देतो असें दिसत नाहीं. यास उदाहरणः गाय, अश्र्व इत्यदिकांचे ज्ञान गोत्व व अश्र्चत्व या जातीनें होतें, शिजवितो, पठन करतो यांचे ज्ञान शिजविणें, पठन करणें या क्रियांवरुन होते; पांढरा, काळा इत्यादिकांचे ज्ञान गुणावरुन होते. तसेंच धनी, गोमान, इत्यादि ज्ञान धन व गाय यांच्याशी असलेल्या संबंधावरुन होतें. अगोत्रं , अवर्णं इत्यादि श्रुती ' ब्रह्म ' जातिमान नाहीं असें सांगते, म्हणून सदादि शब्दांचें वाच्य नाही.' निर्गुण ' इत्यादि श्रुति ब्रह्म निर्गुण आहे असें सांगते म्हणून गुण शब्दानें त्याचें वर्णन करितां येत नाही; ' निष्कलं निष्क्रियं शांतं ' ही श्रुति ब्रह्म ब्रह्म निष्क्रिय आहे असे प्रतिपादन करते. म्हणून ब्रह्म क्रिया शब्दाचे वाच्य नाहीं;  ' एकमेवाद्वितीयम् ' ही श्रुति ब्रह्म एकच आहे असें प्रतिपादन करतें. तास्तव त्याचा कोणाशी संबंधच होत नाहीं असें श्रुति सांगतें. ' यतो वाचो निवर्न्तते , ' ' साक्षी चेता केवलो निर्गुणश्र्च ' इत्यादि श्रुति ब्रह्म अद्वितीय व अविषय आहे असें सांगतात. मग त्याचा संबंध अन्य वस्तूशी कसा होणार कारण तत्वतः अन्य वस्तु नाहींच असा श्रौतसिद्धान्त आहे. असो. तसेंच  हें ब्रह्म सुखस्वरुप व ज्ञानस्वरुप आहे. अशा अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि जाति दाखविणारी स्थूल, सूक्ष्म, कारण हीं तीन शरीरें व त्या त्या शरीराच्या ठिकाणीं अहंकार उत्पन्न करविणारी, तसेंच पुत्र, स्त्री, मित्र इत्यादिविषयक मोहांत पाडणारी ही अद्भुत शक्ति मोहकारी माया काय करणार नाहीं ? ती अघटित घटना करणारी असून ब्रह्मादि देवांनाही मोह पाडणारी आहे. 
विधिहरिहरविभेदमप्यखंडे ,
बतविरचय्य बुधानविप्रकामम् ।
भ्रमयति हरिहरभेदभावान् ,
अघटितघटनापटीयसी माया ॥ ५ ॥ 
५) ही माया आपल्या अद्भूतशक्तीनें एक, एव व अद्वितीय आत्म्याचे ठिकाणीं ईश्र्वरभाव दाखविते. व नंतर त्याच ईश्र्वराचे ठिकाणीं ब्रह्मदेव, विष्णु व शंकर असें भाव दाखविते. म्हणजे सत्वगुणप्रधान विष्णु, रजोगुणप्रधान ब्रह्मदेव व तमोगुणप्रधान शंकर या देवतांना उत्पन्न करते, व जगताची उत्पत्ति, स्थिति व लय हीं कामें त्यांच्याकडे नेमून देते. शास्त्रपरिचय ज्यांना उत्तम प्रकारचा आहेअशा महान पंडितांनाही शंकर, विष्णु व ब्रह्मदेव या देवता परस्परभिन्न आहेत अशा भ्रमांत पाडून त्यामध्यें आपापसांत कलह करावयास लावते. आचार्य म्हणतात, मायेची अघटित घटना कशी आहे याची मनानेंही कल्पना करतां येणार नाहीं. अशा प्रकारची अद्भुत मोहशक्तिवान् जी माया तिच्या सपाट्यांतून सुटावें अशी इच्छा असणार्‍या मुमुक्षूनें सर्वभावानें ईश्र्वराला शरण जाणें हाच उत्तम व सोपा मार्ग आहे



Custom Search

ParaPooja परापूजा


Adi Shankaracharyas Spiritual Stotras


परापूजा 
अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरुपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ॥ १ ॥
१) जो आत्मा अखण्ड, सच्चिदानंद, एकमात्र निर्विकल्पस्वरुप आहे, नित्य अद्वितीय भावानें वर्तमान असल्यामुळें, त्याच्या ठिकाणीं द्वैतभावाचा गंधही नाहीं, अशा आत्मतत्वाची पूजा कशी केली जाणार ? पूजा तर पूज्यपूजकभाव असेल तरच होते; अद्वैत तत्व जें ब्रह्म ( आत्मा ) त्याचे ठिकाणीं, पूज्य, पूजकादि त्रिपुटीचा अत्यंत आभाव आहे, यास्तव अद्वैत तत्त्वाची पूजा कोणच्या सामग्रीनें होणार ?    
पूर्णस्याऽवाहनं कुत्र, सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याऽचमनं कुतः ॥ २ ॥
२) सर्वव्यापक परमात्म्याचें आवाहन कसें करणार ? कारण जो कोणत्यातरी स्थानावर ासतो, किंवा नसतो, त्याचे आवाहन करतां येतें, परंतु जो सर्वत्र भरलेला आहे, त्याचे आवाहन कसें करतां येणार ? करतां येणार नाहीं. त्याचप्रमाणें सर्वाधाराला असन कोठलें ? बसणार्‍याला बसण्याकरितां आसन देतां येतें, परमात्मा तर बसणाराही नाहीं व उठणाराही नाहीं. जो उठनारा व बसणारा असतो तो सर्वांचा आधार होऊं शकणार नाहीं, एवढ्याचकरितां सर्वाधार प्रभूला आसन कशाचें व तें द्यावयाचेम कसें ? जो परमात्मा स्वरुपानें नित्य निर्मल आहे, त्याला पाद्यार्घ्यादिकांची आवश्यकता काय ? कारण पाद्य व अर्घ्य हीं परमात्म्याला स्वच्छ करण्याकरतां देतात, पण ज्याच्या ठिकाणी मलीनताच नाहीं, त्याला त्या पाद्यार्घ्यदिकांचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. तसेंच जो पवित्रच आहे, त्याला आचमनापासून काय फल ? कारण ाचमन शुद्धीकरितां असतें, जो कधीं अशुद्धच नाहीं, त्याला आचमनाचें काय प्रयोजन ? कांहीं नाहीं.      
निर्मलस्य कुतः स्नानं वस्त्रं विश्र्वोदरस्य च ।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतः तस्योपवीतकम्  ॥ ३ ॥
३) नित्यनिर्मलाला स्नानाचें काय प्रयोजन ? स्नान मलशुद्धीकरता केलें जातें. जो नित्य निर्मलच आहे. त्याला स्नानाचा काय उपयोग ? कांहीं नाहीं. ज्याच्या उदरांत सर्व विश्र्व सांठवलेलें आहे, त्याला नेसण्यास वस्त्र कोठून पैदा करणार ? कारण वस्त्र शरिराचें आच्छादन करतें, ज्यानें अखिल ब्रह्माण्डाला व्यापिलें, त्याला यज्ञोपवीताचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. वसिष्ठादि गोत्रयुक्त जे ब्राह्मणादि वर्ण आहेत, त्यांना यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार आहे. तात्पर्य, श्रौत, स्मार्त कर्म करण्याची इच्छा करणाराला यज्ञोपवीत धारण करण्याची आवश्यकता आहे, जो निष्काम आहे त्याला त्याचा काय उपयोग ? कांहीं नाहीं.    
निर्लेपस्य कुतो गंधः पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्विशेषस्य का भूषा कोऽलंकारो निराकृते ॥ ४ ॥
४) निर्लेपाला गंधाचा काय उपयोग. कारण अंतःकरण प्रसन्नतेकरितां गंधादिकांचा उपयोग होतो. पण जो नित्य प्रसन्न आहे, त्याला गंधाचा कांहींच उपयोग नाहीं. ज्याला वास घेण्याची इच्छा आहे, तो पुष्पादिकांचा वास घेण्याची इच्छा करितो. निर्वासनाला त्याचा कांहींच उपयोग नाहीं. निर्विशेषाला वस्त्रालंकारदिकांचा काय उपयोग ? त्याचप्रमाणें निराकाराला अलंकार कसा घालावा ? अलंकारानें साकार वस्तूला शोभा येते. ज्याला आकार नाहीं अशा निराकार आत्म्याला अलंकारादिकांचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. 
निरंजनस्य किं धूपैदीपैर्वा सर्वसाक्षिणः ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ॥ ५ ॥
५) निरंजनाला धूपादिकांचे काय फल ? सर्वसाक्षीरुप प्रकाशाला त्याच्या प्रकाशाकरितां प्रकाशाची अपेक्षा नसते. प्रकाशाला अन्य प्रकाशाची अपेक्षा मानली तर आत्माश्रयादि दोष येतात. सूर्यादि सर्व प्रकाशगोलकांचा, आत्मा प्रकाशक आहे. अशा स्वयंसिद्ध प्रकाशक आत्म्याचा प्रकाश कोण करणार ? कोणीं नाहीं. जो निजानंदानें नित्य तृप्त आहे त्याला तृप्तीकरितां नैवेद्यादिकाचें काय प्रयोजन ? कांहीं नाहीं.   
विश्र्वानंदयितुस्तस्य किं तांबूलं प्रकल्प्यते ।
स्वयंप्रकाशचिद्रुपो योऽसावर्कादिभासकः ॥ ६ ॥
६) सूर्यादि सर्वप्रकाशक वस्तूंना प्रकाशित करणार्‍या स्वयंप्रकाशाला ( ज्ञानस्वरुप ) , तसेंच आपल्या आनंदानें सर्वांला आनंदविणार्‍या आत्म्याला तांबुलादिकांचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. 
प्रदक्षिगाह्यनन्तस्य ह्यद्वयस्य कुतो नतिः ।
वेदवाक्यैरवेद्यस्य कुतः स्तोत्रं विधीयते  ॥ ७ ॥
७) अनन्तरुप व्यापक आत्म्याला प्रदक्षिणा कशी घालणार ? ज्याला अन्त आहे, आणि ज्याच्या सभोंवार फिरण्यास कांहीं स्थान आहे. त्याला प्रदक्षिणा घालणें शक्य आहे. पण ज्याला अन्त नाहीं असा व्यापक जो सर्वात्मा त्याला प्रदक्षिणा घालणें अशक्य आहे. तसेंच आद्वितीयाला नमस्कार कसा करावा? आपल्याहून भिन्न व्यक्तिला नमस्कार करतां येतो. परमात्मा एक व द्वैतशून्य आहे. म्हणून स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. अशा द्वैतशून्य परमात्म्याला नमस्कार कसा केला जाणार ? वेदवाक्याला जो अवेद्य त्याची स्तुति कोणत्या शब्दांत करणार ? करता येणार नाहीं. ज्याच्या ठिकाणीं नाम, रुप, क्रिया, जाति आणि संबंध असतो, ती वस्तु जाणता येते; अत्म्याच्या ठिकाणीं नामरुपादि वस्तुतः नाहींत याकरितां तो स्तुतीचा विषय कसा होणार ? अर्थात् होणार नाहीं.    
स्वयंप्रकाशमानस्य कुतो नीराजनं विभोः ।
अन्तर्बहिश्र्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत् ॥ ८ ॥
८) स्वयंप्रकाश आत्म्याला दीपादिकांच्या साधनानें आरती कशी करावी ? कारण आत्म्याच्या ठिकाणीं अंधकाराला प्रवेशच नाहीं. मग नीरांजनादि दीपाचा काय उपयोग ? कांहीं नाहीं. जो अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे, अशा आत्मरुप देवाचें विसर्जन कसें करावयाचें ? विसर्जन परिछिन्न वस्तुचें करतां येतें. जो परिपूर्ण भरलेला त्याचे विसर्जन कसें करावें ?    
एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा ।
एकबुद्ध्या तु देवेशे, विधेया ब्रह्मवित्तमैः ॥ ९ ॥
९) अशा प्रकारची पूजा, ब्रह्मतत्त्ववेत्यांकडून सर्व अवस्थांमध्यें सर्वदा केली जाते. तात्पर्य परमात्म्याशी एकरुपानें रहाणें हीच खरी तात्त्विक पूजा समजावी. 
आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहम् ,
पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः ।
संचारन्तु पदोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो ,
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो ! तवाराधनम् ॥ १० ॥
१०) हे शंभो ! महादेवा ! तूं माझा आत्मा आहेस म्हणून तुझ्याहून मी भिन्न नाही. माझी शुद्ध बुद्धि ही पार्वतीदेवी होय. माझे प्राण हे सहचारी गण होत, व हे शरीर शिवमंदिर होय. नाना प्रकारच्या शब्दादि विषयसेवन हीच आपली पूजा होय; झोंप ही समाधि अवस्था आहे. पायानें चालणें हीच प्रदक्षिणा, वाणीनें बोलणें हींच आपली स्तोत्रें होत. सारांश जें जें कर्म माझ्याकडून होईल तें तें सर्व आपलें आराधनच होय. 



Custom Search

KoupinPanchakam कौपीनपंचकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras
कौपीनपंचकम् 
वेदान्तवाक्येषु सदा रमन्तो 
भिक्षान्नमात्रेण च तुष्टिमन्तः,
अशोकवन्तः करुणैकवन्तः 
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ १ ॥
१) " अयमात्मा ब्रह्म ";  " सर्वं खल्विदं ब्रह्म ";  " शिवं शान्तमद्वैततम् प्रपंचोपशमम् " इत्यादि श्रुतिवाक्यांच्या विचारांत जो सदा रममाण झालेला असतो, म्हणजे या वाक्यांच्या रहस्याचें जो अहोरात्र चिंतन करितो, जो यदृच्छेने प्राप्त भिक्षान्नावर संतुष्ट असतो; जो शोकमोहशून्य व प्राणिमात्राकडून प्रत्युपकाराची अपेक्षा न करतां दया करितो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.    
मूलं तरोकेवलमाश्रयन्तः 
पाणिद्वयं भोक्तुममत्रयन्तः ।
कन्थामपि स्त्रीमिव कुत्सयन्तः ।
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ २ ॥  
२) जो नेहमी वृक्षमूलाचा आश्रय करतो म्हणजे गृहादिपरिग्रहशून्य अशा स्थितींत वागतो, दोन हातांत भिक्षा घेऊन भोजन करतो, म्हणजे आपले हात हेंच ज्यानें भिक्षेचें पात्र बनविलें, स्त्रीविषयक जसा त्याचे ठिकाणीं अनादर असतो, तसाच जो वस्त्रप्रावरणादिकांविषयींही ममताशून्य असतो, याप्रमाणें सर्वपरिग्रहशून्य, कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा. 
देहाभिमानं परिहृत्य दूरात् 
आत्मानमात्मन्यवलोकयन्तः ।
अहर्निशं ब्रह्मणि ये रमन्तः 
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ ३ ॥
३) ' मी देह आहे ' ' माझा देह आहे ' अशा प्रकारच्या क्लेशप्रद देहाभिमानाचा ज्या महात्म्यानें त्याग केला, जो विशुद्ध, विज्ञानघन, अद्वैत आत्म्यामध्यें आपल्याला पाहातो, म्हणजे आत्म्याहून भिन्न दुसरें कांहीं नाहीं असें जो पाहातो, आणि अहोरात्र, जो ब्रह्मानंदामध्यें निमग्न असतो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.  
स्वानंदभावे परितुष्टिमन्तः, 
सशान्तसर्वेन्द्रियवृत्तिमन्तः 
नान्तं न मध्यं न बहिः स्मरन्तः,
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ ४ ॥
४) जो शुद्धआत्मानंदामध्यें नित्य तृप्त असतो, ज्यानें सर्व इन्द्रियांच्या वृत्ती अंतर्मुख (शांत) केल्या आहेत, आंत मध्यें अगर बाहेर, प्रपंचाची ज्याला खबर नाहीं, म्हणजे ज्याच्या दृष्टीला अंतर्बाह्य प्रपंच प्रतीतीस येतच नाहीं, उलट सबाह्याभ्यंतर एक अखण्ड ब्रह्मतत्वच जो पाहातो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.  
पञ्चाक्षरं पावनमुच्चरन्तः,
पतिं पशूनां हृदि भावयन्तः ।
भिक्षाशिनो दिक्षु परिभ्रमन्तः, 
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ ५ ॥
५) जो ' नमः शिवाय ' या पवित्र मंत्राचा सदा उच्चार करीत असतो, सर्व चराचर जीवांचा स्वामी जो भगवान् शंकर , त्याचे जो हृदयांत नेहमी चिंतन करीत असतो; भिक्षान्त सेवन करीत होत्साता, जो सर्व दिशांमध्यें स्वछंदानें भ्रमण करीत असतो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा. 




Custom Search

UpadeshPanchakam उपदेपंचकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras


उपदेशपंचकम्
वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयताम् ,
तेनेशस्य विधीयतामपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम् ।
पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसंघीयताम् 
आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात्तूर्णं विनिर्गम्यताम्  ॥ १ ॥
१) ' स्वाध्यायोऽध्येतव्यः ' या न्यायानें नित्य ऋग्वेदादि वेदांचे अध्ययन करावें, वर्णााश्रमधर्माप्रमाणें वेदानें प्रतिपादित याग, दान, तप इत्यादि कर्मांचें श्रद्धापूर्वक अनुष्ठान करावें. या यागादि कर्मांनी ब्रह्मार्पणद्वारा जगदन्तर्यामी, चराचरव्यापी परमेश्र्वराची निष्कामबुद्धीनें व मोठ्या प्रेमानें उपासना कर; संसार फलदायी, असार सकाम कर्माचा मनापासून त्याग कर, अंतःकरणांत उद्भवणार्‍या अशुभ वासनांचा, सदाचारानें व सद्विचारानें नाश कर, क्षणलविरस व बाह्यात्कारी सुखरुप दिसणारें पण स्वरुपानें दुःखरुप, क्षणिक संसारसुखांतील दोषांचें अनुसंधान कर; जीव व ब्रह्म यांचें तत्त्व जाणण्याच्या प्रबल इच्छेनें, तद्विषयक शास्त्रांचा, संतसमागमांत राहून विचार कर; अशा रीतीनें जीवब्रह्मैक्य ज्ञान संपादन करण्याकरतां तुझें अंतःकरण मल व विक्षेपरहित झालें म्हणजे ममतास्पद ग्रहादि परिग्रहाचा त्याग कर, अर्थात् संन्यास ग्रहण कर. 
संगः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाऽऽधीयताम् ,
शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यताम् ।
सद्विद्वानुपसृप्यतां प्रतिदिनं तत्पादुके सेव्यताम् ,
ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरोवाक्यं समाकर्ण्यताम् ॥ २ ॥
२) सदाचारी, उदारचरित, महानुभाव व प्राणिमात्रावर निरपेक्ष कृपा करणार्‍या संतांचा संग कर. म्हणजे त्यांच्या सान्निध्यांत जाऊन रहा; जगत्कर्ता , आनन्दरुप भगवंताची, अनन्य, निष्काम, प्रेमार्द्र अंतःकरणानें दृढ भक्ति कर; शान्ति दान्ति, अभय, उपरम, अहिंसा, इत्यादि दैवी संपत्तीचा आश्रय कर. रागद्वेषप्रचुर व व्यग्रता उत्पन्न करणार्‍या कर्मांचा त्वरित त्याग कर. वेदाधीत, ब्रह्मनिष्ठ व विरक्त अशा महानुभाव संताच्या नित्य सान्निध्यांत रहा; व प्रेमळ अंतःकरणानें त्यांच्या चरणांची सेवा कर; म्हणजे संताच्या मनोगताप्रमाणें तूं आपलें आचरण ठेव. तात्पर्य काय तर त्यांना कायावाचामनानें शरण जा. अशा तुझ्या निरलस सेवेनें तूं त्यांच्या कृपेला पात्र होशील. मग तुझ्या सेवेनें संतुष्ट होऊन त्यांनीं उपदेशिलेल्या ओंकाररुप एकाक्षरब्रह्माचें अर्थानुसंधानपूर्वक निरंतर चिंतन कर. तसेंच वेदांतील शिरोभाग जें उपनिषदशास्त्र त्यानें प्रतिपादिलेल्या तत्त्वमस्यादि महावाक्यांचें त्यांच्यापासून अर्थसहित श्रवण कर. 
 वाक्यार्थश्र्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयताम् ,
दुस्तर्कात्सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् ।
ब्रह्मैवास्मि विभव्यतामहरहर्गर्वः परित्यज्यताम् 
देहेऽहं मतिख्झ्यतां बुधजनैर्वादः परित्यजताम् ॥ ३ ॥
३) ' अयमात्मा ब्रह्म ' , अहं ब्रह्मास्मि ' , ' तत्त्वमसि ',' प्रज्ञानं ब्रह्म ' या श्रुतींत सांगितलेल्या महावाक्यांचा अर्थ,  ब्रह्मनिष्ठ सद्गुरुच्या मुखानें श्रवण करुन त्यांचा एकाग्र चित्तानें विचार कर. वेदांतील शिरोभाग जी उपनिषदें त्यांनी प्रतिपादन केलेल्या अद्वैत सिद्धान्त पक्षाचा अवलंब कर. बहिर्मुख, दुराग्रही, तार्किक लोकांनी कल्पना केलेल्या तर्क वितर्कांचा त्याग कर. आणि श्रुतिसंमत सत्तर्काचें अनुसंधान कर. सच्चिदानंद, परिपूर्ण, शुद्ध ब्रह्म मी आहे अशी निरंतर आपल्या आत्मस्वरुपाविषयीं भावना ठेव. विद्या, जाति, कुल, पाण्डित्य, इत्यादिविषयक उत्पन्न होणारा अभिमान सोडून दे. क्षणभंगुर, तुच्छ, मलीन, कालग्रस्त, अशा शरीरविषयक अहंभावाच्या ध्यासाचा त्याग कर. ब्रह्मनिष्ठ, संसारविमुख, निरंतर, ईश्रवरध्यानरत, विद्वानांबरोबर आपल्या शुष्क पाण्डित्याच्या जोतावर वादविवाद न करितां त्यांनी दाखविलेल्या शास्त्रसंमत मार्गाचा श्रद्धेनें अवलंब कर. 
क्षुद्व्याधिश्र्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् ,
स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात्प्राप्तेन संतुष्यताम् ।
शीतोष्णादि विषह्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् ,
औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम् ॥ ४ ॥
४) क्षुधारुप रोगनिवारणार्थ भिक्षारुप औषध सेवन कर म्हणजे क्षुधाशमनार्थ अनासक्त होऊन भिक्षान्नसेवन कर, स्वादिष्ट अन्नाविषयीं मनांत कदापि अभिलाषा धरुं नको. प्रारब्धवशात् असें भिक्षान्न मिळेल त्यांतच संतुष्ट रहा. शीत-उष्ण,मान-अपमान, राग-द्वेष, सुख-दुःख, इत्यादि प्राप्त झाली असतां अंतःकरणाचा क्षोभ न होऊं देतां त्यांचे धैर्यानें सहन कर, चुकूनही व्यर्थवाक्य उच्चार केव्हाही करुं नको, नेहमी उदासीन असंग, निर्विकार, शांत, अशा स्थितींत रहा. आणि अन्य व्यक्तीवर कृपा अगर निष्ठुरता या दोहोंचा त्याग कर.
एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् ,
पूर्णात्मा सुसमीक्ष्यतां जगदिदं तद्वाधितं दृश्यताम् ।
प्राक्कर्मप्राविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरैः श्र्लिष्यताम् 
प्रारब्धं त्त्रिह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम् ॥ ५ ॥
५) एकान्त, पवित्र व संतांनीं सेवित व जनसंपर्करहित अशा एकान्तस्थलीं मोठ्या सुखानें वास्तव्य करावें, सर्वजगदात्मक, सच्चिदानंद जो नारायण त्याचे स्वरुपाचे ठिकाणी चित्त स्थिर करावें, खालीम, वर, आंत, बाहेर, सर्व दिशांमध्यें एकमात्र जो पूर्णब्रह्म श्रीकृष्ण तो भरलेला आहे असें नित्य अनुसंधान करावें. हें मायाकार्य नामरुपात्मक जगत् कल्पित म्हणजे मिथ्या आहे असें समजून त्या जगताचें अधिष्ठान जें ब्रह्म त्याच्या ठिकाणीं त्याचा बाध कर म्हणजे ' अध्यस्त वस्तू अधिष्ठानरुप असते ' या न्यायानें जगत् ब्रह्मरुप पहा; आत्मतत्त्वज्ञानानें संचित कर्माचा नाश कर, क्रियमाण अंगीं लागूं देऊं नको, आणि प्रारब्ध कर्माचा भोगानें नाश कर; व नित्य आपल्या परब्रह्मरुप स्थितींत निमग्न होऊन रहा.
यः श्र्लोकपंचकमिदं पठते मनुष्यः ,
संचितयत्यनुदिनं स्थिरतामुपेत्य ।
तस्याशु संसृतिदवानलतीव्रघोर-
-तापः प्रशान्तिमुपयाति चिति प्रसादात् ॥ ६ ॥
६) जो कोणी साधक भगवत्पूज्यपाद श्रीशंकराचार्यप्रणीत वरील पांच श्र्लोकांचें मोठ्या आदरानें पठन करील व नित्य एकाग्र अंतःकरणानें त्यांच्या अर्थाचे चिंतन करील, तर शुद्ध, सर्वान्तर्यामी, ज्ञानस्वरुप ईश्र्वर कृपाप्रसादानें त्याच्या संसाररुप दावानलापासून प्राप्त होणार्‍या आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या त्रिविध तापांचा नाश होईल. 



Custom Search