Tuesday, December 15, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 3
Ovya 51 to 75 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ३ 
ओव्या ५१ ते ७५

 देखें बुद्धीची भाषा नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।

ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥ ५१ ॥

५१) पाहा, जें कर्म, बुद्धीला समजण्याच्या पूर्वीं व मनांत विचार उद्भवण्याच्या अगोदर होतें, त्या ( कर्माच्या ) व्यवहाराला ‘ कायिक ‘ व्यवहार म्हणतात.

हेंचि मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।        

योगिये कर्में करिती तैशीं । केवळ तनू ॥ ५२ ॥

५२) हेंच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक, ज्याप्रमाणें तान्ह्या मुलाची हालचाल असते, त्याप्रमाणें योगी केवळ शरीरानेंच कर्में करतात.

मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।

तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥

५३) मग हें पांच भूतांचें बनलेलें शरीर ज्या वेळेला झोपलेलें असतें, त्या वेळेला ज्याप्रमाणें एकटें मनच स्वप्नांत व्यवहार करतें.  

नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा ।

देहा होंऊ नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥

५४) अर्जुना, एक आश्र्चर्य पाहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे ? ती देहाला जागें होऊं देत नाहीं, पण सुखदुःखांचा भोग भोगविते.   

इंद्रियांचां गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।

तो केवळ गा म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥

५५) अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असें जें कर्म उत्पन्न होतें, त्यास केवळ ‘ मानसिक ‘ कर्म म्हणतात.

योगिये तोहि करिती । परी कर्में तेणें न बंधिजती ।

जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥ ५६ ॥

५६) योगी तेंहि कर्म करतात, पण तें त्याकर्मानें बांधले जात नाहींत; कारण त्यांनी अहंकाराची संगति टाकलेली असते. 

आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।

मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ॥ ५७ ॥

५७) आतां ज्याप्रमाणें भूत संचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होतें, मग त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात.

स्वरुप तरी देखे । आळविलें आइके ।

शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥

५८) त्यास रुप तर दिसतें, हाकां मारलेलें ऐकूं येतें, तो तोंडानें शब्दांचा उच्चारहि करतो, परंतु हें सर्व केल्याची जाणीव नसते.   

हें असो काजेंविण । जें जें कांहीं कारण ।

तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥

५९) हें राहूं दे, तो प्रयोजनावांचून जें जें कांहीं करतो, ते ते सर्व केवळ इंद्रियांचें कर्म आहे, असें समज.

मग सर्वत्र जें जाणतें । तें बुद्धीचें कर्म निरुते ।

वोळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥ ६० ॥

६०) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणीं जाणण्याचें जें काम आहे, ते खरोखर बुद्धीचें आहे, असे ओळख.

ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी ।

परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥ ६१ ॥

६१) ते ( कर्मयोगी ) बुद्धि पुढें करुन मनःपूर्वक कर्मे करतात; पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षांहि मुक्त दिसतात.

जे बुद्धीचिये ठावूनि देहीं । तयां अहंकाराचा सेचि नाहीं ।

म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ॥ ६२ ॥

६२) कारण त्यांच्यामध्यें बुद्धिपासून देहापर्यंत कोठेंहि अहंकाराचे स्मरणच नसतें, म्हणून अशा कर्मांचें आचरण करीत असतांहि ते शुद्धच असतात, असें समज.

अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म ।

हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ॥ ६३ ॥

६३) अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेलें जें कर्म, तेंच नैष्कर्म्य होय; ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट ( प्राप्त पुरुष ) समजतात.

आतां शांतरसाचें भरिते । सांडीत आहे पात्रातें ।

जे बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥

६४) आतां ( माझ्या बोलण्यांतील ) शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे; कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचें व्याख्यान करतां आलें.   

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।

तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ६५ ॥

६५) ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेनें नाहींसा झाला आहे, त्यांनाच हें ऐकण्याची योग्यता आहे.

 हा असो अतिप्रसंगु । न संडीं पां कथालागु ।

होईल श्र्लोकसंगतिभंगु म्हणोनियां ॥ ६६ ॥

६६) ( या ज्ञानेश्र्वरमहाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, ) हें विषयांतर करणें पुरें. कथेचा संबंध सोडूं नकोस, कारण तसें करण्यानें श्र्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. 

जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।

तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥ ६७ ॥

६७) जें मनानें आकलन करणें कठीण आहे, घासाघीस केली तर बुद्धीला बुद्धीला जें प्राप्त होत नाहीं तें दैवाच्या अनुकूलतेनें तुला सांगतां आलें. 

जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।

तरी आणिकें काय करावें । सांगें कथा ॥ ६८ ॥

६८) जें स्वभावतः शब्दांच्या पलीकडचें आहे, तें बोलण्यांत जर सांपडलें, तर आणिकांचें काय प्रयोजन ? तेव्हां तूं श्रीकृष्णार्जुनसंवादाची चाललेली कथा सांग. 

हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा ।

म्हणे संवादु तया दोघांचा । परिसोनि परिसा ॥ ६९ ॥

६९) श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तिनाथांचे शिष्य ( ज्ञानेश्र्वरमहाराज ) म्हणतात, ‘ कृष्ण आणि अर्जुन या दोघांत झालेलें संभाषण एवढा वेळ ऐकलें तें लक्षांत घेऊन यापुढें ऐका. 

मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिह्न पुरतें ।

सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥ ७० ॥

७०) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आतां तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचें चिन्ह संपूर्ण सांगेन. तूं चांगलें लक्ष दे.

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।

तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ॥ ७१ ॥

७१) तरी या जगांत ज्ञानयोगानें जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला घरांत घुसून शांति वरते.

येरु कर्मबंधें । किरीटी । अभिलाषाचिया गांठी ।

कळासला खुंटीं । फळभोगाचां ॥ ७२ ॥

७२) अर्जुना, त्याहून दुसरा ( आसक्त ) कर्माच्या बंधामुळें अभिलाषेच्या दाव्यानें फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो.

जैसा फळाचिये हावे । ऐसें कर्म करी आघवें ।

मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥ ७३ ॥

७३) फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणें तो सर्व कर्में करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाहीं, अशा अकर्तेपणाच्या समजुतीनें जो त्याविषयीं उदासीन राहातो,

तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।

तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥ ७४ ॥

७४) तो जिकडे पाहातो, तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथें सांगेल तेथें महाबोध नांदतो.

नवद्वारे देहीं । तो असतुचि परि नाहीं ।

करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥ ७५ ॥

७५) नऊ छिद्रांच्या देहामध्यें वागत असूनहि त्याचें 

देहाशीं तादात्म्य नसतें. तो फलांचा त्याग करणारा कर्में 

करीत असतांनाहि ( तत्त्वतः ) कांहींच करीत नाहीं.



Custom Search

No comments: