Thursday, December 24, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 5 
Ovya 101 to 125 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ५ भाग ५ 
ओव्या १०१ ते १२५

तैसें नामरुप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।

मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥ १०१ ॥

१०१) त्याप्रमाणें त्याच्या नामरुपाची गोष्ट आहे. एर्‍हवीं, ज्याचें मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे.

ऐसोनि समदृष्टि जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।

अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥ १०२ ॥

१०२) अशा तर्‍हेनें जो समदृष्टीनें असतो, त्या पुरुषाला ( ओळखण्याचें ) लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला तें थोडक्यांत सांगतों. त्याचा तूं विचार कर. 

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।

तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥ १०३ ॥

१०३) मृगजळाच्या लोंढ्यानें ज्याप्रमाणें मोठा पर्वत ( किंचितहिं ) ढकलला जात नाहीं, त्याप्रमाणें चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असतां, ज्याच्यामध्यें विकार उत्पन्न होत नाहीत;   

तोचि तो निरुता । समदृष्टि तत्त्वता ।

हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥ १०४ ॥

१०४) तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच तेम ब्रह्म ( समज ). 

जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं ।

तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥ १०५ ॥

१०५) जो आत्मस्वरुपाला सोडून केव्हांहि इंद्रियरुपी गांवांत येत नाहीं ( म्हणजे इंद्रियांशीं तादात्म्य करीत नाहीं ), तो विषय सेवन करीत नाहीं, यांत आश्र्चर्य तें काय आहे ?

सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडें अंतरें ।

रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ॥ १०६ ॥

१०६) अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेनें अंतःकरणांतच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकीत नाही. ( विषयाकडे प्रवृत्त ) होत नाही).

सांगें कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।

तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु आहे ॥ १०७ ॥

१०७) सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो वाळूचे कण चाटीत बसेल काय ?  

तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपपांचि फावलें ।

तया विषय सहज सांडवले । सांगों काई ॥ १०८ ॥

१०८) त्याप्रमाणें ज्याला स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झालें, त्या सहजच विषय सुटले, हें काय सांगावयास पाहिजे ?

एर्‍हवीं तरी कौतुकें । विचारुनि पाहें पां निकें ।

या विषयांचेनि सुखें । झकवती कवण ॥ १०९ ॥ 

१०९) एर्‍हवीं सहजच चांगला विचार करुन पाहा, या विषयाच्या सुखानें कोण फसले जातात ? 

जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।

जैसें रंक कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥ ११० ॥

११०) ज्याप्रमाणें भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणें ज्यांनीं आत्मस्वरुपाचा अनुभव घेतला नाहीं, तेच या विषयांत रंगतात.

नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें ।

मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥ १११ ॥

१११) अथवा तहानेनें त्रस्त झालेलीं हरिणें, भ्रमानें खर्‍या पाण्याला विसरुन, ( मृगजळाला ) पाणी आहे असें समजून माळरानावरच येऊन पोचतात;   

तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।

तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥ ११२ ॥

११२) तसेंच ज्याला आत्मस्वरुपाचा अनुभव नाहीं, ज्याच्या ठिकाणीं स्वरुपानंदाचा नेहमीं पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरुप वाटतात.

एर्‍हवीं विषयीं काइ सुख आहे । हें बोलणेंचि सारिखें नोहे ।

तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥ ११३ ॥

११३) एर्‍हवीं विषयांमध्यें कांहीं सुख आहे, हें म्हणणें बोलण्याच्यासुद्धां योग्यतेचें नाहीं. नाहीं तर विजेच्या चमकण्यानें जगामध्यें कां उजाडत नाहीं ? 

सांगें वातवर्षआतपु धरे । ऐसें अभ्रच्छायाचि जरी सरे ।

तरी त्रिमळिकें धवळारें । करावी कां ॥ ११४ ॥

११४) सांग. वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचें काम जर ढगांच्या सावलीनेंच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरें बांधण्याचा ( खटाटोप ) कां करावा ?    

म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।

जैसें महुर कां म्हणिजे । विषकंदातें ॥ ११५ ॥

११५) म्हणून ज्याप्रमाणें विषयाच्या कांद्याला ( बचनागाला ) मधुर म्हणावें, त्याप्रमाणें विषयांत सुख आहे असें जे म्हणतात, ती ( विषयाचें खरें स्वरुप न जाणतांच ) व्यर्थ केलेली बडबड आहे ( असें समज ).

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।

तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥ ११६ ॥

११६) किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असें म्हणतात ( पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो, ) किंवा मृगजळालाच ‘ जल ‘ असें म्हणता; त्याचप्रमाणें विषयांपासून येणार्‍या अनुभवाला ' सुख ‘ म्हणणें व्यर्थ बडबड आहे..  

हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीची साउली ।

ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥ ११७ ॥

११७) हें सर्व प्रतिपादन राहूं दे. तूंच सांग सर्पाच्या फणीची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरें !

जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।

तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणे ॥ ११८ ॥

११८) अर्जुना, ज्याप्रमाणें गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाहीं, तेथपर्यंत ठिक; त्याप्रमाणें विषयांच्या संगाची स्थिति आहे, हें तूं निःसंशय समज !

हें विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।

तैं पांडुरोगाचिये पुष्टी । सारिखें दिसे ॥ ११९ ॥

११९) विरक्तांच्या दृष्टीनें पाहिलें तर हें विषयसुख, अर्जुना पंडुरोगामध्यें आलेल्या सुजेप्रमाणें ( घातक ) आहे. असें समज.   

म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।

परि काय करिती मूर्ख । न सेवितां न सरे ॥ १२० ॥

१२०) म्हणून विषयांच्या उपभोगांमध्यें जें सुख असतें, तें प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे, हे समज; परंतु काय करतील मूर्ख ? विषयांचें सेवन केल्याशिवाय त्यांचें चालतच नाहीं.

ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे ।

सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥ १२१ ॥

१२१) ते बिचारे मूर्ख त्या विषयांचें आंतलें स्वरुप जाणत नाहींत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे अगत्य सेवन होतें. तूंच सांग, पुवांच्या चिखलांतील किडे पुवांची किळस घेतात काय ?

तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।

ते भोगजळातें जलचर । सांडिती केवीं ॥ १२२ ॥

१२२) त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेलें असतें. ते विषयरुपी चिखलांतील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरुपी मासे विषयोपभोगरुपी पाण्याला कसें टाकतील ?  

आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।

जरी विषयांवरी विरक्ति । धरिती जीव ॥ १२३ ॥ 

१२३) शिवाय, जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दुःखदायक योनि ज्या आहेत, त्या सर्व निरर्थक होणार नाहींत काय ?

नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।

हे विसांवेनवीण वाट । वाहावी कवणें ॥ १२४ ॥

१२४) अथवा गर्भांत राहणें वगैरे संकटें किंवा जन्म आणि मरण यांपासून होणारे कष्ट, हा मार्ग अविश्रांतपणें कोणी चालावा ?

जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल ।

आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ॥ १२५ ॥

१२५) जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील, तर 

मोठमोठ्या दोषांस राहावयास जागा कोठें मिळेल ? 

आणि मग या जगामध्यें संसार हा शब्दच खोटा ठरणार

नाहीं काय ?


No comments: