Saturday, August 22, 2020

ShriRamcharitmans Part 36 श्रीरामचरितमानस भाग ३६

 

ShriRamcharitmans Part 36 
Doha 195 to 197 
श्रीरामचरितमानस भाग ३६ दोहा १९५ ते १९७ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--मास दिवस कर दिवस भा मरम न जानइ कोइ ।
रथ समेत रबि थाकेउ निसा कवन बिधि होइ ॥ १९५ ॥
एक महिन्याचा दीर्घ दिवस झाला. याचे रहस्य कुणाला समजले नाही. सूर्य आपल्या रथासह तेथेच थांबला. मग रात्र कशी होणार ? ॥ १९५ ॥
यह रहस्य काहूँ नहिं जाना । दिनमनि चले करत गुनगाना ॥
देखि महोत्सव सुर मुनि नागा । चले भवन बरनत निज भागा ॥
हे रहस्य कुणालाच कळले नाही. सूर्यदेव ( भगवान श्रीरामांचे ) गुणगान करीत गेला. हा महोत्सव पाहून देव, मुनी आणि नाग आपल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या घरी गेले. ॥ १ ॥
औरउ एक कहउँ निज चोरी । सुनु गिरिजा अति दृढ़ मति तोरी ॥
काकभुसुंडि संग हम दोऊ । मनुजरुप जानइ नहिं कोऊ ॥
हे पार्वती, तुझी बुद्धी ( श्रीरामांच्या चरणी ) पूर्ण रमलेली आहे. म्हणून मी आणखी एक गुपित तुला सांगतो ते ऐक. काकभुशुंडी आणि मी दोघेजण बरोबर होतो, परंतु आम्ही मनुष्यरुपात असल्यामुळे आम्हांस कोणी ओळखू शकले नाही. ॥ २ ॥
परमानंद प्रेम सुख फूले । बिथिन्ह फिरहिं मगन मन भूले ॥
यह सुभ चरित जान पै सोई । कृपा राम कै जापर होई ॥
परम आनंद आणि प्रेम-सुखाने प्रफुल्लित झालेले आम्ही आनंदमग्न मनाने नगरीच्या गल्ल्यांमधून स्वतःला विसरुन फिरत होतो. परंतु हे शुभ चरित्र श्रीरामांची ज्याच्यावर कृपा असेल, तोच जाणू शकेल. ॥ ३ ॥
तेहि अवसर जो जेहि बिधि आवा । दीन्ह भूप जो जेहि मन भावा ॥
गज रथ तुरग हेम गो हीरा । दीन्हे नृप नानाबिधि चीरा ॥
त्यावेळी जो जसा आला आणि ज्याला मनाला जे आवडले, ते राजांनी त्याला दिले. हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, गाई, हिरे आणि तर्‍हेतर्‍हेची वस्त्रें राजांनी वाटली. ॥ ४ ॥
 दोहा--मन संतोषे सबन्हि के जहँ तहँ देहिं असीस ।
सकल तनय चिर जीवहुँ तुलसिदास के ईस ॥ १९६ ॥
राजांनी सर्वांना संतुष्ट केले. ( त्यामुळे ) सर्व लोक सर्वत्र आशीर्वाद देत होते की, तुलसीदासाचे स्वामी असलेले सर्व पुत्र चिरंजीव होवोत. ॥ १९६ ॥
कछुक दिवस बीते एहि भॉंती । जात न जानिअ दिन अरु राती ॥
नामकरन कर अवसरु जानी । भूप बोलि पठए मुनि ग्यानी ॥
अशाप्रकारे काही दिवस निघून गेले. दिवस-रात्र कसे जात होते, हेच कळत नव्हते. तेव्हा नामकरण-संस्काराची वेळ झाल्याचे पाहून राजांनी ज्ञानी मुनी वसिष्ठांना बोलावणे पाठविले. ॥ १ ॥
करि पूजा भूपति अस भाषा । धरिअ नाम जो मुनि गुनि राखा ॥
इन्ह के नाम अनेक अनूपा । मैं नृप कहब स्वमति अनुरुपा ॥
मुनींची पूजा केल्यावर राजांनी सांगितले की, ' हे मुनी, तुमच्या मनात जो विचार असेल, त्याप्रमाणे नावे ठेवा. ' ( मुनी म्हणाले, ) ' हे राजा, यांची अनेक अनुपम नावे आहेत, तरीही मी आपल्या विचाराप्रमाणे सांगतो. ॥ २ ॥
जो आनंद सिंधु सुखरासी । सीकर तें त्रैलोक सुपासी ॥
सो सुखधाम राम अस नामा । अखिल लोक दायक बिश्रामा ॥
हा जो आनंदाचा सागर व सुखाचे भांडार आहे, ज्याच्या ( आनंद सिंधूच्या ) एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात, त्या ( तुमच्या सर्वांत मोठ्या पुत्राचे ) नाव ' राम ' आहे, तो सुखाचे माहेर आणि संपूर्ण लोकांना शांती देणारा आहे. ॥ ३ ॥
बिस्व भरन पोषन कर जोई । ताकर नाम भरत अस होई ॥
जाके सुमिरन तें रिपु नासा । नाम सत्रुहन बेद प्रकासा  ॥
जो जगाचे भरण-पोषण करतो, त्या ( तुमच्या दुसर्‍या ) पुत्राचे नाव ' भरत ' असेल. ज्याच्या स्मरणानेच शत्रूचा नाश होतो, त्याचे वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले ' शत्रुघ्न ' नाव आहे. ॥ ४ ॥
दोहा--लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार ।
गुरु बसिष्ट तेहि राखा लछिमन नाम उदार ॥ १९७ ॥
जो शुभ लक्षणांचे धाम आहे, श्रीरामांचा आवडता आहे आणि जगाचा आधार आहे, त्याचे गुरु वसिष्ठांनी ' लक्ष्मण ' असे सुंदर नाव ठेवले. ॥ १९७ ॥
धरे नाम गुर हृदयँ बिचारी । बेद तत्व नृप तव सुत चारी ॥
मुनि धन जन सरबस सिव प्राना । बाल केलि रस तेहिं सुख माना ॥
गुरुंनी विचारपूर्वक ही नावे ठेवली ( आणि म्हटले ) ' हे राजा, तुमचे चारी पुत्र हे वेदाचे तत्त्वास्वरुप ( प्रत्यक्ष परात्पर भगवान ) आहेत. जे मुनिजनांचे धन, भक्तांचे सर्वस्व आणि श्रीशंकरांचे प्राण आहेत, ते ( या प्रसंगी तुम्हा लोकांच्या प्रेमापोटी ) बाललीलेमध्ये सुख मानत आहेत. ' ॥ १ ॥
बारेहि ते निज हित पति जानी । लछिमन राम चरन रति मानी ॥
भरत सत्रुहन दूनउ भाई । प्रभु सेवक जसि प्रीति बड़ाई ॥
लहानपणापासूनच श्रीरामांना आपले परम कल्याण करणारे स्वामी मानून लक्ष्मणाने त्यांच्या चरणी प्रेम केले. भरत व शत्रुघ्न या दोघा भावांमध्ये स्वामी-सेवकाच्या ज्या प्रेमाची प्रशंसा होते, तशी प्रीती होती. ॥ २ ॥
स्याम गौर सुंदर दोउ जोरी । निरखहिं छबि जननीं तून तोरी ॥
चारिउ सील रुप गुन धामा । तदपि अधिक सुखसागर रामा ॥
श्याम व गौर देहाच्या दोन्ही सुंदर जोड्यांचे लावण्य पाहून माता ( त्यांना दृष्ट लागू नये म्हणून ) मीठमोहर्‍या ओवाळून टाकत. तसे पाहाता चारीही पुत्र शील, रुप आणि गुणांचे निधाम होते, तरीही सुख-सागर श्रीराम हे सर्वांत श्रेष्ठ होते. ॥ ३ ॥
हृदयँ अनुग्रह इंदु प्रकासा । सूचत किरन मनोहर हासा ॥
कबहुँ उछंग कबहुँ बर पलना । मातु दुलारइ कहि प्रिय ललना ॥
त्यांच्या हृदयांत कृपारुपी चंद्र प्रकाशित होता. मनाला मोहून टाकणारे त्यांचे हास्य त्या कृपारुपी चंद्राच्या किरणांचे द्योतक होते. कधी मांडीवर ( घेऊन ) तर कधी सुंदर पाळण्यात ( घालून ) माता ' माझ्या लाडक्या ' म्हणून त्यांना जोजवत होती. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: