Thursday, February 25, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 22 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बावीसावा (२२) भाग१/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 22
Kilotala went to Sinhaldwip with Uparicharvasu. She was Padmini of Sinhaldwip who had been on the earth because of the curse from Uparicharvasu. Uparicharvasu assured her that after 12 years he would bring Machchhindra to her. Then she would meet Meennath and Goraksha also. Goraksha with Machchhindra and Meennath went for tirthyatra leaving female kingdom. Goraksha on the way showed the place to Machchhindra where he met with Kanifa. He told everything he knew about Jalindar to Machchhindra. Then in the Helapattanam they met Mainavati mother of Gopichand. Goraksha and Machchhindra were testing each other whether they had with them having the principles of the Nath-Panth or not. Now in the next 23rd Adhyay Dhanudisut Malu from Narahari Family will tell us what happens next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बावीसावा (२२) भाग १/२ 
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी कमळाकांता । कमळनाभा कमलोद्भवपिता ।
कमळपत्राक्षा दुःखहर्ता । पुढें ग्रंथ रसाळ बोलवीं ॥ १ ॥
भक्तिसारग्रंथ हा रत्न । बोलवीं श्रोत्यांकारण । 
मागिले अध्यायीं गोरक्षनंदन । मच्छिंद्र घेऊनि गेला असे ॥ २ ॥
नेला तरी कीलोतळा । बुडालीसे शोकाब्धिजळा ।
ते उपरिचरवसु तरणिआगळा । काढावया पातला ॥ ३ ॥
स्थावरबोधाची बांधूनि सांगडी । शोकाब्धींत घातली उडी ।
शब्दार्थी मारुनि बुडी । धैर्य कांसे धरियेले ॥ ४ ॥
धरिल्यावरी बाहेर काढुनि । म्हणे माय वो सावधानी ।
शोक सांडीं अशाश्र्वत गहनी । शाश्र्वत नाहीं कांहींच ॥ ५ ॥
पाहतेपणीं जें जें दृश्य । तें आभासपणीं पावे नाश ।
तूं शोक करिसी शब्दप्राप्तीस । श्र्लाघ्य तूंतें लागेना ॥ ६ ॥
तूं कोठील मच्छिंद्र कोण । स्वर्ग-भूमीचा झाला संगम ।
योग तितुका भोगकाम । करुनि गेला जननीये ॥ ७ ॥
तूं अससी स्वर्गवासिनी । मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ।
परी प्रारब्धें सहजयोगेंकरुनी । गांठी पडली उभयतां ॥ ८ ॥
पडली परी मच्छिंद्रनाथ । स्मरोनि गेला आपुलें हित ।
तूं आपुलें स्वहित निश्र्चित । सांभाळीं कीं जननीये ॥ ९ ॥
तूं झालीस पदच्युत । तरी तें सांभाळीं निश्र्चित ।
तरी आतां मानूनि व्यक्त । होऊनि चाल जननीये ॥ १० ॥
तूं पातलिया सिंहलद्वीप । मग मच्छिंद्रयोगें स्थावरकंदर्प ।
पूर्ण होईल शुद्धसंकल्प । मच्छिंद्र दृष्टीं पाहूनिया ॥ ११ ॥
द्वादश वर्षे झालिया पूर्ण । तूंतें भेटवीन मच्छिंद्रनंदन। 
मीननाथादि तपोधन ।गोरक्ष दृष्टीं पाहसील तूं ॥ १२ ॥
म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन । काय पडेल त्या कारण ।
सिंहलद्वीपीं पाकशासन । महामख आरंभील ॥ १३ ॥
तेव्हां विष्णु विरिंची रुद्र । तया स्थानीं येती भद्र । 
सकळ देवादिक मित्र चंद्र । एका ठायीं मिळतील ॥ १४ ॥
ते नवनाथादि प्रतापवंत । ऐक्य करील शचीनाथ ।
गहिनी गोपीचंद भर्तरीसहित । एका ठायीं मिळतील ॥ १५ ॥
तरी आतां शोक कां व्यर्थ । सांडीं प्रांजळ करीं चित्त ।
विमानारुढ होऊनि त्वरित । सिंहलद्वीपीं चाल कीं ॥ १६ ॥
ऐसें ऐकोनि मैनाकिनी । महाराजा श्र्वशुरप्राज्ञी ।
द्वादश वर्षें मच्छिंद्र नयनीं । दावीन ऐसें म्हणतसां ॥ १७ ॥
तरी मखमंडप पाकशासन । करो अथवा न करो पूर्ण ।
जरी मज दावाल मम नंदन । तरी मज भाष्य द्यावी ॥ १८ ॥
भाष्य दिधल्या अंतरपुटीं । विश्र्वासरत्ना रक्षीन पोटीं ।
मग हे शोक दरिद्र पाठीं । चित्त सांडील महाराजा ॥ १९ ॥
ऐसें बोलतां मैनाकिनी । श्र्वशुर हास्य करी आननीं ।
मग करतलभाष्य देऊनी । संतुष्ट केलें सुनेतें ॥ २० ॥
यावरी बोले कीलोतळा मातें नेतां स्वर्गमंडळा । 
परी नृपपणीं या स्थळा । कोणालागीं स्थापावें ॥ २१ ॥
येरु म्हणे ऐक वचन । सवें सेवेसी आहेत क्रियावान ।
दैर्भामा उत्तम नामानें । राज्य तीतें ओपीं कां ॥ २२ ॥
मग अवश्य म्हणे मैनाकिनी । दैर्भामा राज्यासनीं ।
बैसविली अभिषेक करुनी । राज्यपदीं तेधवां ॥ २३ ॥
राज्यीं ओपूनि दैर्भामा । मिळती झाली विमानसंगमा ।
परी सकळ देशींच्या शैल्या रामा । शोकाकुळ झाल्या कीं ॥ २४ ॥
म्हणती माय वो शुभाननी । तुम्ही जातां आम्हांसी टाकुनी ।
आम्हां पाडसांची हरिणी । दयाळ माय अससी तूं ॥ २५ ॥
असो ऐशा बहुधा शक्ती । शैल्या शोकाकुलित होती ।
मग तितुक्यां समजावूनि युक्तीं । विमानयानीं आरुढली ॥ २६ ॥
दैर्भामेसी नीतिप्रकार । सांगूनि युक्ती समग्र ।
यथा समान प्रजेचा भार । सांभाळीं कां साजणीये ॥ २७ ॥
जेथील तेथें हित फार । तैसें केलें गोचर ।
मग विमानीं आपण सश्र्वशुर । स्वर्गमार्गें गमताती ॥ २८ ॥
असो विमान पावे द्वीपाप्रती । पदा स्थापिली ते युवती ।
मग तो उपरिचर सहजगती । आपुल्या स्थाना पैं गेला ॥ २९ ॥
जैसीं दिनखेळमेळें । चरुं जाती पक्षिकुळें ।
येरी होतां सायंकाळें । आपुल्या स्थाना सेविती ॥ ३० ॥
त्याचि न्यायें उपरिदक्षें । आणिली कीलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष ।
शापमोचन सायंकाळास । स्थाना पावली आपुल्या ॥ ३१ ॥
कीं अब्धीचें अपार जीवन । व्यापी महीतें मच्छमुखानें ।
परी तें पुन्हा सरिताओघानें । ठायींचे ठायीं जातसे ॥ ३२ ॥
त्याचिया न्यायें स्नुषा श्र्वशुर । पावते झाले स्वस्थानावर । 
परी तैं इकडे नाथ मच्छिंद्र । गौडबंगालीं पातला ॥ ३३ ॥
मिननाथ स्कंधीं वाहून । मार्गावरी करिती गमन ।
तों शैल्यदेशसीमा उल्लंघून । गौडबंगालीं पातले ॥ ३४ ॥
मार्गीं लागतां ग्राम कोणी । त्या ग्रामांत संचरोनी । 
गोरक्ष भिक्षा आणी मागुनी । उदरापुरती तिघांच्या ॥ ३५ ॥
ऐसेपरी निर्वापण । मार्गी करिताती गमन ।
तों कौलबंगाला सांडून । गौडबंगाली पातले ॥ ३६ ॥
मार्गी चालतां सहजस्थितीं । तों कानिफा पूर्वी भेटला तयांप्रती ।
तेथें पातल्या त्रिवर्गमूर्ती । गमन करितां मार्गातें ॥ ३७ ॥
तेथें येतांचि गोरक्ष जेठी । स्मरण झालें तयांचे पोटीं ।
कीं अच्युतवृक्षापुटीं । कानिफाची भेटी झालीसे ॥ ३८ ॥
झाली परी हे उत्तम स्थान । महायशस्वी पुण्यवान ।
मातें दाविले श्रीगुरुचरण । जैसे चुकल्या वत्सासी ॥ ३९ ॥
प्रत्यक्ष माझी मच्छिंद्रराणी । गेली होती आदिपट्टराणी । 
मी पाडस रानोरानीं । निढळ्यावाणी लागतसे ॥ ४० ॥
कीं मज वत्सासी माउली । सहज रानीं चरावया गेली । 
शैल्या व्याघ्रें आव्हाटिली । ती भेटविली रायानें ॥ ४१ ॥
मग स्कंधीं होता नाथ मीन । तयालागीं महीं ठेवून ।
दृढ पायीं केलें नमन । नेत्रीं अश्रु लोटले ॥ ४२ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । बोलता झाला गोरक्षातें ।
म्हणे बाळा अश्रुपात । निजचक्षूंसी कां आले ॥ ४३ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनंदन । मग सकळ दुःखाचे मंडण ।
तें गोरक्षचित्ती प्रविष्ट होऊन । नेत्रीं नीर अपार लोटलें ॥ ४४ ॥
सांगूं जातां मुखानें । तो कंठ आलासे भरुन ।
मग क्षण एक तया स्थानीं बैसून । स्थिर चित्त पैं केले ॥ ४५ ॥
जैसें आकाशीं अभ्र दाटतां । पुन्हां निर्मळ होय तत्त्वतां ।
तैसें दुःख मोह चिंता । टाकूनि निर्मळ पैं केलें ॥ ४६ ॥
मग बदरिकाश्रमापासूनि कथन । दुःखव्यावृत्ति अति गहन ।
कानिफाभेटीपर्यंत वदून । ठाव यशस्वी म्हणतसे ॥ ४७ ॥
याचि ठायीं कानिफाभेटी । झाली मातें कृपाजेठी ।
तुमची शुद्धी तद्वागवटीं । येथेंचि लाधली महाराजा ॥ ४८ ॥
तरी हें स्थान पुण्यवान । तुमचे दाविले मज चरण ।
तरीं हें स्थान धनवंत पूर्ण । चुकलें धन मज दिधलें ॥ ४९ ॥
दुःखसरिते प्रवाहें वेष्टी । बुडतां वांचविलें देऊनि पृष्ठी ।
कीं दुःखव्याघ्राच्या आसडूनि होटीं । माये भेटी झाली असे ॥ ५० ॥
कीं तुमचा वियोग प्रळयानळ । तयांत मी पडलों होतों बाळ ।
परी जागा नोहे हा घन शीतळ । मातें झाला महाराजा ॥ ५१ ॥
कीं तुमचा वियोगकृतांतपाश । लागला होता मम कंठास ।
परी जागा नोहे हा सुधारस । मज भेटला महाराजा ॥ ५२ ॥
ऐसें म्हणोनि वारंवार । नेत्रीं लोटती अश्रुपूर ।
परम कनवाळू नाथ मच्छिंद्र । हृदयीं धरी गोरक्षा ॥ ५३ ॥
मुख कुरवाळूनि आपुले हस्तें । सच्छिष्याच अश्रु पुसीत ।
मनांत म्हणे हा भाग्यवंत । गुरुभक्त एकचि हा ॥ ५४ ॥
मग गोरक्षाचें समाधान । करुनियां मच्छिंद्रनंदन ।
मग मीननाथा कडे घेऊन । उठ वत्सा म्हणतसे ॥ ५५ ॥
पुढें मार्गीं करितां गमन । जालिंदराचें वर्तमान ।
सांगता झाला गोरक्षनंदन । श्रीमच्छिंद्राकारणें ॥ ५६ ॥
गौडबंगाल हेलापट्टण । तुमचा गुरु जालिंदर पूर्ण ।
नाथपंथी हा अनुग्रहकारण । श्रीदत्ताचा मिरवतसे ॥ ५७ ॥
तो महाराज योगभ्रष्ट । पावला आहें महाकष्ट ।
गोपीचंदें करुनि अनिष्ट । महागर्ती घातला ॥ ५८ ॥
मुळापासूनि सकल कथन । मच्छिंद्रा केलें निवेदन ।
परी नाथ मच्छिंद्र तें ऐकून । चित्तीं परम क्षोभला ॥ ५९ ॥
म्हणे ऐसा राजा आहे नष्ट । तरी आतां करीन त्याचें तळपट ।
नगरी पालथी घालीन सुघट । महीपालथा मिरवीन तो ॥ ६० ॥
ऐसें बोलोनि विक्षेप चित्तीं । पुढें मागें परमगतीं ।
एकदोन मुक्काम साधिती क्षितीं । हेलापट्टणीं पातले ॥ ६१ ॥
ग्रामानिकट ग्रामस्त भेटती । त्यांतें वृत्तांत विचारीत जाती ।
ते म्हणती कानिफा येऊनि क्षितीं । मुक्त केलें जालिंदरा ॥ ६२ ॥
राया गोपीचंदा अनुग्रह देऊनि । जगीं मिरवला अमरपणीं ।
तेणें गुरुदक्षिणा घेऊनि । तपालागीं तो गेला ॥ ६३ ॥
राया मुक्तचंदा स्थापून । राज्यपदीं राज्यासन ।
देऊनियां अभिनंदन । तोही गेला षण्मास ॥ ६४ ॥
सकळ कथामुळहूनी । मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थानीं ।
तें मच्छिंद्राचे पडतां श्रवणीं । शांतपणीं मिरवला ॥ ६५ ॥
जैसी प्रळयानळावरती । घनवृष्टीची होय व्यक्ती ।
मग सकळा उबाळा पाहूनि अती । अदृश्य होय पावक तो ॥ ६६ ॥
कीं साधक पातला असतां । कीं श्रीगुरुंचा संसर्ग होतां ।
होतांचि सिद्धकाची व्यथा । नासूनि जाय ते क्षणीं ॥ ६७ ॥
कीं तम ढिसाळ दाटल्या अवनीं । उदय होताचि वासरमणी ।
मग सकळ तप नाश पावूनी । दिशा मिरविती उजळल्या ॥ ६८ ॥
तन्न्नायें मच्छिंद्रसंताप । ग्रामस्त बोलतां झाला लोप ।
शांति करुनि मोहकंदर्प । चित्तामाजी द्रवलासे ॥ ६९ ॥
यावरी तो मच्छिंद्रनंदन । ग्रामस्थां विचारी मुख्यत्वेंकरुन ।
अधिकारी राज्यनिपुण । कोण आहे प्राज्ञिक (विद्वान) तेथें ॥ ७० ॥  
येरी म्हणती योगद्रुमा । श्रेष्ठ करणिका राजउगमा ।
मैनावती शुभानना । प्राज्ञिवंत मिरवतसे ॥ ७१ ॥
त्या मातेनें अर्थ धरुन । पुत्र मिरवला जी अमरपणें ।
तुष्ट करोनि जालिंदरमन । अमर झाली आपणही ॥ ७२ ॥
ऐसें बोलतां ग्रामस्थ युक्तीं । मनांत म्हणे मच्छिंद्र यती ।
ऐसी प्राज्ञिक आहे सती । भेटी घ्यावी तियेची ॥ ७३ ॥
ऐसिये धृती चित्तीं कल्पून । चालते झाले त्रिवर्गजन ।
ग्रामद्वारा शीघ्र येऊन । द्वाररक्षकां सांगती ॥ ७४ ॥
म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत । तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ।
ग्रामद्वारीं आहे तिष्ठत । जाऊनि सांगा सतीसी ॥ ७५ ॥   
अहो अहो द्वारपाळ । सांगा चला उतावेळ ।
मैनावती लक्षूनि सकळ । वृत्तांत तियेतें निवेदावा ॥ ७६ ॥
ऐसें द्वारपाळ ऐकून । मच्छिंद्रा करिते झाले नमन ।
म्हणती महाराजा आज्ञा प्रमाण । श्रुत करुं सतीसी ॥ ७७ ॥
म्हणती महाराजा मच्छिंद्रजती । जालिंदरसहोदर म्हणवितो क्षितीं ।
तो येवोनि ग्रामद्वाराप्रती । तिष्ठत आहे महाराजा ॥ ७८ ॥
ऐसें ऐकूनि मैनावती । म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती ।
कैसी आहे भूषणव्यक्ति । अभ्यासानभ्यास दिक्षेते ॥ ७९ ॥
येरी म्हणे जी महाराजा । कनककांती तेजःपुंजा । 
बालार्ककिरणीं विजयध्वजा । आम्हांलागीं दिसतसे ॥ ८० ॥
माय वो आम्हां दिसतो ऐसा । कीं न पावला योनिसंभवसा ।
अवतारदीक्षे स्वर्गवासा । करील जनां वाटतसे ॥ ८१ ॥
शैली कंथा लेवूनि भूषण । सिंगी सारंगी समागम ।
कुबडी फावडी करीं कवळून । उभा द्वारी असे तो ॥ ८२ ॥
आणिक एक सच्छिष्य त्यासी । संग्रहीं आहे सुखसेवेसी ।
परी तो शिष्य समान अभ्यासी । आम्हांलागीं भासतसे ॥ ८३ ॥
धृति वृत्ति दिक्षेलागुन । ज्ञानवैराग्यस्वरुपवान ।
आम्हांलागीं समसमान । गुरुशिष्य वाटती ॥ ८४ ॥
त्याचि रितीं स्वरुप अपार । तान्हुलें एक असे किशोर ।
परी त्रिवर्ग स्वरुपसागर । नक्षत्रमणी भासती ॥ ८५ ॥
ऐसें सांगता द्वाररक्षक । मंत्री पाचारिला प्रत्योदक । 
मग स्वयें घेऊनि सुखासन कटक । सामोरी जातसे युवती ते ॥ ८६ ॥
कतकासवें द्वारी येऊन । वंदिती झाली मच्छिंद्रनंदन ।
मग त्रिवर्गातें सुखासन । ओपून नेतसे मंदिरा ॥ ८७ ॥
नेताचि मंदिरा राजभवनीं । भावें बैसविला कनकासनीं ।
षोडशोपचारें पूजूनि मुनी । नम्रवाणी गौरविलें ॥ ८८ ॥
हे महाराजा तपःसविता । कोणाकडून येणें झालें आतां ।
आम्हां आळशावरी सरितां । प्रेमांबु लोटतसे ॥ ८९ ॥
कीं दरिद्र्याचे द्रव्यहरण । करुं मांदुस धांवली आपण ।
कीं चित्ता बोधी अंतःकरण । बुडतां धांवे चिंतामणि ॥ ९० ॥
कीं मृत्युसमयीं हस्तपादास । ओढितां परम दुःखक्लेशास ।
तें पाहूनियां अमरपीयूष । धांव घेत कृपेनें ॥ ९१ ॥
कीं तृषासंकटीं प्राण । तों गंगाओघ आला धांवून ।
कीं क्षुधे पेटला जठराम । पयोब्धि तों पातला ॥ ९२ ॥
तन्न्यायें अभाग्यभागीं । येथें पातलेत तुम्ही जोगी ।
परी कोणाच्या वचनप्रसंगीं । आम्हां दर्शवावा महाराजा ॥ ९३ ॥
येरी म्हणे वो माते ऐक । उपरीचरवसु माझा जनक । 
मच्छदेही देहादिक । आम्हांलागीं मिरवतसे ॥ ९४ ॥
यापरी श्रीगुरुज्ञानदृष्टी । तो अनसूयासुत शुक्तिकेपोटीं ।
तेणें कवळूनि मौळी मुष्टीं । वरदपात्रीं मिरवला ॥ ९५ ॥
मज अनुग्रह प्राप्त झाला । त्यावरी श्रीजालिंदराला ।
प्राप्त होऊनि वैराग्याला । भूषवीतसे जननीये ॥ ९६ ॥
धाकुटा बंधु गुरुभक्त । मज विराजला जालिंदरनाथ ।
परी या ग्रामी पापी अवस्थेंत । पावला हें ऐकिलें ॥ ९७ ॥
म्हणूनि उग्रता धरुनि पोटीं । लंघीत आलों महीपाठीं ।
परी उत्तम संग्रह ग्रामजेठी । समस्तांनीं सांगीतलें ॥ ९८ ॥
तेणेंकरुनि कोपकंदर्प । झाला जननीं सर्व लोप । 
तरी तूं धन्य ज्ञानदीप । महीवरी अससी वो ॥ ९९ ॥
आपुल्या हितासी गृहीं आणून । शेवटीं परम प्रज्ञेकरुन ।
तुवां मिळविला स्वानंदघन । धन्य धन्य अससी तूं  ॥ १०० ॥

Shri Navanath BhaktiSar Adhyay 22 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बावीसावा (२२)


Custom Search

No comments: