Sunday, March 20, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 33 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेहतीसावा (३३) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 33 
Manik a farmer offered Bhiksha to Goraksha when he was very hungry. Manik also asked him to ask anything more from him. Goraksha knowing Manik's future and to do good to him, asked him not to do anything comes in his mind which was agreed by Manik. When Manik thought to go into the village to eat something, he immediately remembered what he had agreed and stood into the farm eating the leaves coming to him by the wind and started to chant God's name. Goraksha reached to Badrikedar and took Chourangi who had completed his 12 years tapas, with him to go to king Shashangar, Chourangi's father at Koudinyapur. Chourangi told to the king how his step mother Bhujavanti had behaved with him and miss guided the king. King was very angry and asked Bhujavati to leave the palace. Then Goraksha and Chourangi came to Shiva temple at Prayag where lifeless body of Machchhindra was kept in the cave. Wife of the pujari told him how Queen Revati had destroyed the body. Goraksha told Chourangi to protect his body which he was leaving and going for the search of Machchhindra's body. He reached to Kailas where he found Machchhindra's body. There was a big war between Virbhadra who was God Shiva's son and Goraksha. Virbhadra was defeated. God Shiva asked Chanmunda's to give the body of Machchhindra to Goraksha. Now in the next 34th Adhyay what happens will be told to us by Dhundisut Malu from Narahari Family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेहतीसावा (३३) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी जगदुद्धारा । कनकवर्णा नरहरि चतुरा ।
ऐक्यत्वकारणें हरिहरां । शक्य एक तुझेंचि ॥ १ ॥
तरी आतां कृपा करुनी । ग्रंथ सुचवीं सुढाळ रत्नीं ।
शुभ योगीं श्राव्य भाषणीं । स्वीकार करीं महाराजा ॥ २ ॥
मागिले अध्यायीं मच्छिंद्रनंदन । त्रिविक्रमदेहीं संचरुन ।
गोरक्ष तीर्थस्नानाकारणें । धाडिलासे मच्छिंद्रे ॥ ३ ॥
यापरी गोरक्षनाथ । महीं भ्रमतां नाना तीर्थ ।
तो गोदातटीं अकस्मात । येऊनियां पोहोंचला ॥ ४ ॥
तों गोदातटीं भामानगर । तया अरण्यांत गौरकुमर ।
परम झाला क्षुधातुर । जठरानलेंकरिनियां ॥ ५ ॥
ग्राम पाहतां तों अरण्यांत । उदक एक योजन न मिळे तेथ ।
तया स्थानीं क्षुधाक्रांत । अनल जैसा पेटला ॥ ६ ॥
मार्गीं चालतां दिशा लक्षीत । तों शेत देखिलें अकस्मात ।
कृषिकर्म प्रांजळवंत । पाहूनि सुमार धरियेला ॥ ७ ॥
तंव तो कृषीवल माणीकनामी । वय दहा वर्षें देहधर्मीं ।
माध्यान्हसमय साधूनी । भोजनांतें बैसला ॥ ८ ॥
पात्र घेतलें पुढें वाढून । कवळ करावा जों मुखीं अर्पण ।
तों अकस्मात गौरनंदन । आदेश शब्द गाजवी ॥ ९ ॥
तंव तो माणीक कृषी शेतीं । ऐकूनि आदेश शब्द प्रती ।
योजिला कवळ ठेवूनि हाती । प्रेमें नमीत तयातें ॥ १० ॥
म्हणे महाराजा तुम्ही कोण । किअर्थ घेतलें आडरान ।
येरु म्हणे मी तपोघन । क्षुधानळीं पेटलों ॥ ११ ॥
परम झालों तृषाक्रांत । म्हणोनि होऊनि आलों अतीत ।
तरी सन्निध अन्न असेल तूतें । भिक्षा आम्हां ओपावी ॥ १२ ॥
ऐशी ऐकतां तयाची वाणी । म्हणे महाराजा योगेंद्रमुनी ।
निधान आहे मनोधर्मीं । पात्र वाढिलें भक्षावें ॥ १३ ॥
मग उठोनि त्याचि वेळीं । शीघ्र ओपी पत्रावळीं ।
आणि मृत्कुंभ भरोनि जवळी । शीघ्र करी पुढारां ॥ १४ ॥
मग तो गोरक्ष तपोघन । हस्तपाद प्रक्षाळून ।
अन्नपात्र पुढें घेऊन । जठराहुती घेतसे ॥ १५ ॥
पूर्ण झाल्या जठराहुती । मग सहजचि तुष्ट झाला चित्तीं ।
कीं रुखा (झाडाला) होतां जलप्राप्ती । लवणाकार पावतसे ॥ १६ ॥
की दारिद्र्याप्रती देता धन । मग कां न पावे तुष्ट मन ।
कीं यथेच्छ मेळविता झाल्याकारण । तो शरीरीं मिरवेना ॥ १७ ॥
तन्न्याय कृषिनरेंद्रोत्तमा । घडूनि आले तुष्टमहिमा ।
मग प्रसन्न होऊनि चित्तद्रुमा । वरदफळा दावी तो ॥ १८ ॥
म्हणे कृषिका कवण कामीं । मिरवला हो देहधर्मीं ।
येरु ऐकूनि म्हणे स्वामी । आतां कासया पुसतां हो ॥ १९ ॥
तरी महाराजा आटाआटी । करावी प्रथम कार्यासाठीं ।
कार्य झालिया व्यर्थ चावटी । अन्यासी कासया शिणवावें ॥ २० ॥
तरी आतां कार्य झालें । पुढें योजीं शीघ्र पाउलें ।
गोरक्ष म्हणे बोलशी बोल । सत्य असती तुझे बा ॥ २१ ॥
परी तुवां मातें दिधलें अन्न । तेणें मम चित्त झालें प्रसन्न ।
तरी तव देहीं किंचित पण । सत्य असेल वद मातें ॥ २२ ॥
जे जे कामना असेल तूतें । ती पूर्ण पावशी फळसहितें ।
येरु ऐकूनि कृषी त्यातें । ऐसें उत्तर देतसे ॥ २३ ॥
म्हणे महाराजा महीपाठीं । तुम्हीच हिंडतां भिकेसाठीं । 
ते तुम्ही मोह धरुनि पोटीं । मातें काय द्याल जी ॥ २४ ॥
भणंगापाशीं भणंग गेला । तो काय देऊनि तृप्त झाला ।
खडक उदक पान्हा बोला । कदाकाळीं दिसेना ॥ २५ ॥
तुम्ही तेवीं हिंडता अन्नासाठीं । आम्हां काय देणार जेठी ।
नाथ म्हणे इच्छातुष्टीं । आतां तुझी करीन बा ॥ २६ ॥
येरी म्हणे पुरें बोलणें । काय आहे तुम्हां स्वाधीन ।
तरी आणिक तुजकारण । लागत असेल तें माग ॥ २७ ॥
नाथ म्हणे रे एक दान । तुवां दिधल्या झालों प्रसन्न ।
तरी कांहींतरी मजपासून । मागून घेईं कृषिराया ॥ २८ ॥
येरु म्हणे उगला ऐस । तुवां काय द्यावें आम्हांस । 
तरी कांहीं न मागूं सुरस । पंथ आपुला क्रमीं कां ॥ २९ ॥
ऐसें बोलतां माणीकनामी । गोरक्ष विचारी आपुले मनीं ।
आडबंग असती कृषिधर्मीं । सदा विपिनीं बैसूनियां ॥ ३० ॥
तरी हा मातें म्हणतों माग । परी त्याच्याचि हितार्थ करावा लाग ।
ऐसें विचारोनि मनोवेगें । तयालागीं बोलतसे ॥ ३१ ॥
म्हणे कृषिराया ऐक वचन । तूं आम्हांसी म्हणशील देऊं देणें ।
तरी मागें सरस वचन । निश्र्चयें करुनियां बोलावें ॥ ३२ ॥
येरु म्हणे तापसा ऐक । मातें दिससी महामूर्ख ।
जो देणार आपुलें आत्मसुख । तो मागें सरणार नाहीं कीं ॥ ३३ ॥
अरे चंद्र असे शीतळपणीं । तरी तो वर्षेल दाहकपणीं ।
परी तो ढळणार नाहीं प्राणी । मागें पाऊइल कासया ॥ ३४ ॥
सविताराज तेजोदीप्ती । तोही अंधकारीं करील वस्ती ।
परी उदार तो औदर्याप्रती । मागें पाऊल सारीना ॥ ३५ ॥
मही गेलिया रसातळीं । परी औदार्यप्राप्ती महाबळी ।
त्या कृपणत्व कदाकाळीं । अंगालागीं स्पर्शेना ॥ ३६ ॥
तरी कोणतें मागणें तूतें । मागूनि घेइंजे त्वरिते ।
मी बोलतो निश्र्चयातें । निश्चय माझा पाहीं कां ॥ ३७ ॥
ऐशी बोलतां विपुल वार्ता । गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता ।
तरी मनाचें करणें मागूं आतां । कैसा सांभाळील पाहूं तो ॥ ३८ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । म्हणे मज दावीं कां विपिनपती ।
जें जें आवडेल तुझे चित्तीं । तें तूं न करीं महाराजा ॥ ३९ ॥
कांहीं एक इच्छील तुझें मन । तें तूं न करणें हेंचि मागणें ।
इतुकें देऊनि तुष्टपण । बोळवीं कां कृषिराजा ॥ ४० ॥      
ऐशी वदतां तयाची वाणी । अवश्य म्हणे कृषिकर्मी ।
हा धर्म आतां आपुलें धर्मीं । अर्कअवधीं रक्षीन गा ॥ ४१ ॥
ऐशी तैशी देऊनि भाक । तुष्ट केलें शरीरास ।
असो गोरक्ष त्या विपिनास । सांडूनियां चालिला ॥ ४२ ॥
माणीकनामी कृषी शेतांत । मुक्त करिता झाला औत ।
येठणें (नांगर जुंपण्याचे शेतीचें अवजार) बांधूनि समस्त । भार सकळ वाहतसे ॥ ४३ ॥
वृषभा मागें दिधलें लावून । मौळीं घेत येठण उचलून ।
मनांत म्हणे ग्रामासी जाऊन । क्षुधाबल घालावावें ॥ ४४ ॥
इतुकी मनीं योजना होतां । स्मरण झालें गोरक्षनाथा । ौ 
पुत्रकल्याण आणितां चित्ता । मनाचें करणें उल्लंघावें ॥ ४५ ॥
मन इच्छित असे घरीं जावया । तरी आपण न जावें तया ठाया ।
मग तेथेंचि उभा राहूनियां । गाढ निद्रा करितसे ॥ ४६ ॥
मौळीं येठणाचा भार । घेऊनि उभा महीवर ।
नेत्र झांकूनि चिंतापर । हरिनामीं योजीतसे ॥ ४७ ॥
मन इच्छा हालवूं अंग । परी न हाले धडभाग ।
स्थिर होऊनि संचरले ओघ । वचनार्थ संपादी ॥ ४८ ॥
तरुपर्ण जे येती उडोन । तेचि करीतसे भक्षण ।
मनीं येतां सांठवण । तेही त्याग पर्णींचे करीतसे ॥ ४९ ॥
मग सहज स्थितीं वायुलहर । अकस्मात येतसे मुखावर ।
तितुकेंचि प्राशन आहारपण । अमल मन होतसे ॥ ५० ॥
तेणें कृश झालें शरीर । सकळ आटूनि गेलें रुधिर ।
मांस म्हणाया तिळभर । स्वप्नामाजी दिसेना ॥ ५१ ॥
त्वचा अस्थि झाल्या एक । उभा राहिला कष्टदायक ।
येरीकडे तपोबाळक । बद्रिकाश्रमीं पातला ॥ ५२ ॥
बद्रिकेदार नमूनि त्वरित । पाहूं चालिला चौरंगीनाथ ।
तंव गुहागृहीं शरीरावरती । वाळवीवारुळ विराजलें ॥ ५३ ॥
मुखीं तितुकी नामावळी । आणि नेत्रचंद्रीं असे शिळा भारी ।
असे स्थित तया स्थळीं । गोरक्षनाथ प्रकटला ॥ ५४ ॥
त्वरित द्वारची शिळा काढून । पाहे तयाचे शरीराकारणें ।
तों वारुळ गेलें वेष्टून । सर्व अंगी तयाच्या ॥ ५५ ॥
शिळाचंद्रीं न हाले पाती । रामशब्दे वलगे उक्ती ।
तें पाहूनियां गोरक्षजती । परम चित्तीं हळहळला ॥ ५६ ॥
मग शरीराचें वारुळ काढून । पाहे तयाचे शरीराकारण ।
तों हस्तपाद लवेंकरुन । तपोबळें आलें ते ॥ ५७ ॥         
मग सावध करुनि तयातें । म्हणे पाहें मी आलों गोरक्षनाथ ।
शीघ्र कवळूनि तयाचा हस्त । बाह्यात्कारीं आणिले ॥ ५८ ॥
मग कृपें करितां अवलोकन । शक्ती आली दारुण ।
मग उठूनि वंदी गोरक्षचरण । म्हणे सनाथ झालों असें मी ॥ ५९ ॥
यापरी तयासी आलिंगूनि नाथ । म्हणे बा कैसा झाला चरितार्थ ।
येरी म्हणे मज माहीत । नाहीं चामुंडे विचारी ॥ ६० ॥
मग विचारुनि चामुंडेसी । वृत्तान्त पुसे चरितार्थासी ।
येरु म्हणे आम्ही फळांसी । देत होतो महाराजा ॥ ६१ ॥
परी चौरंगी न करुनि भक्षण । बैसला होता शिळा लक्षून ।
मग फळेंची पर्वताप्रमाण । गोरक्षातें दाविली ॥ ६२ ॥
फळनगा पाहोनि तपोजेठी । विस्मय करी आपुल्या पोटीं ।
म्हणे धन्य याची तपोराहाटी । ब्रह्मादिकां अतर्क्य ॥ ६३ ॥
परम चित्तीं कृपा वेष्टुनी । मौळीं ठेविला वरदपाणी ।
अनुग्रहचोज पुन्हां दावुनी । ब्रह्मसनातन केला असे ॥ ६४ ॥
पुढें चौरंगीसी घेऊन । बद्रिकेदारालया आणून ।
जागृत करुनि उमारमण । चौरंगीतें भेटविला ॥ ६५ ॥
मग तेथें राहूनि षण्मास । सकळ करविला विद्याभ्यास । 
अस्त्र शस्त्र बहुवस । प्रवीण झाला महाराजा ॥ ६६ ॥              
मग सकळ देवांतें पाचारुन । तपोबळे केले सघन ।
मग सकळ दैवतें तुष्ट करुन । वरदप्रज्ञा आराधिलें ॥ ६७ ॥
सकळ देव वर देऊन । पहाते झाले आपुलें स्थान ।
येरीकडे बद्रिकेदार नमून । चौरंगीसह निघाला ॥ ६८ ॥
त्वरें येऊनि वैदर्भदेशांत । चौरंगीतें कौडण्यपुर दावीत ।
म्हणे बा रे तव माता तात । भेट घेईं तयांची ॥ ६९ ॥
भेटशी तरी कैसा त्यांते । जगीं जाऊनि अति ख्यात । 
हस्तपादांचें मुंडणखंडणनिमित्त । उत्तरा सूड घेईजे ॥ ७० ॥
रायें छेदिलें तव हस्तपादांसी । परी घुसघुसी आहे मम मानसी ।
तरी आपुला प्रतापसंगम रायासी । निजदृष्टीं दावीं कां ॥ ७१ ॥
अवश्य म्हणे चौरंगीनाथ । भस्मचिमुटी कचळुनि हस्त ।
रायाचें लक्षुनि बागाईत । वातास्त्रासी सोडीतसे ॥ ७२ ॥
तंव तेथींचे वनकर । सहा शत एक सहस्त्र ।
वातचक्रें उडवूनि अंबर । दाविता झाला तयांसी ॥ ७३ ॥
पुन्हां वातअस्त्र घेत काढून । तंव ते उतरती महीकारण ।
किती पडले मूर्च्छना वेष्टून । कितीएक ग्रामीं पळाले ॥ ७४ ॥
ते येऊनि राजांगणीं । सांगते झाले विपरीत करणी ।
कोणी केली न दिसे नयनीं । आश्र्चर्य बहु होतसे ॥ ७५ ॥
मग भृत्यांतें पाचारुन । पुसूनि त्यांतें वर्तमान । 
कोणी केलें आला कोण । शोधालागीं धाडीतसे ॥ ७६ ॥
तो येरीकडे चौरंगीसहित । पाणवथीं बैसला गोरक्षनाथ ।
हेर पाहूनि त्वरित । रायापाशीं पातले ॥ ७७ ॥
म्हणती महाराजा पाणवथ्यासी । बैसले आहेत दोन तापसी ।
तीव्रतेजी कानफाटवेषी । विद्यार्णव दिसताती ॥ ७८ ॥
ऐसें ऐकूनि राजेश्र्वर । स्वमनीं आपुला करी विचार ।
आले असती गोरक्ष मच्छिंद्र । पुत्रदुःखें द्वेषानें ॥ ७९ ॥
तरी आतां त्वरेंकरुन । तयांसी जावें शरण ।
नातरी ग्रामासी पालथें करुन । प्राणांप्रती हरितील ॥ ८० ॥
ऐसा विचार करुनि मानसी । राव सामोरा ये समारंभेसी ।
गज वाजी शिबिका रथांसीं । कटकासह येतसे ॥ ८१ ॥
ग्रामाबाहेर कटक येतां । गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा ।
आपुला प्रताप आतां । निजदृष्टीं दावीं कां ॥ ८२ ॥
ऐशी ऐकतां गोरक्षगोष्टी । पुन्हां कवळी भस्मचिमुटी । 
वातास्त्र जल्पूनि पोटीं । चमूवरी प्रेरीतसे ॥ ८३ ॥
मग तें वातास्त्र अति तीक्ष्ण । चमूसह राया दाविलें गगन ।
रथ गज वाजी शिबिकासन । वातास्त्रें पाडिलीं ॥ ८४ ॥
तेणेंकरुनि चमू समस्त । गगनपंथे आरंबळत ।
म्हणती हे महाराजा नाथ । शरणागता तारावें ॥ ८५ ॥
सकळ स्तविती दीनवाणी । ते शब्द ऐकोनि तपोज्ञानी ।
चौरंगीसी म्हणे घे उतरोनि । चमूसहित रायातें ॥ ८६ ॥
मग तो कुशल प्रज्ञावंत । पर्वतास्त्र असे आड करीत ।
मग सकळ आटूनि गेला वात । चमू मिरवली नगमौळीं ॥ ८७ ॥
मग उभा करोनि आपुला कर । म्हणे उतरुनि यावें चमू समग्र ।
मग रायासह कटकभार । उतरले तळवटीं ॥ ८८ ॥
मग समीप येतां शशांगर । चौरंगीसी बोलिला गौरकुमर ।
पितयासी करुन नमस्कार । तुष्ट चित्तीं मिरवीं कां ॥ ८९ ॥     
ऐसें ऐकतां गुरुनंदन । धांवूनि धरिले तातचरण ।
म्हणे महाराजा मी तव नंदन । निजदृष्टीं देखें मज ॥ ९० ॥
ऐसें बोलता चौरंगीनाथ । रायें धांवूनि धरिलें हृदयांत ।
मग परम प्रीती गोरक्षातें । चरणीं भाळ अर्पीतसे ॥ ९१ ॥
मग गोरक्षही धरुनि हृदयीं । म्हणे राया याचा प्रताप पाहीं ।
येरी म्हणे तुजसमान आई । भेटल्या न्यून कायसें ॥ ९२ ॥
याऊपरी तैसें चौरंगीनाथ । वज्रास्त्र निर्माण करीत ।
चूर्ण करुनि महापर्वत । अदृश्यपंथीं मिरवीतसे ॥ ९३ ॥
याउपरी शशांगर । गोरक्षासी म्हणे चतुर । 
आरोहण करुनि शिबिकेवर । राजसदनीं चला जी ॥ ९४ ॥   
याउपरी बोलें चौरंगीनाथ । आम्ही न येऊं तव गृहांत । 
सापत्न मातुश्रीचे कुडें मनांत । हस्तपाद छेदिले ॥ ९५ ॥
मग मूळापासूनि सकळ वृत्तान्त । रायालागीं केला श्रुत ।
राव कोपोदधींत । उचंबळला आगळा ॥ ९६ ॥
सेवकालागीं आज्ञा करीत । ताडीत आणा राणी येथ ।
तें ऐकूनि चौरंगीनाथ । काय परी वदतसे ॥ ९७ ॥
म्हणे ताता आपुलें वचन । हेचि शिक्षा आली घडून ।
यावरी ताता आपुलें कीर्तीनें । ब्रह्मांड भरेल महाराजा ॥ ९८ ॥           
तरी ऐसें न करीं ताता । सदनींच शिक्षा करावी प्रीता ।
मग शिबिकासनीं बैसवूनि तत्त्वतां । राजसदना पातले ॥ ९९ ॥
राव जातां मंदिरांत । पादत्राण घेऊनि हातांत । 
ताडन करुनि पत्नीतें । म्हणे जाई येथूनी ॥ १०० ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 33  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेहतीसावा (३३) 


Custom Search

No comments: