Saturday, March 12, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 29 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणतीसावा (२९) भाग १/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 29 
God Datta told Goraksha to meet Bhartari and follow the nathpanth. Earlier Bhartari had agreed to do so after 12 years since God Datta had given him Diksha. Goraksha met Bhartari and shown him how his sorrow of losing his wife Pingla was destroying his life. With the example of a bottle he showed Bhartari that everything including body is vanish able thing. Further he made hundreds of Pingla alive by using his Mantra-Vidya. Bhartari talked with Pingla. She also told her that she was now enjoying Moksha. Nothing is permanent in this world. Bhartari realised and went to Girnar to meet God Datta with Goraksha for further sadhana of Natha-Pantha. What happened next would be told by Dhundisut Malu from Narahari Family in the 30th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणतीसावा (२९) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
रुक्मिणीवरा कमलकांता । चाणूरमर्दना वसुदेवसुता ।
कंसारी तूं जगत्राता । वासुदेव जगदीशा ॥ १ ॥
शेषशायी हलधरभ्राता । भावप्रिया सुरदर्शनदर्शिता ।
द्रौपदीलज्जारक्षणकर्ता । पाठिराखा मिरविसी ॥ २ ॥
जैसा पांडवांचा पा १ठिराखा । तैसा मिरविसी मम दोंदिका ।
भक्तिसारग्रंथकौतुका । वाग्वरदा म्हणविसी ॥ ३ ॥
मागिले अध्यायीं विरहस्थिती । लाधली गाढत्वें भर्तरीप्रती ।
पिंगलेकरितां स्मशानक्षितीं । पू्र्ण तप आचरला ॥ ४ ॥
तया क्लेशाचे उद्देशीं । मित्रावरुणी दत्तापाशीं ।
श्रुत करुनि स्वस्थानासी । येऊनियां पोहोंचला ॥ ५ ॥
इतुकी कथा सिंहावलोकनीं । चित्तीं धरावी श्रोतेजनीं ।
यापरी पुढें ग्रंथमांडणीं । सिद्ध अवधानीं असावें ॥ ६ ॥
असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथ । ठेवूनि गोरक्ष करावया तीर्थ ।
महीलागीं भ्रमत । गिरनाराप्रती पातला ॥ ७ ॥
तेथे भेटोनि दत्तात्रेयासी । भावे नमिलें प्रेमराशीं । 
श्रीदत्तें धरोनि हृदयासी । आनंदानें उचंबळला ॥ ८ ॥
श्रीकरपद्दें मुखमंडन । गोरक्षाचें कुरवाळूनि वदन ।तरी
निकट बैसविला हस्त धरोन । अलाई बलाई घेतसे ॥ ९ ॥
मोहितवाणीं पुसतसे त्यातें । म्हणे कोठें रे मच्छिंद्रनाथ । 
तूं सोडोनि निरपेक्ष त्याते । महीलागीं भ्रमतोसी ॥ १० ॥
येरु सांगे पुन्हा नमोन । गर्भाद्रिपर्वतीं मच्छिंद्रनंदन ।
राहिलासे स्वसुखेंकरुन । जपजाप्यातें योजूनियां ॥ ११ ॥
मुहूर्तपूर्ण स्वसुखासी । लाविलें असे तीर्थस्थानासी ।
मग मी नानातीर्थ उद्देशीं । करीत आलों परियेसा ॥ १२ ॥
ऐसा वदोनि वृत्तांत । याउपरी बोले अत्रिसुत ।
वत्सा कार्य लागलें मातें । त्या कार्यातें संपादीं ॥ १३ ॥
तरी म्हणसी कार्य कवण । भर्तरी मम अनुग्रही नंदन ।
तो स्वकांतेकरिता स्मशान । द्वादश संवत्सर सेवीतसे ॥ १४ ॥
अन्नोदकाचा त्याग करुन । सेवोनि आहे तृणपर्ण ।
कांता कांता चिंतन करुन । द्वादश वर्षें बैसला ॥ १५ ॥
तरी तुवां जावोनि तेथें । सावध करीं युक्तीप्रयुक्तीं ।
सकळ दावीं अशाश्र्वत । आपुलें पंथीं मिरवावें ॥ १६ ॥
त्यासी मीं अनुग्रह जेव्हां दिधला । तेव्हांचि गुंतविला संकल्पाला ।
कीं सोडूनि वैभवपंथाला । नाथपंथीं मिरवेन मी ॥ १७ ॥
तरी तया बोलासी जाण । दिवस लोटूनि गेले पूर्ण ।
मग जन्मापासूनि सकळ कथन । भर्तरीच्या सांगीतलें ॥ १८ ॥
समुच्चयगोष्ट ऐकूनि कथन । मान तुकावी गोरक्षनंदन ।
म्हणे महाराजा तव कृपेनें । कार्य सत्य करीन हें ॥ १९ ॥ 
तंव आज्ञा यापरी मातें असतां । मग भर्तरीलोहातें आणीन कनकता ।
ही अशक्य नसे मातें वार्ता । अर्थ घडला सहजचि ॥ २० ॥
हे महाराजा तूं कृपाघन । वर्षलासी मम देहाकारण । 
तैं भर्तरीतरुतें ज्ञानकण । अनायासें करणेंचि ॥ २१ ॥
तव कृपा जवळी असतां । मग भर्तरीक्षुधेची कामवार्ता । 
ही अशक्य नसे मातें करीतां । तृप्त सिद्धीतें भिनवाया ॥ २२ ॥
कीं तव कामकल्पतरु । मम चित्तांगणीं पावला विस्तारु ।
येथें भर्तरीहीनत्वाविचारु । दरिद्रातें उरेना ॥ २३ ॥
तरी आतां बोलतों प्रमाण । कार्य आपुलें करुनि देईन ।
ऐसें म्हणोनि वंदोनि चरण । शीघ्रगती निघाला ॥ २४ ॥
व्यानअस्त्र जपोनि होटीं । भाळीं चर्चिली भस्मचिमुटी ।     
मग व्यानमंत्रे महीपाठीं । गमन करुं निघाला ॥ २५ ॥
लवता डोळ्याचें पातें । क्षणें आला अवंतिकेप्रत ।
पन्नास योजनें निमिषांत क्षितींत । लंघोनियां पातला ॥ २६ ॥
तों गोरक्ष येतां स्मशानानिकट । दुरोनि पाहे भर्तरी नीट ।
तों सर्वांग दिसे अति कृशवट । अस्थिगत प्राण देखिला ॥ २७ ॥
मुखीं तितुकीच सहजध्वनी । म्हणे हे राम बरवी केली करणी ।
आम्हां उभयतांची तुटी करोनी । पिंगला नेली जवळिके ॥ २८ ॥
ऐसी सहजध्वनि ऐकोन । पाहूनि तयाचे कृशपण ।
परम चित्तीं हळहळोन । चकचकाव मानीतसे ॥ २९ ॥
चित्तीं म्हणे अहा कठिण । राव आचरे परम निर्वाण ।
अस्थिमय राहिला प्राण । त्वचा व्यक्त होऊनियां ॥ ३० ॥
तरी ऐसा विरह जयासी । बाणलाहे पूर्ण मानसीं ।
तों वरपांगीं वाग्वरासी । कदाकाळीं मानीना ॥ ३१ ॥
तरी यातें आम्ही जें बोलूं । तें तें सकळ होय फोलूं ।
जैसा क्षुधेला वेळूं । पळवा तेथें मिरवेना ॥ ३२ ॥                
जैसा खापरासी परीस भेटे । व्यर्थ होय यत्नपाठ ।
तेवीं बोधितां बोध अचाट । व्यर्थपणीं मिरवेल ॥ ३३ ॥
कीं हिमगतरु अपार विपिनीं । त्यांत मैलागरु स्थापिला वनीं ।
तयासुगंधलिप्त दुर्गंध वनीं । कदाकाळीं चालेना ॥ ३४ ॥   
कीं शर्करेचे आळीपाळीं । शकावणाच्या (कडू वृंदावनाच्या) वेष्टिल्या वेली ।
परी त्या कटुत्वपणा सकळीं । मधुरपणा मिरवेना ॥ ३५ ॥
कीं चतुराननाचे हस्तकमळीं । जन्मभर स्थापिलें दरिद्र भाळीं ।
तें व्यवसायेंकरुनि नव्हाळी । कदाकाळीं चालेना ॥ ३६ ॥
तरी आतां विचार येतां । योजावा कांहीं बोधरहिता ।
ज्यातें जैसी कामना स्थिति । तैसी स्थिति वर्तावी ॥ ३७ ॥    
कीं श्र्वपुच्छा चक्रवेढा । नीट होण्या यत्न पाडा ।
तेवीं राव झाला वेडा । शब्दबोध चालेना ॥ ३८ ॥
जैसा जो तैसाचि होतां स्थित । मग संतोष मिरवे चित्त ।
संतोष मिरवल्या कार्य प्राप्त । घडोनि येतें सकळिकां ॥ ३९ ॥
पहा राम शत्रु दानवां । परी बिभिषण मिरवला भिन्नभावा । 
तेणेंकरुनि स्ववैभवा । भंगूं दिलें नाहींच कीं ॥ ४० ॥
कीं बळिया रायाचें जिणें । त्यासी मिरवला तो वामन ।
मातृशत्रु फरशधर होऊन । तातासमान वहिवटला ॥ ४१ ॥
तन्न्यायेंकरुनि येथें । रायासी ओपावें सर्व हित ।
संतोष मिरवोनि अत्रिसुता । कीर्तिध्वज लावावा ॥ ४२ ॥
मग जाऊनि अवंतिकेंत । कुल्लाळगृहीं संचार करीत ।
एक गाडगें आणूनि त्यातें । बाटली नाम ठेविलें ॥ ४३ ॥
रंग चित्रविचित्र । देऊनि रोगणीं केलें पवित्र ।
मग तें चमकपणीं पात्र । तेजालागीं दर्शवी ॥ ४४ ॥
परी अंतरी पात्र कच्चेपणीं । वरी रंग दावी लखलखोनी ।
जेवीं वाढीव ब्रह्मज्ञानीं । परी अंतरीं हिंगो (अगदी टाकाऊ) ॥ ४५ ॥
बोलतां ज्ञानी विशेष । कीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपास । 
ऐसें भासलें तरी ओंफस । परी अंतरीं हिंगो ॥ ४६ ॥
नव तें मडकें कच्चेपणीं । वरी सुढाळ दिसे रंगप्रकरणीं ।
असो गोरक्षनाथ तें घेऊनी । स्मशानवाटिके पोहोंचला ॥ ४७ ॥
भर्तरीजवळी येतां । दृष्टीसन्मुख तत्त्वतां । 
ठेंचेचें निमित्त करुनि नाथ । भूमीलागीं पडतसे ॥ ४८ ॥
अंग धरणीं देत टाकून । सोंग दावी मूर्च्छापण ।
त्या संधींत बाटली कवळून । बाटलीलागीं न्याहाळी ॥ ४९ ॥
असो बाटली गेली फुटोन । मग सोंग मूर्च्छेचें सांवरोन । 
भंवते पाहे विलोकून । बाटली झाली शतचूर्ण ॥ ५० ॥
तंव ती देखिली शतचूर्ण । मग उठता झाला अहा म्हणोन ।
म्हणे माझी माय बहिण । बाटले कैसी फुटलीस तूं ॥ ५१ ॥
सकळ मेळवूनि तिचें खापर । शोक करीतसे वारंवार । 
ऊर्द्वशब्दें गहिंवर । लोकांमाजी दाखवी ॥ ५२ ॥
म्हणे अहा माझी बाटली । दैवें कैसी फुटोनि गेली ।
आतां ती माझी परम माउली । कोणे रानीं धुंडाळूं ॥ ५३ ॥
अहा माय गेलीस सोडोन । आतां तुजसाठीं वेंचीन प्राण ।
अहा विधात्या कैसें घडोन । आणिलें तुवां या ठायीं ॥ ५४ ॥          
अहा माझी माय बहिण । कैसी गेलीस सोडोनी ।
दाही दिशा मजलागोनी । ओस करोनि गेलीस ॥ ५५ ॥
माय गे माय या ठायीं । तूं वांचसी असतीस आपुले देहीं ।
मी पावलों असतों मृत्युप्रवाहीं । त्यांत कल्याण मानितों ॥ ५६ ॥
ऐसे शब्द रायें ऐकोन । हास्य करी गदगदोन ।
चित्तीं म्हणे पावलिया मरण । मडक्यासी काय मग करितां ॥ ५७ ॥
ऐसी अंदेशा आणोनि चित्तीं । हास्य वारंवार करी नृपती ।
येरीकडे गोरक्ष क्षितीं । आरंबळे अट्टहासें ॥ ५८ ॥
धरणीं टाकोनि शरीर । हृदय पिटी उभय करीं ।
अहा बाटली वागुत्तरीं । ऐसें म्हणोनि आरंबळे ॥ ५९ ॥
म्हणे तूं गेलीस माय बहिणी । परी माझें आटलें सुदैवपाणी ।
अहा माझा वासरमणी । अस्ताचळा गेलासे ॥ ६० ॥
अहा बाटली माझें धन । कोणें दुर्जनें नेलें हिरावोन ।
अहा बाटले तुझें वदन । एकदां दावीं मजलागीं ॥ ६१ ॥
अहा बाटली परम धूर्जटी । कोणीं हिरावली मम अंधाची काठी ।
ऐसें म्हणतसे वाग्वटीं । माय वदन दावीं गे ॥ ६२ ॥
ऐसें म्हणोनि दीर्घरुदन । करीत आहे अट्टहासेंकरोन । 
परी राव भर्तरी तें पाहून । चित्तामाजी चाकाटे (आश्र्चर्य करी) ॥ ६३ ॥
अहा पिंगला हा पिंगला । ऐसा घोष करीत बैसला । 
परी तें पाहूनि विसरला । मनीं आश्र्चर्य बहु मानी ॥ ६४ ॥
म्हणे वेंचितां दमडी अडका । तयासाठीं धरुनि आवांका ।
नाशवंत जाणे सर्व निका । शोक केवीं करीतसे ॥ ६५ ॥
ऐसें जल्पूनि चित्तीं । निवांत बैसला तये क्षितीं ।
परी हुडहुडी तरुफलाप्रती । शांतपणें राहीना ॥ ६६ ॥
सुशब्दवाक्या अमृतपर । सिंचिता झाला वागुत्तर । 
म्हणे योगिया कां चिंतातुर । शोक करिसी हें सांग ॥ ६७ ॥
अरे वेंचिता सापिका कवडी । मडकें येईल पुन्हां आवडी ।
तयांसाठीं शोकपरवडी । करिसी काय हे मूर्खा ॥ ६८ ॥
ऐसें उत्तरद्रुमाचें फळ । अर्थीं ओपितां नृपाळ ।
यावरी गोरक्षबाळ । बोलता झाला तयातें ॥ ६९ ॥
म्हणे महाराजा नृपाळा । तूं शोक करिसी कवण मेळा ।
तरी दुःखाब्धिशोकजाळा । प्रचीति पाहे आपुली ॥ ७० ॥
तरी अहा पांथस्थ तूं प्रकाम । कंठी लागला जगाचा उगम ।
तरी त्या उभवोनि अनर्थधाम । सुख कैसें नांदेल ॥ ७१ ॥    
तरी आपणावरुनि नृपती । घ्यावी जगाची अर्थप्रचीती ।
माझी बाटली फुटल्या क्षितीं । दुःख जाणें मी एक ॥ ७२ ॥
राव ऐकूनि वागुत्तरा । पुन्हां म्हणतसे ऐकिंजे नरा ।
मम दुःखाचा दृष्टांत खरा । प्रचीतिरुपीं धरिला त्वां ॥ ७३ ॥       
परी माझी पिंगला राणी । मान पावली जेवीं सौदामिनी ।
हरपली जैसी सौदामिनी । परतोनि कैसी प्राप्त होय ॥ ७४ ॥
शतानुशत मडकीं मिळत । प्राप्त करुनि देईन क्षणांत । 
पिंगलेसमान स्त्रीरत्न । कैंचें दुसरे मिळेल ॥ ७५ ॥
यावरी गोरक्ष बोले वचन । तुझ्या पिंगला लक्षावधि जाण ।
प्राप्त करीन एक क्षण । परी ऐसी बाटली मिळेना ॥ ७६ ॥
ऐसें ऐकूनि नराधिप । म्हणे पिंगलेचे स्वरुप । 
गुनवती गंभीर प्रदीप । लक्षावधि दाविसी ॥ ७७ ॥
तरी लक्षावधि पिंगला मातें । आतांचि दाखविं सद्गुरुभरिते ।
तूतें बाटल्या शतानुशतें । सिद्ध करितों या ठाया ॥ ७८ ॥
तरी तुझा चमत्कारु । दावीं मातें कल्पतरु ।
जैसा भूषण कृपापरु । गुरुसुत तो गहिंवरला ॥ ७९ ॥
तरी बा समान करणी । मातें मिरवेल अंतःकरणीं ।
नातरी ढिसाळ बाटल्यावाणी । परी अर्थ हिंगूच दिसतसे ॥ ८० ॥ 
जैसें मृगजळाचें पाणी । परी अब्धिसमान वाटे खाणी ।
परी तृषाकोडाचा वासरमणी । अस्ताचळीं पावेना ॥ ८१ ॥
कीं शुद्ध ओडंबरी घन (पाणी नसलेले ढग) । स्वर्गींहूनि करी गर्जन ।
परी तोय लेशमान । महीलागीं आतळेना ॥ ८२ ॥
कीं काजवा जो तो दिढवा दावी । तरी कां तिमिरास तो आटवी ।
तेवीं बोल फोलप्रवाहीं । मिरवूं नको योगेंद्रा ॥ ८३ ॥
ऐसें ऐकतां तयाचें वचन । म्हणे राया नरेंद्रोत्तमा । 
पिंगलाउदय लक्षावधीन । केलिया मज देसील काय ॥ ८४ ॥
येरु म्हणे पिंगला नयना । दाविलिया पुरवीत इच्छिली कामना ।
राज्यवैभव सुखसेवना । संकल्पीन तुजलागीं ॥ ८५ ॥
ऐसें बोलतां नरेंद्रपाळ । साक्ष कोण म्हणे गोरक्षबाळ । 
येरु म्हणे पंचमंडळ । साक्षभूत असती बा ॥ ८६ ॥
आणि अनलादि स्वर्गसविता । जळपाताळ जळमही मान्यता ।
हे साक्ष असती बा देखतां । पशु पक्षी मृगादिक ॥ ८७ ॥
जरी मज न घडे बोलासमान । तरी पूर्वज सर्व पावती हीन ।
स्वर्गवासी पावती पतन । नरकवास भोगिती ॥ ८८ ॥
आणि शतजन्म रौरवकर । महीं भोगीन वारंवार ।
जरी मी न ओपीं राज्यसंभार । तुजलागीं महाराजा ॥ ८९ ॥
ऐसें बोलूनि शपथपूर्वक । पुन्हां बोले शपथदायक ।
म्हणे महाराजा हे तपपाळक । बोलासमान दावीं कीं ॥ ९० ॥
जरी या बोलासमान रहाणी । तूं न दाखविसी मातें नयनीं ।
तरी नरक पावसील सहस्त्रजन्मीं । विहित वाचे अनृतत्वें ॥ ९१ ॥
ऐसी राजेंद्र बोले वाणी । सत्यार्थ म्हणतसे योगतरणी ।
मग कामिनीअस्त्र पिंगलानेमीं । प्रयोगातें उच्चारी ॥ ९२ ॥
मग सहज करुनि ऊर्ध्व दृष्टी । फेकिता झाला भस्मचिमुटी ।
तंव ते कामिनीअस्त्रापोटीं । स्त्रिया कोटी उतरल्या ॥ ९३ ॥
मुख्य पिंगला जी भस्म झाली । तीच अनंत मूर्ति धरुनि उतरली ।
पाठीं पोटीं व्यापिली । सन्मुख उभी राहिली रायाच्या ॥ ९४ ॥
राव पाहूनि पिंगलास्वरुप । मोह कामाचा उजळला दीप ।
सकळांसी बैसवोनि आपणासमीप । संसारखुणा पुसतसे ॥ ९५ ॥
परी त्या पिंगला सगुणसरिता । सर्व सांगती अचूक वार्ता ।
सांगूनि उपरी बोधअर्था । रायाप्रती बोलती ॥ ९६ ॥
म्हणती महाराजा प्राणेश्र्वरा । मम विरहाचें शल्य बैसलें अंतरा । 
परी अशाश्र्वताचा माथां भारा । फुकटपणीं वाहिला ॥ ९७ ॥
म्यां चित्तीं करुनि तुमची प्रीती । दाहूनि घेतलें देहाप्रती ।
पुन्हां उदय गोरक्षजतीं । अनंत दृश्य पैं केलें ॥ ९८ ॥    
केलें तरी तुम्हांभावनीं । मिरवणें मज पुन्हां अवनीं ।
परी शेवटीं मृत्युपणाची काचणी । तुम्हां आम्हां असेचि ॥ ९९ ॥
तरी राया महाभोजा । आतां संग सोडूनि माझा ।
मोक्षमहीतळीं ध्वजा । लावोनियां उभारीं ॥ १०० ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 29  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणतीसावा (२९) 


Custom Search

No comments: